Sunday, 28 August 2016

चवीची अनुभूती

बऱ्याचदा घरी एखादा खास पदार्थ खाल्ल्यावर आपण म्हणतो .. बनलाय चांगला पण चव मागच्या वेळेसारखी नाही बरं का. किती सहजपणे बोलून जातो आपण. बनवणाऱ्या व्यक्तीने काही दिवस आधी ठरवून आणि काही तास मन लावून बनवलेला असतो हा पदार्थ.. जीव ओतून केलेल्या या पदार्थावरची आपली एक कॉमेंट तिचा हिरमोड करायला पुरेशी ठरते आणि नव्याणव टक्के हा पदार्थ बनवणारी व्यक्ती तुमची आई किंवा पत्नी असते.

कशी असेल हो चव मागच्यासारखी सेम टू सेम. बाजारातून आणलेल्या जिन्नसांच सोडा पण इतरही अनेक गोष्टी कारणीभूत आहेत चवित बदल करण्यासाठी. मला सांगा, पूजेच्या दिवशी सत्यनारायणाचा प्रसाद आणि इतर दिवशी त्याच मापाने बनवलेला शिरा वेगळा का लागतो बरं. उन्हाळ्यात खाल्लेली आणि पावसाळ्यात खाल्लेली कांदा भजी वेगळी का लागते. कितीही लज्जतदार जेवणाचा पहिला घास आणि शेवटचा घास सारखाच लागतो का हो ?. नाही ना , कारण चवीची अनुभूती स्थलकालऋतू परत्वेच नव्हे तर तुमच्या मनस्थिती (मूड) वर पण अवलंबून असते, तुमच्या भूकेवर अवलंबून असते, तुमच्या त्या व्यक्तीवरच्या प्रेमावर पण अवलंबून असते. एरवी बघताक्षणीच फस्त होणारा पिठलं भात घरात घडलेल्या एखाद्या दुःखद प्रसंगा नंतर खाताना कुठे चवदार लागतो सांगा बरं. एखाद्याच्या व्यक्तीच्या विरहात किंवा आठवणीत 'अन्न गोड लागत नाही' असे म्हणतात ते यालाच. पदार्थाची चव तीच असते, तूम्हालाच बेचव किंवा वेगळी लागते.

कधी तुमची नववी-दहावीतली मुलगी पहिल्यांदाच तिच्या आईच्या देखरेखीत एखादी साधीशी भाजी बनवते...किती धांदल असते तिची .. काहीतरी नक्कीच कमी पडलेलं असतं त्या भाजीत. पण कसले खुश असता तुम्ही ...इथे कौतुकाच्या मसाल्याने त्या भाजीची चव बदललेली असते. कधी सणकून भूक लागली असते, तेव्हा घरातली शिळी भाकरी पण गोड लागते. रोजच्या घाईत ऑफिसला निघता निघता कसाबसा प्यायलेला चहा आणि सुट्टीच्या दिवशी आरामखुर्चीत पेपर वाचत घेतलेला तोच चहा परत 'घोटभर' प्यावासा वाटतो. कधी कधी लग्न होऊन गेलेल्या बहिणीकडे जेवताना तुम्हाला प्रत्येक घासागणीक तुमच्या आईच्या हातच्या चवीची आठवण येते.. टचकन डोळ्यात पाणी येतं आणि नंतरचा तो प्रत्येक घास त्या आठवणीत अधिकच चवदार होत जातो.

भुकेला धर्म नसतो, अन्नाला जात नसते, पण चवीला मात्र नातं असतं. खरंच सांगतो, चव फक्त पदार्थात नसते , चव मनात असते, चव प्रेमात असते, चव आठवणीत असते. चवीची अनुभूती घेण्यासाठी जीभ नावाचे एक वेगळे इंद्रिय जरी देवाने दिले असले तरी ती चवदार आठवणींचा अनमोल ठेवा जपण्यासाठी तुमच्या हृदयासारखी दुसरी जागा नाही. म्हणूनच हृदयात रुळणाऱ्या आणि जिभेवर रेंगाळणाऱ्या प्रत्येक चवीबरोबर एकातरी प्रिय व्यक्तीची आठवण नेहेमीच जपलेली असते. पटतंय ना तुम्हाला.

समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट.
#SameerGupte#ckpfoodfest#SamHere#chavdaar#funwriting#enjoyreading#sameergupte.blogspot.in#sameer6949@gmail.com

Tuesday, 23 August 2016

गोवा



असं नाही कि मुंबईत प्यायला मिळत नाही म्हणून आम्ही गोव्याला दारू प्यायला जातो. गोवा हे नावारूपालाच आलं या स्वस्तात मिळणाऱ्या दारूमुळे आणि सागर किनाऱ्यावरच्या बिन्धास संस्कृती मुळे. अफाट निसर्ग सौंदर्य , सुंदर निळेशार स्वच्छ समुद्र किनारे, त्यावर फिरणारे रंगी बेरंगी फिरंगी, गोव्यात हमखास मिळणारी मच्छी, म्हापशाचा तो आठवडा बाजार, पणजीतली सलग दारूची दुकाने, देवळांची प्रशस्त आवार, अजूनही पोर्तुगीझपणा लेऊन मिरवणाऱ्या जुन्या इमारती, चर्च आणि भडक रंगवलेले बंगले, सौझा लोबो सारखी इंग्लिश गाणी ऐकवत दारू सर्व्ह करणारी किनाऱ्यावरची अनेक रेस्टोरेंट्स, नदीत नांगर टाकून स्थिरावलेले कॅसिनो ... सारं कसं वेगळंच. देशात असूनही परदेशात फिरायला गेल्यासाखं वाटणारं. एरवी पुण्या मुंबईत शिस्तबद्ध जगणाऱ्याला चार दिवस बेफिकीर, बेशिस्त जगण्याची मुभा असल्यासारखं वाटावं अस वातावरण...आणि खूप काही महागडं वगैरे असं पण नाही. म्हणून गोवा म्हणजे बेफाट तरुणाईचंच नाही तर अनेकांचं श्रद्धास्थान.
आता अचानक समुद्रावर दारू प्यायची नाही असा कायदा तिथे गोवा सरकार ने केल्याचं समजतंय. अहो बंद करायच्या अनेक गोष्टी राजरोस तिथे समुद्र किनाऱ्यावर चालत आहेत त्याचं काय. ते बंद करा आधी. उगीच काहीतरी फालतू कायदा आणायचा आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या नावाने पोलिसांनी टुरिस्ट कडून पैसे उकळायचा तर हा मार्ग नाही ना. जेथे पर्यटन हाच प्रमुख व्यवसाय आहे तिथे तरी असला मूर्खपणा करू नये हि माझ्यासारख्या गोव्यावर प्रेम करणाऱ्या आणि अर्थातच तिथे जाऊन यथेच्छ दारू पिणाऱ्या रसिक आणि जबाबदार पर्यटकाची अपेक्षा... काही चुकीचं तर नाही ना बोलत मी.

पंगतीचं जेवण आणि वाढणी - एक लोप पावणारी परंपरा

तुमच्या बाबतीत असं कधी घडलंय का हो कि घरच्या सत्यनारायणाच्या जेवणावळीत अथवा एखाद्या लग्नातील जेवणाच्या पंगतीत तुम्ही मस्त जेवताय आणि जेवण वाढणाऱ्याने पानाच्या डावीकडे भाजी वाढली, गोडाची वाटी उजवीकडे किंवा सरळ पानाबाहेर ठेवली किंवा लोणचं मधेच कुठेतरी वाढलंय. माझ्या बाबतीत असं घडलं तर असा राग येतो त्या माणसाचा मग तो कोणी का असेना. अरे एक पद्धत असते जेवण वाढण्याची. जेवताना आपला हात तसा चालत असतो ना.
अहो अप्रतिम जेवण बनवणे हे जशी कला आहे तसे ते जेवण शास्त्रोक्त पद्धतीने वाढणे हि पण एक कलाच आहे. पण झालय असं कि बुफे या पाश्चिमात्य भोजन पद्धती मुळे आपली अस्सल महाराष्ट्रीयन पंगत परंपरा लोप पावत गेली आणि जेवणाची लयबद्ध वाढणी विस्मरणात जाऊ लागली. याला दाक्षिणात्य मंडळी मात्र अपवाद आहेत. आजही त्यांच्या अनेक जेवणावळी या हिरव्यागार केळ्याच्या पानावर पारंपरिक पद्धतीने वाढलेल्या भोजनाने संपन्न होतात.
काय फरक पडतो आमटी डावीकडे वाढलीतर ?..पोटातच तर जाणार आहे .. असे विचार असलेल्या काही तरुण मंडळींबद्दल न बोललेलं बरं. कोण सांगणार याना पंगतीतल्या छान वाढलेल्या पानाबद्दल आणि त्यात मिळणाऱ्या आनंदाबद्दल. माझ्या लहानपणीच्या आठवणीतल्या लग्नातल्या पंगतीत तर काय मजा असायची. शे दीडशे लोकांची एक पंगत. एक एक पदार्थ वाढणारी अनेक वेगवेगळी लोकं आणि वाढपी काय लगबगीने ताट वाढायचे आणि मग सर्व पदार्थानी सजलेलं भरलेलं ताट पाहून जेवायला सुरुवात व्हायची. डावीकडे पिवळ्या रंगाच्या केशर मिरवणाऱ्या गरमा गरम जिलब्या, मठ्ठा, समोर लिंबू, मीठ, लोणचं, कोशिंबीर, पापड, कांदा बटाटा भजी, मसुऱ्याची आमटी, बटाट्याची सुकी भाजी, मधोमध पांढरी शुभ्र भाताची मूद, त्यावर हलकेसे वरण आणि हळुवार सोडलेले साजूक तूप ... मूद फोडली रे फोडली कि एकजण गरम गरम वरणाचे भांडं घेऊन समोर हजर. पानातील भात संपत आला कि पुरी, वडे आणि मागोमाग मसालेभात आलाच म्हणून समजा. बरं , या सगळ्या गडबडीत प्रत्येक पदार्थ मात्र न चुकता न सांगता योग्य ठिकाणीच वाढला जायचा. सुदंर मांडणी असलेल्या या चमचमीत जेवणाला आग्रहाची जोड तर हमखास असायचीच आणि त्या आग्रहानिमित्त संवाद पण घडायचे. लांबच्या नात्यातली एखादी काकी जिलबीचं ताट घेऊन पंगतीत बसलेल्या कोणाशी तरी बोलत बोलत, हसतच समोर यायची..मी नको नको म्हणतानाच "तू कांताचा ना रे.. मग घे गपचूप " अस म्हणत दोन जिलब्या वाढून जायची. मी कांताचा मुलगा असणं आणि दोन जिलब्यांचा काय संबंध हे मला आजतागायत कळले नाही पण त्या अनोळखी काकीच्या चेहेऱ्यावरचा प्रेमळ भाव आणि जिलब्यांपेक्षाही तिच्या आग्रहातला गोडवा आजही मनात जपला गेलाय.
जेवण वाढताना पण काय शब्द वापरले जातात हे पण महत्वाचे ... माझी मैत्रीण स्मिता कारखानिस एकदा एक कौटुंबिक समारंभात मा. राज साहेबाना जेवण वाढत असता इतर वाढणाऱ्या महिलांप्रमाणेच, थोडी भाजी घालू का असं म्हणाली. त्यावर राजसाहेबांनी तिला " घालू म्हणजे काय , सीकेपी आहेस ना तू, वाढू का विचार" असे त्यांच्या शैलीत म्हटल्याचे (हाणल्याचे) ऐकिवात आहे. जेवणाच्या सौन्दर्याबद्दल बोलताना सुप्रसिद्ध शेफ श्री. विष्णू मनोहर सीकेपी फेस्ट ला आले असता मला सांगत होते कि एक जेवण हे तीनदा जेवायचे .... म्हणजे असं कि पहिल्यांदा जेवणाचे ताट डोळ्याने भरभरून पाहून जेवायचे असते, नंतर नाकावाटे त्या जेवणाचा सुगंध आत सामावत जेवायचे आणि नंतर मुखाद्वारे त्या चवदार भोजनाचा मनमुराद आस्वाद घेत खऱ्या अर्थाने जेवायचे.
नुसतं जेवण पारंपरीक असून नाही चालत हो... त्या परंपरेत शास्त्रोक्तपणे सजवलेल्या ताटात आपापल्या जागी स्थानापन्न झालेल्या पदार्थांची सजावट असणे महत्वाचे आणि त्याहून अधीक महत्वाचे म्हणजे तुमच्या सारख्या जुन्या जाणत्या खवय्ये मंडळींनी हि परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे.
माझा श्रावण कधीच सम्पलाय पण तुमचा अजून सुरू असेल तर बघा येत्या सोमवारी हिरव्यागार केळ्याच्या पानावर परंपरागत वाढलेल्या जेवणाचा आस्वाद घेऊन. थोडं पुण्य नक्कीच लागेल आपली भोजन परंपरा जोपासल्याचं.
समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट

बॅनर बॉईझ



दहीहंडी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निमित्त आणि येणाऱ्या सणानिमित्त शहराची वाट लावण्यासाठी ऊत आल्यासारखी  बॅनरबाजीची सर्वपक्षीय जय्यत तयारी  महाराष्ट्रभर सुरु असेलच. त्यातच  "गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना शुभेच्छा" वगैरे बॅनर ची पण आता सुरुवात झाली आहे.
आणि एरव्हीपण काय एकेक बॅनर असतात मित्रानो ! म्हणजे ज्यांच्या साठी बॅनर बनवले जातात ते नेते सोडा पण जे डिझायनर ते बनवतात त्यांचा पण शिवाजी पार्क वर भव्य सत्कार करावा अस कधी कधी वाटतं .

काही वर्षांपूर्वी  एका गावात एक लहान मुलाचा अपघाती मृत्यू झाला होता. घटना खरंच दुःखद होती. ९-१० हे काही वय नाही मरायचं पण ईश्वर इच्छा प्रबळ होती. नेमका हा मुलगा एका स्थानिक नेत्याच्या नात्यातला असल्याने  त्याच्या  शोकाकुल परिवाराचे  सांत्वन करणारी अनेक बॅनर उत्साही कार्यकर्त्यांकडून  गावभर लावली गेली. पण बॅनर वरचा मजकूर वाचाल तर वेडेच व्हाल. बघा काय लिहितात हे डिझायनर ...
"झिजलास तू चंदनापरी, माया केलीस आम्हावरी,
जाणवेल पोकळी क्षणोक्षणी, कृपा राहावी सर्वांवरी ."
तो बिचारा मुलगा १० वर्षाचा.. आणि "झिजलास" तू चंदनापरी ?.... कृपा राहावी सर्वांवरी?.... चायला काय लिहितात, काय छापतात , कशी अक्कल नसते याना?

मागे नेल्सन मंडेला यांच्या निधनानंतर लावलेल्या बॅनर वर हयात आणि ठणठणीत असलेल्या मॉर्गन फ्रीमन या सुप्रसिद्ध  हॉलिवूड अभिनेत्याचे  फोटो छापल्याची बातमी पण फोटोसहित फेसबुक वर पहिलेली आठवतेय. काय गरज आहे या नसत्या उठाठेवींची  ?

दुसरी चीड आणणारी बॅनर म्हणजे नियुक्तीची...कोण काढतं हि महान पदं. नुकत्याच मिसरुड  फुटलेल्या मुलाच्या फोटोसहित कार्यसम्राट श्री अमुक तमुक  याची वॉर्ड क्र. १७८ च्या उपसचिव पदी  नियुक्ती झाल्यामुळे त्यांचे अभिनंदन. कार्यसम्राट ? कशाला ?

मधल्या काळात "बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलाय भावानं ", " कसाबसा पास झाला म्हणून", " पहिली दाढी केली म्हणून", "ऐपत नसतानापण गर्लफ्रेंड ला फिरवायला  ७०,०००/- ची गाडी घेतली म्हणून " ," काम नानांच्या घरच, होऊ दे खर्च "  अशा टाईप चे बॅनर लावायची क्रेझ आली होती.  आधी लोकांना पण गम्मत वाटायची पण नंतर अतिरेक झाला.

राजकारण्यांच्या वाढदिवसाच्या बॅनर ची तर कहाणीच वेगळी.  आदरणीय दादा, भाई, साहेब, भाऊ, बॉस, वॉर्डाचे भाग्यविधाते, समाजाचे आधारस्तंभ,  काही ठिकाणी तर जांणता राजा वगैरे हास्यास्पद.असली विशेषणे लावून त्या नेत्याचा वाढदिवस अक्षरशः  तुमच्या माथी मारला जातो.  या बॅनर खाली वॉर्डातले अनेक चेहेरे मिळतील तसे छापलेले. शेंडुंग फाट्याजवळ एक बॅनर तुम्ही नक्की पहा. त्यावर इतके फोटो असतात कि तुम्हाला वाटेल आता मतदाराचे फोटो पण बॅनर वर  छापण्याची फॅशन आलीये का. जवळपास शंभर सव्वाशे फोटो.

या वर कहर म्हणजे या "बर्थडे बॉय" ची पोझ ... असे काही चमत्कारिक फोटो काढतात ही मंडळी कि काही विचारता सोय नाही. तुम्ही जर एकटक या फोटोकडे पाहाल ना तर अनेक एक्सप्रेसशन्स तुम्हाला दिसतील.  म्हणजे काहीजण अतिशय आश्चर्य झाल्यासारखे, काहीजण " अरेच्या तू इथे कुठं? " अशी पोझ देऊन, काही हातात फाईल घेऊन अतिशय  महत्वाच्या कामाला निघाल्यासारखे ,काही हसत हसत फोनवर शुभेच्छा घेतायत असे दाखवणारे,  काही त्यांच्या नेत्यांसारखे आकाशात  बोट दाखवून काहीतरी उडणारी वस्तू वगैरे दाखवणारे, काही अभ्यासात किंवा विचारात मग्न तर काही भलतेच खुश होऊन हसत पाहणारे, तर काही सिहासनावर बसून दरबार चालवत आहेत अशा गमतीदार वेगवेगळ्या पोझेस देत बॅनर वर झळकतात.

खरंच, समाजोपयोगी काम करून लोकाभिमुख होण्यापेक्षा बॅनर वर येऊन झटपट लोकप्रिय होता येतं या गोड  गैरसमजात वावरणारे  हे नव नेते भविष्यात काय दिवे लावणार असच वाटतं.

आणि या किळसवाण्या बँनरबाजीने तुमच्या शहराची वाट लावत 'कणभर' नेतृत्व गुण नसताना " कणखर नेतृत्व"  लिहिणारी हि मंडळी भविष्यात तुमच्या शहरावर राज्य करण्याचे स्वप्न पाहत आहेत या पेक्षा तुमची वाईट चेष्टा ती कोणती. 

पावसाळी रानभाज्या


जेव्हा पावसाळा येतो ना तेव्हा माझ्या लहानपणी आमच्या घरात केल्या जाणाऱ्या अनेक पावसाळी भाज्यांची आठवण येते. माझं घर ठाण्याच्या खारकर आळीतलं... सीकेप्यांची खारकर आळी. कारखानीस, प्रधान, गुप्ते, चिटणीस, कुळकर्णी, रणदिवे, देशमुख, देशपांडे, खारकर, भिसे, वढावकर, मोकाशी, कोतवाल,नाचणे,फणसे,कर्णिक, पत्की, पोतनीस अशी अनेक सीकेपी घरं आणि या घरात बनल्या जाणाऱ्या अनेक खास आणि वेगवेगळ्या पाककृती. नुसतंच खाणं नाही तर केलेल्या पदार्थांवर भरभरून बोलणं ही पण सीकेप्यांची खासियत. बहुदा या कट्टर सीकेपी संस्कृतीमध्ये वाढल्यामुळेच माझ्यावर हे '' कायस्थी पाकसंस्कार'' जरा जास्तच झाले असावेत.असो.

गेला आठवडा भर फेसबुक आणि व्हॉट्सअप वर शेवळाच्या भाजीच्या "स्वागताच्या" पोस्ट येत होत्या आणि यायलाच पाहिजेत. कारण पावसाळ्यात येणारी आणि सीकेपी घरात आवर्जून केली जाणारी ती पावसाळी भाज्यांची राणीच आहे. एखादा सण साजरा व्हावा अशा प्रकारचे वातावरण शेवळं घरात आणल्यावर असतं. या भाजीची चव केवळ स्वर्गीय. वालाच्या बिरड्या प्रमाणेच शेवळाची भाजी कितीही केली तरी उरत नाही किंबहुना पुरत नाही. या शेवळाच्या बरोबरच पावसाळ्यात इतर अनेक भाज्या आपल्याला एक वेगळ्याच चवीची अनुभूती देण्यास प्रगट होतात. बाजारात शेवळं यायला लागली किंवा एखादी चांगली भाजी आली की खारकर आळीत जवळपास सर्वाना (मोबाईल नसतानाही) ती माहित व्हायची. स्टेशन रोड वरील २ नंबर पॊलिस चौकीजवळ बसणाऱ्या कातकरणी बायकांकडे या भाज्या हमखास मिळत. नव्या पिढीने ऐकलीही नसतील अशी वेगवेगळी नावे आणि प्रत्येक भाजीची चवही वेगळीच असायची.


पावसाळा आल्यावर काही दिवसातच आमच्या रणदिवे वाड्यात टाकळा उगवायचा. हिरव्यागार टाकळ्याची पाने तोडताना खूप मजा यायची. टाकळा हा जवळपास सर्वत्र उगवत असल्याने बाजारात कमी दिसायचा. परवाच एक भगिनीने शेवग्याच्या पानांची आणि फुलांची भाजी फेसबुक वर पोस्ट केली होती. आमच्या वाड्यातही शेवग्याची ( शेकटाची) अनेक झाडे असल्यामुळे पावसाळ्यात त्या भाजीचाही मनमुराद आनंद मी लुटलाय. पावसाळा सुरू होऊन साधारण १०/१२ दिवस झाले की कोरळ, भारंगी, बाफळी या भाज्या बाजारात येत. आमच्याकडे कोरळाची भाजी वाल किंवा हरबरे टाकून बनली जायची. साधारण कैरी सारखी दिसणारी मोदडी ची भाजी (जवळा घालून), साईचा मोर, कुडाच्या( अतिशय कडवट) शेंगा, अबई च्या हिरव्यागार शेंगा, लाल माठाचे दांडे, बटाट्यासाखे दिसणारे आणि चवीला अंड्यासारखे लागणारे भुईफोड, खडशिंग ,अळू, कंटोली .... एक ना अनेक भाज्या महिनाभर ताटात असायच्या. या व्यतिरिक्त एक वेगळीच अशी ''खारा माचुळ'' नावाची भाजी अंबाडी सुकट घालून आणि मीठ न घालता केली जायची. खरंतर मी यातील काही भाज्यांचे फोटो गुगल वर शोधण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. जमल्यास उद्या बाजारात जाऊन फोटो काढून नक्की पोस्ट करीन. आपणही आपल्या घरांत अजूनही काही पावसाळी भाज्या केल्या जात असतील तर कृपया त्याचीही माहिती शेअर करा.


"तुम्ही सीकेपी म्हणजे फक्त मटण मच्छी खाणारे" अशी ख्याती असणारे आपण शाकाहारी जेवणातही कितीतरी पट समृद्ध आहोत आणि प्रत्येक ऋतू बरोबर येणाऱ्या या सर्व भाज्यांचाही आपण तितक्याच प्रेमाने आस्वाद घेतो. उद्या रविवार आहे. जमल्यास मटण घेतल्यानंतर बाजारात फेरफटका मारून यातली एखादी भाजी आणून पहा आणि जर तुमच्या घरात तुमची आजी असेल तर तिला एक झकास पावसाळी सरप्राईझ द्या. तिला पण बरं वाटेल हो आपली नातवंड सीकेपी खाद्य परंपरा जपतात हे पाहून.


समीर गुप्ते 

सीकेपी फूड फेस्ट

पोतनीसांच्या एकवीरा खानावळिस भेट - दिवे आगार



काल काही कामानिमित्त मित्रासोबत दिवे आगार ला जाण्याचा योग आला. काम संपता संपता जेवणाची वेळही टळून गेली होती. ४ वाजले असल्यामुळे दिवे आगारातील व्यवहारही थंडावले होते … सगळं कसं एकदम शांत. इथे काही मिळेल याची शाश्वती नव्हती पण फेसबुक च्या माध्यमातून संतोष पोतनीसांच्या एकवीरा खानावळी बद्दल ऐकून होतो. गावात थोडी चौकशी करून त्यांचा पत्ता मिळवला आणि पोतनीसांच्या घरगुती खानावळीवर थडकलो. पोतनीस पण तसे स्लीप मोड वरच होते. पण मला पाहताच त्यांनी ओळखले आणि … अरे वा गुप्ते… या या…. बसा असे मस्त स्वागत केले. थोडा (फारच ) उशीर झाला असल्याने मी जर चाचरतच जेवण मिळेल का असे विचारले. काल संकष्टी होती … त्याच प्रश्नाबरोबर "संकष्टीला करता का हो?" हा पण प्रश्न विचारून मोकळा झालो. "मी गणपतीच्या पहिल्या दिवशी पण करतो '' असे ठाम उत्तर देऊन पोतनीस कामाला पण लागले. स्वतः तयारी ला मदत करून परत आमच्याबरोबर गप्पागोष्टी करत होते. 

१९०० साली बांधलेल्या यांच्या तीन मजली वाड्याच्या अंगणात बसल्यावर अनेकांना आपल्या जुन्या घरांची आठवण येत असेल . पाचव्या मिनिटालाच आपण सीकेपी माणसाच्या अंगणात बसलोय याची प्रचीती देणारा एक खमंग वास आला आणि काही मिनिटातच दोन दणदणीत सीकेपी ताटे आमच्या समोर आली. समुद्रातून नुकतीच आली आहेत इतक्या ताज्या पापलेट चे आंबट तिखट कालवण , अस्सल सीकेपी स्वयंपाक घरातील मसाल्यांचे संस्कार घेऊन ताटात विराजमान झालेले आख्खे तळलेले पापलेट, तांदळाच्या भाकऱ्या आणि गरमागरम भात, सोबत सोलकडी …. आम्ही गारद झालो ना. पुढची दहा मिनिटे एकही शब्द न बोलता समोर आलेल्या ताटाचा समाचार घेत जेवणाचा मनमुराद आनंद लुटला. संकष्टी असल्याची आठवण मध्ये मध्ये होत होती पण मन ताटाभोवतिच गुंतले होते. पोतनीसांच्या मनातील 'अतिथी देवो भवः' आणि माझ्या मनातील ' अन्नदाता सुखी भवः' या दोन भावनांचा समेट घडवत आमचे जेवण पार पडले. जेवल्यानंतर पोतनीस वहिनीनी केलेल्या चहाचा आस्वाद घेत घेत गप्पांच्या ओघात अनेक गोष्टीची माहिती संतोष पोतनीस यांनी दिली. दिवे आगारात सिकेप्यांची फक्त पाच घरं. १८ वर्षांपासून पर्यटकांना अस्सल सीकेपी जेवण देण्याची सुरुवात पोतनीस कुटुंबानेच केली. वर्षभर मिळणाऱ्या आणि मासेमारी बंद असताना पावसाळ्यात मिळणाऱ्या अनेक माशांची सीकेपी पद्धतीची कालवणं, आमट्या यांचा समावेश असलेले जेवण मुंबई पुण्याच्या अनेक पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे हे सांगायलाच नको. विशेष म्हणजे संतोष पोतनीस यांच्या पत्नी आणि वाहिनी या दोघी स्वतः सर्व पदार्थ बनवतात. पोतानिसांचे घरी तयार केलेले सीकेपी मसालेही अतिशय उत्कृष्ट. मुंबई ठाण्यातील अनेक मंडळी यांना दरवर्षी वर्षभराच्या मसाल्याची ऑर्डर देतात.

दिवे आगारचा सुप्रसिद्ध सोन्याचा गणपती लवकरच त्याच्या देवळात पुन्हा स्थानापन्न होणार आहे. त्याचे दर्शन घेण्यास आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या सुंदर, सुरक्षित समुद्र किनाऱ्यावर सहलीला जाल तेव्हा न चुकता एक नंबर शाळेसमोरील पोतनीसांच्या एकवीरा खानावळिस नक्की भेट द्या. जेवण झाल्यावर तृप्तीचा ढेकर द्याल ना तेव्हा माझी नक्कीच आठवण काढाल. आणि जाताना संकष्टी वगैरे बघून जा बरं का … मन लावून मनसोक्त जेवता आलं पाहिजे.
समीर गुप्ते 
सीकेपी फूड फेस्ट

फीडबॅक फॉर्म

झाली असतील पांच सहा वर्षे या गोष्टीला. पवई च्या रेनिसांस या पंचतारांकित हॉटेलच्या लेक व्ह्यू कॅफ्फे मध्ये मित्रांसह (पिउन) जेवल्यानंतर फीड बैक फ़ॉर्म भरत होतो. एक चांगली सवय आहे मला ( मित्र याला खाज पण म्हणतात ) या हॉटेलवाल्या लोकांना सीकेपी जेवणाची माहिती करून द्यायची. म्हणून सगळे पॉइण्ट्स मार्क केल्यावर लिहिलं कि सीकेपी पदार्थ असते मेनूवर तर आवडल असतं. उद्देश इतकाच होता कि हा फॉर्म जेव्हा कोणी एन्ट्री करताना वाचेल तेव्हा कुतूहल तरी चाळवेल त्याचे कि काय प्रकार आहे हा. पण रेनिसंस च्या कर्मचाऱ्यांचे कौतुक म्हणजे त्यातला एक जण तत्परतेने विचारू लागला कि सीकेपी फूड म्हणजे काय. तो अमराठी असल्याने मी त्याला आपल्याबद्दल सांगितले…वालाचे बिरडे , सोड्याची खिचडी असले दोन चार टिपिकल सीकेपी पदार्थ सांगितले. त्यालाही थोडी माहिती मिळाली आणि मलाही थोडं बर वाटलं. त्या नंतर सहा सात महिने लोटले आणि मला त्यांच्या कडून एका महाराष्ट्रीयन फूड फेस्टिवल चे आमंत्रण आले. असे काही न काही सप्ताह - कार्यक्रम तिथे सुरूच असतात. मी या वेळी सहकुटुंब , माझ्या आई वडिलांना पण घेऊन गेलो. अस्सल मराठी वेशभूषेतील वेटर्स , सगळ्या होस्टेस पण नऊ वारी मध्ये आणि विशेष म्हणजे सगळे प्रयत्नपूर्वक मराठी बोलत होते … कसं एकदम मस्त मराठमोळे वातावरण. नेहमीप्रमाणे काय मेनू आहे म्हणून पाहायला गेलो आणि पाहताच मागे वळून आईला हाक मारली. जे दिसलं ते पाहून माझ्या इतकी ती हि आश्चर्यचकित झाली. शेफिंग डिश मध्ये 'सोडे घालून केलेली वांगी बटाट्याची भाजी' आणि 'वालाचे बिरडे'… आणि ते देखील आपल्या घरगुती चवीचे. मुंबईतल्या एखाद्या पंचतारांकित हॉटेल मध्ये मराठी जेवणाचा बफेट असणे आणि त्यात सीकेपी जेवणाचा अंतर्भाव असणे हे बघूनच मी आणि आई खुश झालो होतो. कदाचित माझ्या आणि माझ्यासारख्याच कुणाच्या अभिप्रयाबरोबर लिहिलेल्या सूचनेचा त्यांनी विचार केला असावा. समोरच काचेआड एक सरदार शेफ उभा होता … हातवारे करूनच मी त्याचे आभार मानले. जेवण्यापूर्वीच जेवणाची स्तुती करणारा माणूस पाहून तो हि अचंबित झाला असावा.
सांगायचं इतकच कि सीकेपी किवा कोणत्याही खाद्य संस्कृतीचा प्रसार करायचा असेल तर त्याची मागणी पण करायला लागा. डिमांड असेल तर सप्लाय पण मिळेल. तुम्हाला काय हवंय याची काळजी जर रेनिसांस सारखे फाईव स्टार हॉटेल घेत असेल तर इतरही नक्कीच घेतील.
प्रयत्न तर करूयात …. कदाचित लवकरच मुंबईच्या अनेक रेस्टॉरेण्ट्स च्या मेनू वर तुम्हाला अनेक सीकेपी पदार्थ दिसतील आणि आपल्यासारख्या अनेक खवय्यांना पण त्याचा आस्वाद घेत येईल !
समीर गुप्ते
संस्थापक - सीकेपी फूड फेस्ट.

Saturday, 20 August 2016

Welcome to my Blog...SamHere

Hey Friends

Cheers and Greetings !

I take pleasure welcoming you all to my blog SamHere.

This is one more way to get connected to you all and express my heart. SamHere ... made up up of two words Sameer and Here but carrying the one message that connects the feeling of two people "same here" 

Though i am known to write passionately on food , i will also be covering few more subjects of social and cultural importance. Marathi, the language so closed to me, will more be the language of my blogs as i can express myself more as the words comes from within. 

Hope You all will enjoy this from me. Feel free to react and respond in the words you would love to use for a close friend.

Happy Reading ! 

Sameer Gupte