Tuesday, 23 August 2016

पावसाळी रानभाज्या


जेव्हा पावसाळा येतो ना तेव्हा माझ्या लहानपणी आमच्या घरात केल्या जाणाऱ्या अनेक पावसाळी भाज्यांची आठवण येते. माझं घर ठाण्याच्या खारकर आळीतलं... सीकेप्यांची खारकर आळी. कारखानीस, प्रधान, गुप्ते, चिटणीस, कुळकर्णी, रणदिवे, देशमुख, देशपांडे, खारकर, भिसे, वढावकर, मोकाशी, कोतवाल,नाचणे,फणसे,कर्णिक, पत्की, पोतनीस अशी अनेक सीकेपी घरं आणि या घरात बनल्या जाणाऱ्या अनेक खास आणि वेगवेगळ्या पाककृती. नुसतंच खाणं नाही तर केलेल्या पदार्थांवर भरभरून बोलणं ही पण सीकेप्यांची खासियत. बहुदा या कट्टर सीकेपी संस्कृतीमध्ये वाढल्यामुळेच माझ्यावर हे '' कायस्थी पाकसंस्कार'' जरा जास्तच झाले असावेत.असो.

गेला आठवडा भर फेसबुक आणि व्हॉट्सअप वर शेवळाच्या भाजीच्या "स्वागताच्या" पोस्ट येत होत्या आणि यायलाच पाहिजेत. कारण पावसाळ्यात येणारी आणि सीकेपी घरात आवर्जून केली जाणारी ती पावसाळी भाज्यांची राणीच आहे. एखादा सण साजरा व्हावा अशा प्रकारचे वातावरण शेवळं घरात आणल्यावर असतं. या भाजीची चव केवळ स्वर्गीय. वालाच्या बिरड्या प्रमाणेच शेवळाची भाजी कितीही केली तरी उरत नाही किंबहुना पुरत नाही. या शेवळाच्या बरोबरच पावसाळ्यात इतर अनेक भाज्या आपल्याला एक वेगळ्याच चवीची अनुभूती देण्यास प्रगट होतात. बाजारात शेवळं यायला लागली किंवा एखादी चांगली भाजी आली की खारकर आळीत जवळपास सर्वाना (मोबाईल नसतानाही) ती माहित व्हायची. स्टेशन रोड वरील २ नंबर पॊलिस चौकीजवळ बसणाऱ्या कातकरणी बायकांकडे या भाज्या हमखास मिळत. नव्या पिढीने ऐकलीही नसतील अशी वेगवेगळी नावे आणि प्रत्येक भाजीची चवही वेगळीच असायची.


पावसाळा आल्यावर काही दिवसातच आमच्या रणदिवे वाड्यात टाकळा उगवायचा. हिरव्यागार टाकळ्याची पाने तोडताना खूप मजा यायची. टाकळा हा जवळपास सर्वत्र उगवत असल्याने बाजारात कमी दिसायचा. परवाच एक भगिनीने शेवग्याच्या पानांची आणि फुलांची भाजी फेसबुक वर पोस्ट केली होती. आमच्या वाड्यातही शेवग्याची ( शेकटाची) अनेक झाडे असल्यामुळे पावसाळ्यात त्या भाजीचाही मनमुराद आनंद मी लुटलाय. पावसाळा सुरू होऊन साधारण १०/१२ दिवस झाले की कोरळ, भारंगी, बाफळी या भाज्या बाजारात येत. आमच्याकडे कोरळाची भाजी वाल किंवा हरबरे टाकून बनली जायची. साधारण कैरी सारखी दिसणारी मोदडी ची भाजी (जवळा घालून), साईचा मोर, कुडाच्या( अतिशय कडवट) शेंगा, अबई च्या हिरव्यागार शेंगा, लाल माठाचे दांडे, बटाट्यासाखे दिसणारे आणि चवीला अंड्यासारखे लागणारे भुईफोड, खडशिंग ,अळू, कंटोली .... एक ना अनेक भाज्या महिनाभर ताटात असायच्या. या व्यतिरिक्त एक वेगळीच अशी ''खारा माचुळ'' नावाची भाजी अंबाडी सुकट घालून आणि मीठ न घालता केली जायची. खरंतर मी यातील काही भाज्यांचे फोटो गुगल वर शोधण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. जमल्यास उद्या बाजारात जाऊन फोटो काढून नक्की पोस्ट करीन. आपणही आपल्या घरांत अजूनही काही पावसाळी भाज्या केल्या जात असतील तर कृपया त्याचीही माहिती शेअर करा.


"तुम्ही सीकेपी म्हणजे फक्त मटण मच्छी खाणारे" अशी ख्याती असणारे आपण शाकाहारी जेवणातही कितीतरी पट समृद्ध आहोत आणि प्रत्येक ऋतू बरोबर येणाऱ्या या सर्व भाज्यांचाही आपण तितक्याच प्रेमाने आस्वाद घेतो. उद्या रविवार आहे. जमल्यास मटण घेतल्यानंतर बाजारात फेरफटका मारून यातली एखादी भाजी आणून पहा आणि जर तुमच्या घरात तुमची आजी असेल तर तिला एक झकास पावसाळी सरप्राईझ द्या. तिला पण बरं वाटेल हो आपली नातवंड सीकेपी खाद्य परंपरा जपतात हे पाहून.


समीर गुप्ते 

सीकेपी फूड फेस्ट

2 comments: