
असं नाही कि मुंबईत प्यायला मिळत नाही म्हणून आम्ही गोव्याला दारू प्यायला जातो. गोवा हे नावारूपालाच आलं या स्वस्तात मिळणाऱ्या दारूमुळे आणि सागर किनाऱ्यावरच्या बिन्धास संस्कृती मुळे. अफाट निसर्ग सौंदर्य , सुंदर निळेशार स्वच्छ समुद्र किनारे, त्यावर फिरणारे रंगी बेरंगी फिरंगी, गोव्यात हमखास मिळणारी मच्छी, म्हापशाचा तो आठवडा बाजार, पणजीतली सलग दारूची दुकाने, देवळांची प्रशस्त आवार, अजूनही पोर्तुगीझपणा लेऊन मिरवणाऱ्या जुन्या इमारती, चर्च आणि भडक रंगवलेले बंगले, सौझा लोबो सारखी इंग्लिश गाणी ऐकवत दारू सर्व्ह करणारी किनाऱ्यावरची अनेक रेस्टोरेंट्स, नदीत नांगर टाकून स्थिरावलेले कॅसिनो ... सारं कसं वेगळंच. देशात असूनही परदेशात फिरायला गेल्यासाखं वाटणारं. एरवी पुण्या मुंबईत शिस्तबद्ध जगणाऱ्याला चार दिवस बेफिकीर, बेशिस्त जगण्याची मुभा असल्यासारखं वाटावं अस वातावरण...आणि खूप काही महागडं वगैरे असं पण नाही. म्हणून गोवा म्हणजे बेफाट तरुणाईचंच नाही तर अनेकांचं श्रद्धास्थान.
आता अचानक समुद्रावर दारू प्यायची नाही असा कायदा तिथे गोवा सरकार ने केल्याचं समजतंय. अहो बंद करायच्या अनेक गोष्टी राजरोस तिथे समुद्र किनाऱ्यावर चालत आहेत त्याचं काय. ते बंद करा आधी. उगीच काहीतरी फालतू कायदा आणायचा आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या नावाने पोलिसांनी टुरिस्ट कडून पैसे उकळायचा तर हा मार्ग नाही ना. जेथे पर्यटन हाच प्रमुख व्यवसाय आहे तिथे तरी असला मूर्खपणा करू नये हि माझ्यासारख्या गोव्यावर प्रेम करणाऱ्या आणि अर्थातच तिथे जाऊन यथेच्छ दारू पिणाऱ्या रसिक आणि जबाबदार पर्यटकाची अपेक्षा... काही चुकीचं तर नाही ना बोलत मी.
No comments:
Post a Comment