Tuesday, 23 August 2016

पोतनीसांच्या एकवीरा खानावळिस भेट - दिवे आगार



काल काही कामानिमित्त मित्रासोबत दिवे आगार ला जाण्याचा योग आला. काम संपता संपता जेवणाची वेळही टळून गेली होती. ४ वाजले असल्यामुळे दिवे आगारातील व्यवहारही थंडावले होते … सगळं कसं एकदम शांत. इथे काही मिळेल याची शाश्वती नव्हती पण फेसबुक च्या माध्यमातून संतोष पोतनीसांच्या एकवीरा खानावळी बद्दल ऐकून होतो. गावात थोडी चौकशी करून त्यांचा पत्ता मिळवला आणि पोतनीसांच्या घरगुती खानावळीवर थडकलो. पोतनीस पण तसे स्लीप मोड वरच होते. पण मला पाहताच त्यांनी ओळखले आणि … अरे वा गुप्ते… या या…. बसा असे मस्त स्वागत केले. थोडा (फारच ) उशीर झाला असल्याने मी जर चाचरतच जेवण मिळेल का असे विचारले. काल संकष्टी होती … त्याच प्रश्नाबरोबर "संकष्टीला करता का हो?" हा पण प्रश्न विचारून मोकळा झालो. "मी गणपतीच्या पहिल्या दिवशी पण करतो '' असे ठाम उत्तर देऊन पोतनीस कामाला पण लागले. स्वतः तयारी ला मदत करून परत आमच्याबरोबर गप्पागोष्टी करत होते. 

१९०० साली बांधलेल्या यांच्या तीन मजली वाड्याच्या अंगणात बसल्यावर अनेकांना आपल्या जुन्या घरांची आठवण येत असेल . पाचव्या मिनिटालाच आपण सीकेपी माणसाच्या अंगणात बसलोय याची प्रचीती देणारा एक खमंग वास आला आणि काही मिनिटातच दोन दणदणीत सीकेपी ताटे आमच्या समोर आली. समुद्रातून नुकतीच आली आहेत इतक्या ताज्या पापलेट चे आंबट तिखट कालवण , अस्सल सीकेपी स्वयंपाक घरातील मसाल्यांचे संस्कार घेऊन ताटात विराजमान झालेले आख्खे तळलेले पापलेट, तांदळाच्या भाकऱ्या आणि गरमागरम भात, सोबत सोलकडी …. आम्ही गारद झालो ना. पुढची दहा मिनिटे एकही शब्द न बोलता समोर आलेल्या ताटाचा समाचार घेत जेवणाचा मनमुराद आनंद लुटला. संकष्टी असल्याची आठवण मध्ये मध्ये होत होती पण मन ताटाभोवतिच गुंतले होते. पोतनीसांच्या मनातील 'अतिथी देवो भवः' आणि माझ्या मनातील ' अन्नदाता सुखी भवः' या दोन भावनांचा समेट घडवत आमचे जेवण पार पडले. जेवल्यानंतर पोतनीस वहिनीनी केलेल्या चहाचा आस्वाद घेत घेत गप्पांच्या ओघात अनेक गोष्टीची माहिती संतोष पोतनीस यांनी दिली. दिवे आगारात सिकेप्यांची फक्त पाच घरं. १८ वर्षांपासून पर्यटकांना अस्सल सीकेपी जेवण देण्याची सुरुवात पोतनीस कुटुंबानेच केली. वर्षभर मिळणाऱ्या आणि मासेमारी बंद असताना पावसाळ्यात मिळणाऱ्या अनेक माशांची सीकेपी पद्धतीची कालवणं, आमट्या यांचा समावेश असलेले जेवण मुंबई पुण्याच्या अनेक पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे हे सांगायलाच नको. विशेष म्हणजे संतोष पोतनीस यांच्या पत्नी आणि वाहिनी या दोघी स्वतः सर्व पदार्थ बनवतात. पोतानिसांचे घरी तयार केलेले सीकेपी मसालेही अतिशय उत्कृष्ट. मुंबई ठाण्यातील अनेक मंडळी यांना दरवर्षी वर्षभराच्या मसाल्याची ऑर्डर देतात.

दिवे आगारचा सुप्रसिद्ध सोन्याचा गणपती लवकरच त्याच्या देवळात पुन्हा स्थानापन्न होणार आहे. त्याचे दर्शन घेण्यास आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या सुंदर, सुरक्षित समुद्र किनाऱ्यावर सहलीला जाल तेव्हा न चुकता एक नंबर शाळेसमोरील पोतनीसांच्या एकवीरा खानावळिस नक्की भेट द्या. जेवण झाल्यावर तृप्तीचा ढेकर द्याल ना तेव्हा माझी नक्कीच आठवण काढाल. आणि जाताना संकष्टी वगैरे बघून जा बरं का … मन लावून मनसोक्त जेवता आलं पाहिजे.
समीर गुप्ते 
सीकेपी फूड फेस्ट

5 comments:

  1. Replies
    1. This comment has been removed by the author.

      Delete
    2. आत्ताच लगेच जावसं वाटतय... खूप छान वर्णन समीर !

      Delete