तुमच्या बाबतीत असं कधी घडलंय का हो कि घरच्या सत्यनारायणाच्या जेवणावळीत अथवा एखाद्या लग्नातील जेवणाच्या पंगतीत तुम्ही मस्त जेवताय आणि जेवण वाढणाऱ्याने पानाच्या डावीकडे भाजी वाढली, गोडाची वाटी उजवीकडे किंवा सरळ पानाबाहेर ठेवली किंवा लोणचं मधेच कुठेतरी वाढलंय. माझ्या बाबतीत असं घडलं तर असा राग येतो त्या माणसाचा मग तो कोणी का असेना. अरे एक पद्धत असते जेवण वाढण्याची. जेवताना आपला हात तसा चालत असतो ना.
अहो अप्रतिम जेवण बनवणे हे जशी कला आहे तसे ते जेवण शास्त्रोक्त पद्धतीने वाढणे हि पण एक कलाच आहे. पण झालय असं कि बुफे या पाश्चिमात्य भोजन पद्धती मुळे आपली अस्सल महाराष्ट्रीयन पंगत परंपरा लोप पावत गेली आणि जेवणाची लयबद्ध वाढणी विस्मरणात जाऊ लागली. याला दाक्षिणात्य मंडळी मात्र अपवाद आहेत. आजही त्यांच्या अनेक जेवणावळी या हिरव्यागार केळ्याच्या पानावर पारंपरिक पद्धतीने वाढलेल्या भोजनाने संपन्न होतात.
काय फरक पडतो आमटी डावीकडे वाढलीतर ?..पोटातच तर जाणार आहे .. असे विचार असलेल्या काही तरुण मंडळींबद्दल न बोललेलं बरं. कोण सांगणार याना पंगतीतल्या छान वाढलेल्या पानाबद्दल आणि त्यात मिळणाऱ्या आनंदाबद्दल. माझ्या लहानपणीच्या आठवणीतल्या लग्नातल्या पंगतीत तर काय मजा असायची. शे दीडशे लोकांची एक पंगत. एक एक पदार्थ वाढणारी अनेक वेगवेगळी लोकं आणि वाढपी काय लगबगीने ताट वाढायचे आणि मग सर्व पदार्थानी सजलेलं भरलेलं ताट पाहून जेवायला सुरुवात व्हायची. डावीकडे पिवळ्या रंगाच्या केशर मिरवणाऱ्या गरमा गरम जिलब्या, मठ्ठा, समोर लिंबू, मीठ, लोणचं, कोशिंबीर, पापड, कांदा बटाटा भजी, मसुऱ्याची आमटी, बटाट्याची सुकी भाजी, मधोमध पांढरी शुभ्र भाताची मूद, त्यावर हलकेसे वरण आणि हळुवार सोडलेले साजूक तूप ... मूद फोडली रे फोडली कि एकजण गरम गरम वरणाचे भांडं घेऊन समोर हजर. पानातील भात संपत आला कि पुरी, वडे आणि मागोमाग मसालेभात आलाच म्हणून समजा. बरं , या सगळ्या गडबडीत प्रत्येक पदार्थ मात्र न चुकता न सांगता योग्य ठिकाणीच वाढला जायचा. सुदंर मांडणी असलेल्या या चमचमीत जेवणाला आग्रहाची जोड तर हमखास असायचीच आणि त्या आग्रहानिमित्त संवाद पण घडायचे. लांबच्या नात्यातली एखादी काकी जिलबीचं ताट घेऊन पंगतीत बसलेल्या कोणाशी तरी बोलत बोलत, हसतच समोर यायची..मी नको नको म्हणतानाच "तू कांताचा ना रे.. मग घे गपचूप " अस म्हणत दोन जिलब्या वाढून जायची. मी कांताचा मुलगा असणं आणि दोन जिलब्यांचा काय संबंध हे मला आजतागायत कळले नाही पण त्या अनोळखी काकीच्या चेहेऱ्यावरचा प्रेमळ भाव आणि जिलब्यांपेक्षाही तिच्या आग्रहातला गोडवा आजही मनात जपला गेलाय.
जेवण वाढताना पण काय शब्द वापरले जातात हे पण महत्वाचे ... माझी मैत्रीण स्मिता कारखानिस एकदा एक कौटुंबिक समारंभात मा. राज साहेबाना जेवण वाढत असता इतर वाढणाऱ्या महिलांप्रमाणेच, थोडी भाजी घालू का असं म्हणाली. त्यावर राजसाहेबांनी तिला " घालू म्हणजे काय , सीकेपी आहेस ना तू, वाढू का विचार" असे त्यांच्या शैलीत म्हटल्याचे (हाणल्याचे) ऐकिवात आहे. जेवणाच्या सौन्दर्याबद्दल बोलताना सुप्रसिद्ध शेफ श्री. विष्णू मनोहर सीकेपी फेस्ट ला आले असता मला सांगत होते कि एक जेवण हे तीनदा जेवायचे .... म्हणजे असं कि पहिल्यांदा जेवणाचे ताट डोळ्याने भरभरून पाहून जेवायचे असते, नंतर नाकावाटे त्या जेवणाचा सुगंध आत सामावत जेवायचे आणि नंतर मुखाद्वारे त्या चवदार भोजनाचा मनमुराद आस्वाद घेत खऱ्या अर्थाने जेवायचे.
नुसतं जेवण पारंपरीक असून नाही चालत हो... त्या परंपरेत शास्त्रोक्तपणे सजवलेल्या ताटात आपापल्या जागी स्थानापन्न झालेल्या पदार्थांची सजावट असणे महत्वाचे आणि त्याहून अधीक महत्वाचे म्हणजे तुमच्या सारख्या जुन्या जाणत्या खवय्ये मंडळींनी हि परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे.
माझा श्रावण कधीच सम्पलाय पण तुमचा अजून सुरू असेल तर बघा येत्या सोमवारी हिरव्यागार केळ्याच्या पानावर परंपरागत वाढलेल्या जेवणाचा आस्वाद घेऊन. थोडं पुण्य नक्कीच लागेल आपली भोजन परंपरा जोपासल्याचं.
समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट
सीकेपी फूड फेस्ट
The true fact.... perfect verbiage !! Way to go Sam !
ReplyDeletethanks Vips
ReplyDeletethanks Vips
ReplyDelete