Friday, 11 November 2016

# My मराठी



भाषा... म्हणजे मराठी भाषा कशी टिकवावी हा एक मोठा प्रश्न आहे. काही प्रसंगी ऐकूनच बेशुद्ध पडू अशी भाषा आपल्याच माणसांकडून आणि आपल्यासमोरच सर्रास बोलली जाते.

प्रसंग एक -
स्थळ : माझेच घर ..
साधारण १० वर्षांपूर्वीची गोष्ट.  माझी मुलगी शाळेतून घरी आली. मी, माझी बायको, आई - बाबा असे सर्व तिची वाट पाहत बसायचो तसे त्या दिवशी पण बसलो होतो. ही आली आणि दप्तर सोफ्यावर भिरकावले. "मम्मा,आजपासून नवीन टीचर आली आहे - आमची सगळ्यांची फुल फाटलीये " असा बोलून ती धपकन सोफ्यावर बसली. हे वाक्य ऐकल्यानंतर मी आणि बाबा माझ्या मुलीकडे, बायको माझ्या आईकडे आणि आणि आई माझ्याकडे पाहू लागली. घरात पूर्ण सन्नाटा. मी आईकडे पाहताच आईने स्वतःला स्थिर ठेवत, शक्य तेवढ्या शांतपणे  "तिला फाटली या शब्दाच्या मागे कोणता शब्द आहे ते समजावून सांग मग तिला कळेल" अस म्हणताच "आजी, हे काय सांगणार मला, टीचर इतकी डेंजर आहे कि हे शाळेत आले तर यांची पण फाटेल". आता मात्र कमाल झाली. कस या मुलीला समजावू कि हे सगळं बोलणं चांगलं नाही..कुठे शिकली हे सर्व.

प्रसंग दोन -
स्थळ : माझी माजी बँक..
कुठल्यातरी तरी कर्जासाठी लागणारा महत्वाचा कागद घेऊन मी बँकेत गेलो होतो. केबिन मध्ये पाहिलं तर व्यवस्थापक साहेब काही लोकांबरोबर बोलत हॊते. त्यांना व्यत्यय नको म्हणून कर्ज विभागातल्या एक जुनिअर क्लार्क असलेल्या मुलीच्या हातात कागद देऊन आठवणीने साहेबांच्या सुपूर्त करावयास सांगितला. इतक्यात काहीही कारण नसताना बाजूच्या टेबलावरून एक सिनिअर मुलगी काम करता करता तिला म्हणाली ' ए बाई, विसरू नकोस मागच्यासारखी.. नाहीतर साहेब परत चढतील तुझ्यावर"... पुन्हा एक सन्नाटा...पण या वेळी फक्त माझ्या मनात .. त्या दोघीनांही यात आपण काही वेगळं बोलतोय याची सुतराम जाणीव नव्हती...'चिडतील' या शब्दाची जागा 'चढतील' या शब्दाने घेतली होती ... मी वळून साहेबांकडे पाहिलं...काही न बोलता बँकेतून बाहेर पडलो.

मराठी भाषेवरच्या इंग्रजी आक्रमणामुळे तर जे काही ऐकायला मिळतं काय सांगू.  'तुझ्या पॅंटीवर डाग लागलाय, शर्टाला व्हाईटनेसपणा पाहिजे ,तापामुळे खूप विकनेसपणा आलाय, मॉर्निगवॉक साठी चालायला गेलेत, केटरिंगची मोठी ऑर्डर मारली, वयामुळे आईच्या डोळ्यांची साईट वीक झालीये, उगीच डोक्याला हेडेक नको, पुढे जाऊन डावीकडे लेफ्ट घ्या, मोबाईल चा रिचार्ज मारला' हे नवजात शब्दसंच तर इतके अंगवळणी पडलेत कि ते आपल्या भाषेचाच एक भाग आहेत असा वाटायला लागलंय. कोकणातल्या काही घरात तर झोपताना  'दिवा विझव' म्हणण्या ऐवजी 'लाईट काढ' असं बोलताना मी स्वतः ऐकलंय. एक ना दोन ..अनेक प्रसंग, अनेक शब्द असे आठवतात की जर भाषेला आत्मा असेल तर तर त्याचा पण थरकाप उडेल.

मुंबईत राहणाऱ्या अमराठी लोकांची मराठी हा एक वेगळा विषय आहे. अतिशय प्रयत्नपूर्वक मराठी बोलून ते व्यवसाय करतात हे कौतुकास्पद आहे. पण कधी कधी मोठे विनोदही घडतात.

माझ्या ओळखीतले एक कन्नड गृहस्थ 'अचानक' हा शब्द इतक्यावेळा आणि इतक्याठिकाणी वापरतात काय सांगू. म्हणजे "उद्या संध्याकाळी ५ वाजता तुम्ही अचानक माझ्या ऑफिसला या. चहा पाणी पिल्ला कि आपण इंजिनीअर ला कळवून अचानक साईटवर जाऊ आणि गाडी पार्किंगमध्ये ठेवा, येतेवेळी तुम्हाला  खाली सोडून मी अचानक वर जाईन." हे संभाषण जर कोणी ऐकलं तर त्याला अचानक काहीतरी व्हायचं. हा कन्नड माणूस मराठी इतकं चांगल बोलतो म्हणून कौतुक करावं की मराठीची 'अचानक' वाट लावतो म्हणून झोडून काढावं कळत नाही.

जवळपास अमराठी वस्ती असलेल्या घाटकोपर, मालाड इथे राहणाऱ्या गुजराती माणसांनी पूर्ण शिकल्याशिवाय मराठी बोलूच नये या मताचा मी आहे. मी राहतो तिथे म्हणजे खारकर आळीत हा समाज खूप मोठ्या संख्येने आहे. अस्सल मराठी वस्तीत राहिल्यामुळे त्यांच्यावर मराठीचे संस्कार चांगले आहेत. तरीपण  दुसऱ्या गुजराती माणसाला माझी ओळख करून देताना काय सांगतात माहीत आहे "हे लै मोठा मानूस हाय..हेचा लै मोठ्ठा होल हाय - फुल्ली ऐरकंडिसन - चार पाच से माणस आरामसुन मावते .. सोरी एक नाय हा सोरी..  ४-५ होल हाय''...अरे कशाला...त्याला गुजराती मध्ये सांग ना. एकाच वेळी माझी, मराठीची आणि इंग्रजीची का वाट लावतोस. पण उत्साह दांडगा  मराठी बोलण्याचा.
 
याच्या बरोब्बर विरुद्ध ठाण्याच्या हरी निवास सर्कलवरचा क्वालिटी पेंटवाला सरदारजी - माझा मित्र परमजीत. इतकं सहज, सोप्प आणि अस्खलित मराठी बोलतो कि तुम्हाला वाटावं हा दाढी वाढवून फेटा बांधलेला गोडबोले किंवा केळकर आहे. माझा अनुभव हा आहे की एकूणच मुंबई पुण्यातली ही सरदार मंडळी मराठी उत्कृष्ट बोलतात.

एक मात्र नक्की..या सर्व मंडळींनी आपल्या मराठी भाषेला जवळ करून भाषेला नसलं तरी मराठी मैत्रीला समृद्ध केलंय. भाषा टिकवायला ती चलनात असणं गरजेचं आणि भाषा जपायला ती वापरणाऱ्या सर्वांचं कौतुक करत आपण त्यांचं करेक्शन करणं महत्वाचं.

समीर गुप्ते
samhere#sameergupte.blogspot.com#sameer6949@gmail.com

Wednesday, 2 November 2016

"सीकेपी म्हणजे ....."

सीकेपी म्हणजे फक्त खाणारे पिणारे असे समजणाऱ्या मंडळींसाठी सीकेपी समाजाची थोडीशी ओळख !

"सीकेपी म्हणजे ....."

या एक दोन महिन्यातील वेगवेगळ्या मोर्चांच्या वातावरणामुळे हल्ली लोक खूप चौकशी करू लागलेत हो. म्हणजे,तुम्ही कोणत्या जातीचे, तुम्ही सीकेपी सीकेपी म्हणजे नक्की कोण वगैरे. उत्तरादाखल मी सांगतोच की आम्ही चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजेच सीकेपी. साधारणपणे ठाणे मुंबई बाहेरच्या लोकांना हा प्रश्न पडतो. "अच्छा म्हणजे तुम्ही मच्छी खाणारे ब्राह्मण का ?" हे ऐकून तर मला गंमतच वाटते. अहो मच्छी खाणाऱ्या काही ब्राह्मणांनी आम्हाला कधीच मागे टाकलंय. आम्ही सोमवार गुरुवार तरी पाळतो. पण आमचे हे दाते, कुलकर्णी, रिसबूड,जोशी, देशपांडे या आडनावांचे घट्टमित्र तर सगळेच वार सारखेच म्हणत आम्हा सीकेप्यांनाच कुठे काय 'बेस्ट' मिळतं हे सांगतात. म्हणून वाटलं कि या चौकस मंडळींना थोडं आपल्याविषयी सांगावं. खरंतर जातीपातीचे दिवस आपल्या दृष्टीने काही दशकांपूर्वीच संपले असले तरी आपली ओळख देताना काही गोष्टी सांगणे गरजेचं. बघा तुम्हाला पटतंय का... सीकेपी म्हणजे .....

सीकेपी म्हणजे बाजीप्रभूंचा आवेश,
सीकेपी म्हणजे बाळासाहेबांचा आदेश,
सीकेपी म्हणजे गडकऱ्यांचे प्याले,
सीकेपी म्हणजे आमचे खळे काका आणि मोहिले

सीकेपी म्हणजे अवधूतच गाणं,
सीकेपी म्हणजे दिलखुलास जगणं,
सीकेपी म्हणजे नितांत सौंदर्याच लेणं,
सीकेपी म्हणजे बुद्धिमत्तेच खणखणीत नाणं

सीकेपी म्हणजे रविवारच मटण,
सीकेपी म्हणजे बोम्बलाच कालवण,
सीकेपी म्हणजे चीम्बोरीचा घट्ट रस्सा,
सीकेपी म्हणजे चवदार हातांचा रुचकर वारसा

सीकेपी म्हणजे निष्ठा ,
सीकेपी म्हणजे विश्वास,
सीकेपी म्हणजे भरवसा,
सीकेपी म्हणजे प्रगत समाजाचा खराखुरा आरसा

सीकेपी म्हणजे नितिमत्ता,
सीकेपी म्हणजे गुणवत्ता,
सिकेपी म्हणजे सीडीं ची विद्वत्ता,
सीकेपी म्हणजे क्रांतिकारी विचारांची सुबत्ता,

सीकेपी म्हणजे धैर्य,
सीकेपी म्हणजे शौर्य ,
सीकेपी म्हणजे संकटांशी दोन हात,
सीकेपी म्हणजे ताठ मानेने जगणाऱ्यांची जात

देशाच्या उभारणीत हिरहिरीने भाग घेणारा,कला क्रीडा मनोरंजन क्षेत्रात आपली अनोखी छाप पाडणारा, सरकारी प्रशासकीय सेवेत सदैव अग्रस्थानी असलेला पुरोगामी विचारांचा सुशिक्षितांचा हा समाज. स्वाभिमान आणि देशाभिमानापेक्षा जगात काहीही मोठं नाही हे जन्मापासूनच मनावर बिंबवलेला हा आमचा समाज. अल्पसंख्यांक असूनही आरक्षणापेक्षा देश रक्षणासाठी लढणारा आमचा हा समाज. आपल्या संभाषण चातुर्याने, बुद्धिवादाने आणि अर्थातच पाककौशल्याने इतर सर्व समाजबांधवांची हृदये काबीज करणारा हा आमचा समाज. खऱ्या अर्थाने नाती जोडून मैत्रीचे बंध दृढ करणारा आणि या देशाच्या इतिहासात अनेक गौरवास्पद पदे भूषविलेल्या दिग्गजांचा हा समाज. सर्वात महत्वाचे म्हणजे... तुमची जात, तुमचा धर्म कोणताही असो, चांगल्या कामासाठी आजही तुमच्यासाठी आणि तुमच्यापाठी भक्कमपणे उभा राहणारा, तुमच्या दुःखात हळहळणारा आणि सुखात समरस होणारा आमचा हा समाज. अजून काय सांगू.

एक लाख नसू कदाचित..पण लाखात एक नक्कीच आहोत!

माझ्या सर्वधर्मीय समाजबांधवांना, मित्र परिवाराला आणि तमाम देशबांधवांना आम्हा सर्व सीकेपी समाजबांधवां तर्फे हार्दिक शुभेच्छा.

समीर गुप्ते, ठाणे.
samhere#sameergupte.blogspot.in#sameer6949@gmail.com
( आवडलं तर फॉरवर्ड करा ...माझ्या नावासहित केलं तर मला पण आवडेल)

Thursday, 22 September 2016

ग्रँड मराठा

माझ्या तमाम मराठा समाजबांधवांचं मनस्वी अभिनंदन !
समाजबांधव यासाठी म्हणालो कि मी जरी जन्माने सीकेपी असलो तरी  भारतातल्या अमराठी राज्यात माझी ओळख महाराष्ट्रातील मराठा म्हणूनच असते. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या आलिशान अशा ' ITC ग्रँड मराठा' या हॉटेलमध्ये पाय ठेवल्यावर का कोणासठाऊक पण अभिमानाने त्या नावाकडे  परत परत पाहावेसे वाटते. वडील आवर्जून 'मराठा' नावाचे वर्तमानपत्र वाचत असत.घरी टीव्ही आल्यापासून गणतंत्र दिवस परेड मध्ये मराठा लाईट इन्फ्रंटरी चे करारी जवान पहिले कि आपल्यातलाच कोणीतरी सैन्यात असल्याचा अभिमान वाटायचा. जन्माने नसलो तरी मनाने तुमच्या समाजाशी खोलवर जुळल्याची भावना अजूनही तितकीच दृढ आहे. अभिनंदन तुमच्या शिस्तबद्ध आणि शांतता पूर्वक मोर्चासाठी. तुमच्यातलेच काही इतर पक्षांच्या मोर्चांमधे सहभागी होताना फारच बेशिस्त आणि अहिंसक वागतात हे कटू सत्य आहे पण याला छेद देत तुम्ही राष्ट्रीय संपत्तीचं कोणताही नुकसान न करता काढलेला मूक मोर्चा कौतुकास्पदच आहे..इतरांनीही निश्चितच शिकण्यासारखा आहे. असो.

वर वर पाहता अनेक मागण्या आहेत तुमच्या, पण नीट पाहता हा लढा आणि विषय तुमच्या आरक्षणाचा आहे. तो मांडा तुम्ही. आम्ही कोण नाही म्हणणारे. कदाचित काही क्षुल्लक मतांसाठी राज्यकर्ते तुम्हाला आरक्षण देतीलही आणि त्या नंतर तुम्ही आमच्यापेक्षा थोडे वेगळे असाल.  आपल्या वाट्याचं अजून काही तरी हिरावून घेतल्याची भावना आमच्या खुल्या वर्गातल्या उगवत्या पिढीला येईलच... पण समजूत काढू आम्ही त्यांची. या सर्व गडबडीत नाही म्हटलं तरी थोडा दुरावा येईलच आपल्या मैत्रीत पण तुम्ही मनाची तयारी ठेऊनच उतरला असाल या आरक्षणाच्या लढाईत. मैत्रीचं काय मोठं.  

खरं तर तुम्हा लढवय्यांची खरी ओळख आरक्षणापेक्षा संरक्षणाच्या लढाईसाठी होती,आहे आणि अखंड राहील. आमच्यासारख्या पिढीजात सरकार दरबारी इमाने इतबारे तुमची चाकरी करणाऱ्या मंडळींनी मराठा समाजाला कायम राज्यकर्ते म्हणूनच पाहिलंय. आमचे राज्यकर्ते,आमचे पालनकर्ते, आमचे शासनकर्ते, आमचे रक्षणकर्ते कधी तरी उठून आरक्षण मागतील हे स्वप्नातही नव्हते. पण ठीक आहे .. स्पर्धेच्या या युगात प्रत्येकाला स्वतःचे भविष्य घडवायचा अधिकार आहे आणि त्यासाठी कोणता मार्ग निवडावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आरक्षण मिळाल्यावर खरं पाहता तुमच्यातल्या अगदी थोडक्यानाच त्याचा लाभ होणार आहे पण त्यासाठी लढा तुम्ही सर्वच एकजुटीने  उभारताय हि पण साधी गोष्ट नाही.

लहानपणी पाहिलेला भालजी पेंढारकरांच्या छत्रपती शिवाजी या चित्रपटातील एक सिन आठवला. राजे पन्हाळ्यावरुन निसटले. घोडखिंडीत आल्यावर बाजीप्रभूंनी त्यांच्या निग्रही शब्दात महाराजांना विशाळगडाकडे निघायला सांगितले. राजे सर्व मावळ्यानिशी जोहरचा सैन्याचा मुकाबला करू इच्छित होते पण बाजी प्रभू देशपांड्यांच्या '' विजापुरी सेनेचा लोंढा खिंडिपार झाला तर सारी मराठेशाही  वाहून जाईल, या नोकराच्या इमानाची तमा बाळगा आणि विशाळगडावर सुखरूप पोहचा '' या आदेशरूपी विनंतीला मान देत त्यांनी पुढे जायचे ठरवले. भावविवश होऊन बाजी प्रभू चा निरोप घेतं असताना महाराजांच्या तोंडी स्मरणात राहणार एक वाक्य आहे "बाजी, मराठेशाहीचे मंदिर तुमच्या सारख्यांनी बांधलं " पुढे जे घडलं ते केवळ ऐतिहासिक आणि रोमांचकच. अतिशय अटीतटीच्या त्या लढाईत बाजी प्रभु देशपांडे यांनी स्वतःला त्या घोडखिंडीत "आरक्षित" करून स्वतःच्या प्राणाची आहुती देत महाराजांना आणि पर्यायाने मराठेशाहीला "सुरक्षित" ठेवले. चित्रपटात महाराजांच्या तोंडी  टाकलेल्या या वाक्याने,माझ्या समाजाचे स्फूर्तिस्थान असलेल्या बाजीप्रभूंसाठी असलेला आदर कमालीचा वाढून माझी छाती फुलून गेली. इथे या प्रसंगात बाजीप्रभू देशपांडे जन्माने कायस्थ असले तरी कर्माने मराठा होते. तुमचं आमच नातं इथून सुरु होतं मित्रानो.

असो, इतिहासतल्या गोष्टी ह्या शिकून मार्क मिळवण्यासाठी असतात, समाज जोडण्यासाठी नसतील बहुदा. आम्ही सीकेपी, बाजीं प्रभूंचे वंशज, संख्येने अल्प जरी असलो तरी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणारे नक्कीच नाही. स्वतःच्या कर्तृत्वावर, कौशल्यावर आणि बुद्धीच्या बळावर फक्त आपल्याच नाही तर इतर समाज बांधवांचाही आणि आधुनिक मराठेशाहीचा - अर्थात महाराष्ट्राचा उत्कर्ष करण्याची स्वप्ने आम्ही पाहतो. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगत 'मर्द मराठा' असे बिरुद अभिमानाने मिरवणारी भोसले, जाधव, म्हात्रे, घोरपडे, मालुसरे अशी अनेक नावे आमच्याच काय तर मराठी मातीत जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या हृदयात कायमस्वरूपी सन्मानाने 'आरक्षित' आहेत ... ती सरकारी कागदपत्रावर नोंदवून घेण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा !

इतिहासात तुमची ओळख लढवय्ये म्हणूनच आहे ...लढा कसला का असेना ... जिंकलंच पाहिजे तुम्हाला.. हरणारा आपला असला तरी काय फरक पडतो ?

राजकारणाला बाजूला ठेऊन लिहिलेला हा लेख  क्षणभर राजकारणाच्या पलीकडे जाऊन वाचाल ही अपेक्षा

जय महाराष्ट्र !

Monday, 19 September 2016

बायको !


गेले दोन तीन दिवस पाहतोय. तुम्ही पण पहिली असेल. फेसबुक आणि व्हाट्सअप वर एक पोस्ट खूप फिरतेय. हिरव्या , पिवळ्या, लाल, लवंगी, ढोबऱ्या अशा  वेगवेगळ्या प्रकारच्या मिरचा असलेला एक फोटो आहे आणि त्या खाली लिहिलंय ..'शोधा पाहू यातली आपली बायको कोणती आणि मिळवा मोठे बक्षीस' वगैरे. मला पण पाहताना खूप मजा आली आणि शोधू लागलो आपली बायको कोणती ते. हं हो, तीच ती जी जाडसर आणि पिवळट दिसते ती.... का ती लाल भडक तेज दिसते ती...कोणती म्हणायची ? काहीच  ठरवता येईना. म्हणून मोबाइल बाजूला ठेवला आणि विचार करू लागलो. विचार हाच कि काय मूर्खासारखा विचार करतोय मी.. बायकोची तुलना डायरेक्ट मिरचीशी ? बरं मिरचीचं असेल तर जाड पिवळी ढोबरी का ? लग्न करून घरी आणली तेव्हा तर नाजूक, सडपातळ, हिरवीगार ,टवटवीत तर होती ती. चायला आपणच तर नाही ना तिला लाल पिवळी ढोबरी आणि अशी कोमेजलेली बनवली. एक ना दोन ..अनेक विचार.

कसं आहे ना , कि बायको हा बऱ्याच जणांच्या थट्टेचा आणि मित्रमंडळींच्या बैठकीतील हमखास निघणारा विनोदाचा विषय असतोच असतो. आपली बायको कशी वेंधळी आहे, इतक्या वेळा सांगून पण अजून बावळटपणा जात नाही, इतकी शिकलीये पण अक्कल काडीची नाही, तिच्या मैत्रिणी कशा मॉडर्न आहेत, बावळट दिसणारी मेव्हणी  काय हुशार निघाली रे पण हि बया तशीच आणि  तिला न सांगताच कसं आजच्या पार्टीला आलो - आता बसली असेल वाट बघत हे सर्व रंगवून सांगण्यात धन्यता मानणारा एक मोठा वर्ग आहे. हा मिरच्यांचा फोटो पण याच वर्गातून , याच मानसिकतेतून आलाय हे नक्की.

'हि बायको नसती तर'  ह्या विषयावर निबंध लिहायची वेळ आली तर कदाचित शंभर पानी वही पण कमी पडेल तुम्हाला. खरंच खूप काही लिहावं लागेल हो. हिच्याशीच लग्न जमवण्यासाठी केलेली खटपट, लग्न जमल्यानंतरच्या भेटी गाठी, तिचा रागवा रुसवा, लाडाने तिची केलेली मनधरणी, लग्नासाठी तिच्या आवडी निवडी पाहून केली खरेदी, तिच्या येण्यासाठी आतुरलेले तुमचे घर, तिला आवडणाऱ्या रंगसंगतीचे पडदे, तुमच्या बजेट च्या पलीकडे जाऊनहि निवडलेले तिच्या आवडीचे हनिमून डेस्टिनेशन हे सगळं नक्कीच आठवेल बघा. घराची जमवाजमव करताना तिची पसंद, आपल्या घरच्यांना लावलेला लळा, आपलया मित्रमंडळींच्या आग्रहाखातर तिने बनवलेल्या काही खास पाककृती, अगदी तुमच्या कपड्यांमध्ये, केसांच्या ठेवणीमध्ये झालेला फरक, तुमच्या खाण्यापिण्याचे सांभाळलेले चोचले हे तर नोंदवावे लागतीलच त्या वहीत. कामावरून आल्यानंतर तुमच्या कानात सांगितलेली  ती गोड़ बातमी,  तुमच्या घरात येणाऱ्या  नवीन पाहुण्यासाठी केलेली जय्यत ती तयारी आणि तो आल्यानंतर त्याच्याकडे  पाहणारी तिची कैवल्यपूर्ण नजर, ते बाळ मोठ होत असताना त्याच्याकडे वटारलेले डोळे आणि तुमच्या त्या राजपुत्राने मिळवलेल्या भव्य यशानंतर तिच्या डोळ्यातले ते कृतार्थ भाव पण तर लिहावे लागतील त्या निबंधात. प्रपंच वाढताना केलेल्या परिश्रमांची आणि तडजोडींची मोजदाद तर ठेवलीच असेल तुम्ही .. नवीन घराच्या साठी दागिने दिले असतील तिने डोळ्यातले पाणी लपवत, लेकाला अमेरिकेला पाठवताना राहिल्या असतील अनेक पैठण्या दुकानाच्या शोकेसमध्येच, तिच्या आईसाठी नसेल पण तिच्या रक्ताचं नातं नसलेल्या तुमच्या आईसाठी तर नक्कीच जागली असेल अनेक रात्री हॉस्पिटलच्या बाकड्यावर... जागा आहे ना वहीत ..खूप लिहावं लागेल अजून.

अनेक लग्नसमारंभांना गेला असाल ना तुम्ही दोघे. मित्रांच्या कोंडाळ्यात बसून पहिले असेल तुम्ही तिला रुखवताकडे पाहताना. कशी वेगळीच दिसत होती हो  ती.  किती प्रेमाने सांगत होती सगळ्यांना तुम्ही भेट दिलेल्या त्या साडीबद्दल. साधी मोत्याची माळ तर घातली होती तिने पण सगळ्या गर्दीत आज कशी उठून दिसत होती.  श्रावणातल्या घरच्या सत्यनारायणाच्या पूजेत तुमच्या बाजूला बसून पदर डोक्यावर घेऊन तुळशीची ची पाने वाहताना तुमच्या हाताला केलेला स्पर्श आठवतो  का...झर्र्कन एक वीज स्पर्शून गेल्यासारखा. गाडीच्या प्रवासात न विसरता थर्मासमध्ये भरून घेतलेला तुमच्या आवडीचा मसालेदार चहा तुम्हाला भरून देताना किती कौतुकाने पाहत हॊतात हो तुम्ही तिच्याकडे. तुमची पहिली स्कुटर घेतली तेव्हा मागे बसून थोडीशी तुमच्यावर रेलून, तुमच्या उजव्या खांद्यावर हळुवार हात ठेऊन तुम्ही स्कुटर चालवताना छान दिसता हे सांगणारी हीच तर होती ... काही पाने या गुलाबी आठवणींची पण लिहाल तुम्ही.

पण याबरोबरच अकारण प्रगट झालेला तुमचा राग, तुमचा संताप, तुमची  बोलणी, तुमची चिडचिड, प्रसंगी तुमची अपमानास्पद हाडहूड सहन करत सुद्धा तिने स्वतःच्या स्वाभिमानाला आणि अस्तित्वाला विसरून घरातील सर्व वातावरण सुरळीत पूर्वपदावर आणलेले क्षण शब्दांत मांडाल का हो या निबंधात. राहू द्या, नाही जमणार तुम्हाला.

शोधा परत त्या मिरचांच्या फोटोमध्ये तुमच्या बायकोला ..नक्की तिथेच मिळेल ती.. आयुष्यात वाटेला आलेला सर्व तिखटपणा शोषत तुमचा संसार गोड करणारी...मग लाल, पिवळी, ढोबरी आणि जाड का असेना.

समीर गुप्ते.

Sunday, 11 September 2016

स्वप्न मराठमोळी !

"चवदार मराठा" या आलिशान अस्सल मराठी  रेस्टोरेंट कम बार मधून काल रात्री पार्टी केल्यावर घरी येऊन छान झोपलो होतो. कधी सकाळ झाली कळलंच नाही. सकाळी सकाळी दारावरची बेल वाजली ... कामधेनू डेअरीचे मालक गायकवाड काका स्वतः दुधाची पिशवी ठेऊन लिफ्ट मध्ये शिरताना दिसले. काका आज तुम्ही ? ''हो रे, गणपती आहे ना, आज एक मुलगा नाही आला " असे म्हणत ते लिफ्ट मध्ये शिरले.  मी पुन्हा झोपायला गेलो. पुन्हा बेल वाजली .. वरच्या मजल्यावरचे तांबे..आज त्यांच्या मोबाईल शोरूम च्या उदघाटनाची आठवण देण्यासाठी सगळ्यांची बेल मारत उतरत होते. काही मिनिटे जातायत न जातायत तोवर पुन्हा बेल घणाणली ... चायला आता कोण असे म्हणून दार उघडले तर नाना पाटलाचा म्हणजे आमच्या इस्त्रीवाल्याचा धाकटा मुलगा हातात कपडे घेऊन समोर उभा .. काय कामाला लावतो हो नाना या लहान मुलांना. आता दरवाजा हलकेच ओढून मी तयारीला लागलो. घरात पण सणानिमित्त काम काढले होते. आमच्या जाधवमामानी...म्हणजे वयाने फार मोठा नाही हा जाधव पण याला सगळे मामाच म्हणतात..सुतार कामाचे म्हणजेच फर्निचरचे काम सुरु केले होते. तो पसारा कमी कि काय म्हणून  परममित्र उम्या देशमुख नि  पेंटिंगचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन घराच्या भिंती खरवडायलापण सुरुवात केली होती. कामाला  जायचा तसा मूड नव्हता पण आमचे सारथी (ड्रायव्हरला खुश करणारा समानार्थी शब्द हो) जोशी काका चावी घेऊन खाली गेलेत हे कळलं होतं. काही महत्वाच्या कामासाठी  ऑफिसला जायलाच हवे होते. बायकोला टाटा करून निघताच ''दरवाजा उघडाच ठेव, प्रकाश मच्छीवाला यायची वेळ झाली आहे' असे म्हणाली. इमारतीच्या खाली उतरताच सिक्युरिटी वाल्या शिंदेनि कडक सलाम ठोकला... दसरा दिवाळी जवळ आली कि हि मंडळी जरा जास्तच जवळीक साधतात.

गाडीत बसून निघालो.. नेहेमीप्रमाणे मुंडे  पेट्रोलपंपावर पेट्रोल भरून गाडी परळ कडे निघाली. मुंबईच्या ट्रॅफिक ला तोंड देत ऑफिसाला पोहोचतो तर काय ... रात्री झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे इलेक्ट्रिसिटी नाही आणि फ्लक्चुएशनमुळे एसी बिघडलाय. बोंबला. आता बोलवा दामले इलेक्ट्रेशनला आणि मकु ला .. म्हणजे मराठे कुलींग्सला.  आज निघताना डब्बा मुद्दामच नव्हता घेतला.. ऑफिससमोरच्या आचरेकरांच्या 'रस्सा' या मालवणी  रेस्टोरेंट मध्ये फिश थाळी छान मिळते असा ऐकून होतो..म्हटलं आज ट्राय करूयात. तसही  विजेअभावी ऑफिसमध्ये काम होत नव्हत, स्टाफ बसूनच होता..दिवस फुकटच गेला म्हणायचा. जेऊन परतीची वाट धरली. येताना वाटेवरच दादर च्या चित्रा टॉकीज जवळ भिसे हलवाई चे फेमस दुकान दिसले . मुलांसाठी साठी काहीतरी घेऊ म्हणून जोशींना गाडी बाजूला लावायला सांगितली. पाहतो तर काय दुकानात आडसुळे बिल्डर्स चे मॅनेजर रहेजा साहेब पण मिठाई घ्यायला आलेले. मला पाहून रहेजा पण खुश झाले. समोरच्या  टी शॉपी  कडे बोट दाखवत म्हणाले चला साहेब चहा घेऊ. "कडक चहा - एकदा पिऊन तर पहा " अशी मस्त पाटी लिहिलेल्या दुकानाचा मालक समोर हसतच उभा होता. बैसक्या ??? साल्या तुझा कॅफ्फे आहे हा ? अस मी बोलताच रहेजा  म्हणाले ..केफे नका बोलू साहेब ..बैसकर  पिसाळतो...टी शॉपी बोला. चहाच्या पुड्या विकणाऱ्या श्रीपाद बैसकर ने  'बेस्टि' नावाचं प्रशस्त टी पार्लर थाटलं होतं.  मस्त गप्पा मारता मारता कडक चहा चा एक कप झाल्यानंतर कुठूनतरी जोरजोरात बायकोचा आवाज कानावर आला .. उठतोय्स ना ... चहा ओतलाय केव्हाचा ... उठ चहा गार होईल... च्या मारी स्वप्न  होतं हे सगळं? ... कमाल आहे यार,स्वप्न पण अशी काही मराठमोळी पडतात ना हल्ली काय सांगू. पहाटेची साकार होतात असे म्हणतात, पण सकाळची ?

जाऊदे स्वप्नात काय गुंतायचं ... ही  म्हणते चहा तयार आहे म्हणजे बनवारीलाल वेळेवर दूध टाकून गेलाय आणि पांडे ड्रायवर तर आलाच असेल खाली, हिरापरसाद ला  फोन करतो म्हणजे झटपट कपडे पाठवेल इस्त्रीचे.  बिस्वकर्मा कार्पेंटर आणि घनस्याम पेंटरची माणसं यायच्या आत मी आंघोळ उरकून घेतली. सिक्युरिटी वाल्या चौरासिया ला जयरामजीकी करून गाडीत बसलो. पल्ला मोठा आहे. मुंदडा पट्रोलपंपावरून पेट्रोल भरून पुढे परळ ..छे छे..  अप्पर वरली ला जायचंय ..आणि हो..आजचा लंच हिलसा मध्ये आहे..बंगाली स्टाईल तेही रहेजा बिल्डर कडे काम करणाऱ्या अडसुळे साहेबांबरोबर...या  जमलं तर आज माझ्या ऑफिसला  - 'बरिस्ता' मध्ये बसून 'आपला माणूस कुठे मागे पडतो' या विषयावर गप्पा मारत मारत छान कॉफी घेऊयात.

समीर गुप्ते


सूचना-यालेखाचाकोणत्याहीराजकीयघटनेशीसंबंधनाही.खात्रीसाठीसत्यपरिस्थितीआणिवास्तवतपासूनपहा.हालेखलहानसहानव्यवसायालातुच्छसमजणाऱ्याकाही मराठीबांधवानाआणिमुंबईतयेऊनकोणतेहीकामकरूनस्वतःचेभविष्यघडवणाऱ्यादेशबांधवालासमर्पितआहे.जयमहाराष्ट्र!

Wednesday, 7 September 2016

गणपती - माझा आणि तुमचा


त्याच्या मूर्तीकडे कितीही वेळा पाहून  किंवा एकटक न्याहाळून समाधान झालंय असं सहसा घडत नाही. डोळे भरून पाहतच बसावं असं ते लोभस रूप, दिव्यत्वाची साक्ष देणारे ते ओजस्वी डोळे, भान हरपून जाईल असे  तेजोवलय, नीटनेटकी ठेवलेली वळणदार सोंड, क्षणार्धात तुमच्या संकटांना हमखास नाहीसं करण्याची हमी देणारं ते स्मित, उदंड आशीर्वादाची उधळण करणारा तो गुबगुबीत हात आणि लहान मुलासारखा मोदकासाठी पुढे केलेला नाजूक हात, लाललाल  मखमली पितांबर आणि मऊशार गादी.  एका दृष्टिक्षेपातच 'सुखकर्ता' या विशेषणाला शंभर टक्के न्याय देणारा आणि संकटसमयी देवाचं नाव घ्यायचं झालंच तर डोळ्यासमोर सर्वप्रथम येणारा 'दुःखहर्ता', चौसष्ठ कलांचा अधिपती म्हणजेच माझा आणि तुमचा गणपती. त्याच्या मूर्तीरुपी अस्तित्वाने  भारलेलं आणि मंगलमय झालेलं वातावरण म्हणजे आपल्या घरातला गणेशोत्सव.

हा गणपती आपल्या मराठी लोकांच्या फारच जवळचा असल्यासारखं मला नेहेमी वाटतं. बघा न, बोलता येऊ लागल्यावर ज्या पध्दतीने लहान मुलाला  'गंपती' बोलायला शिकवल्यापासून ते मोठे झाल्यावरसुद्धा आपणही कधी याला अहो जाहो केल्याचं आठवत नाही. तुमच्याकडे गणपती आणला का रे पासून त्याला वेळेवर नैवेद्य दाखव वगैरे सर्व एकेरीत. माझ्या माहितीप्रमाणे भारतातील इतर भाषिक गणपतीला गणेशजी, गणेश महाराज, श्रीगणेश असे संबोधतात. आपणच जणू गणपती हा आपल्या रोजच्या बैठकीतला असल्यासारखे अरेतुरे करत असतो. गणपती कधी आहे रे? याचा अर्थ गणेशोत्सव कधी आहे, गणपतीला कपडे शिवायचेत - म्हणजे या सणानिमित्त आपल्याला कपडे घ्यायचेत, गणपतीला रंग लावायचाय - म्हणजे घरी रंगकाम करावयाचे आहे, गणपतीची साफसफाई चाललीये - म्हणजे घर धुवायला काढलंय,  गणपतीचं बुकिंग केल का? म्हणजे गावाला जायची तिकिटं काढली का हे सर्व अर्थ मराठी घरात अध्याहृतच असतात. काही दिवसांपूर्वी माझ्या ऑफिस मधले कामगार एकत्र पणे  समोर येऊन ' सर, गणपतीला सुट्टी पाहिजे' असे म्हणताच ' घेऊन दे कि त्याला सुट्टी, गणपतीचं तो, मी कोण अडवणार' असला फालतू विनोद मी केल्याचं मला आठवतंय.

हिंदुस्थानात एकही चित्रकार असा नसेल कि ज्याला गणपतीचे नेहेमीपेक्षा वेगळे रूप चितारायचा मोह झाला नसेल. रझा नावाच्या एक मुस्लिम चित्रकाराने आपली बोटे रंगात बुडवून तबल्याच्या तालावर काढलेल गणपतीचं चित्र माझ्या घरी आहे. अगणित रंगाची उधळण करत काढलेली चित्रे असोत व कुंचल्याच्या एक फटकाऱ्याने काढलेले चित्र असोत पाहताक्षणी प्रेमात पडावे असे  त्याचे रूप त्या कागदावर नक्कीच उमटलेले असते. सध्या काही उत्साही कलाकार तुमच्या नावाच्या किंवा आडनावाच्या अक्षरांनी गणपतीचे चित्र काढतात. मान खूपच तिरकी करून आणि अक्षरं जुळवत तुम्हाला ती वाचावी लागतात.   "पै" किंवा जोंधळेगावकर अशा आडनावांचा गणपती कसा बनेल हा विषय माझ्या कुतूहलाचा आहे.

सार्वजनिक गणपतीची वेशभूषा हा एक वेगळा विषय. या गणेशोत्सवानिमित्त कोणत्यातरी  देवाच्या किंवा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वाच्या रूपात गणपतीची मूर्ती बनवणारे आणि ती बनवून घेणारे भक्त पण अति उत्साहीच म्हणावेत. कृष्ण आणि रामाच्या रूपात ठीक आहे हो, पण साईबाबांच्या रूपात अंगावर त्यांच्यासारखे कपडे घातलेला, स्वामी समर्थांच्या रुपातला  बसलेला गणपती  किंवा अण्णा हजारे सारखा दिसणारा टोपी घातलेला गणपती असले भयानक प्रयत्न केल्याचे मी याचीडोळे पहिले आहे आहे. या वर्षी अजूनही 'पर्शा' च्या रुपातला सैराट गणपती दिसण्यात आला नाही हे माझ्यासारख्या भक्ताचे नशीबच म्हणावे. सार्वजनिक मंडळांसाठी घडवलेला शंकराच्या रुपातला रागीट  गणपती तुम्ही फेसबुकवर पाहिलाय का ? नसेल तर शोधून पहा . दणकट असे आठ हात, प्रत्येक हातात एक धारदार शस्त्र घेतलेला , त्वेषात उभा राहिलेला असा काही भयानक आणि रागारागानं पाहणारा बनवलाय कि विचारता सोय नाही. शत्रूंच्या नायनाट करणारा वगैरे असला तरी इतक्या रौद्र रुपातला बाप्पा नाही पाहावत आम्हाला. नवसाला पावणारा सार्वजनिक गणपती हा तर एक मोठा विनोद आहे. खरंच नवसाला पावत असेल तर लालबागच्या परिसरात चाळीत राहणारा माणूस आज बंगल्यात दिसला असता आणि तो गणपतीपण विसर्जनाच्या त्रासातून वाचला असता...नवसाला पावतो तर कायमस्वरूपी  देऊळच बांधा की.  काहीही करून व्हीआयपी पास मिळवून अशा गणपतीचे दर्शन घायचे हे फ्याड वाढत चाललंय हल्ली ...जाऊदे , सध्या हा विषय न्यायप्रविष्ट असल्याने याच्या वर अधिक न बोलणेच चांगले.

काही असो, गणपतीचा कोप होतो हे फारसे  ऐकिवात नाही म्हणून किंवा गणपतीने मुबलक स्वातंत्र दिलय म्हणून त्याच्या रूपाचं काहीही  करायचं हे मनाला पटत नाही. गणपती हा तोच आणि तस्साच असावा, लहानपणी गोष्टीत वाचलेला, शंकर पार्वतीने जन्माला घातलेला आणि आपल्या आजी आजोबानी आपल्या समोर मांडलेला, गुबगुबीत गादीवर लोड पाठीशी घेऊन मांडी ठोकून  बसलेला, केविलवाणा चेहेरा करून मागणीची भली मोठी यादी मनात घेऊन नमस्कार करणाऱ्या भक्ताकडे पण मोहकपणे हसणारा, म्हटलं तर निरागस बाळासारखा आणि म्हटलं तर घरातल्या ज्येष्ठ पुरुषासारखा.

गणपतीच्या चरणी लीन होत, त्याच्या भक्तीत तल्लीन होत, त्याच्या रूपात एकरूप होत, त्याच्या ठायी असलेला एकतरी गुण आपल्याला स्पर्शून जावा आणि आपल्या  सर्वांच्या आयुष्याचे सार्थक व्हावे या पेक्षा दुसरं काय मागू याच्याकडे ?

समीर गुप्ते 

Sunday, 28 August 2016

चवीची अनुभूती

बऱ्याचदा घरी एखादा खास पदार्थ खाल्ल्यावर आपण म्हणतो .. बनलाय चांगला पण चव मागच्या वेळेसारखी नाही बरं का. किती सहजपणे बोलून जातो आपण. बनवणाऱ्या व्यक्तीने काही दिवस आधी ठरवून आणि काही तास मन लावून बनवलेला असतो हा पदार्थ.. जीव ओतून केलेल्या या पदार्थावरची आपली एक कॉमेंट तिचा हिरमोड करायला पुरेशी ठरते आणि नव्याणव टक्के हा पदार्थ बनवणारी व्यक्ती तुमची आई किंवा पत्नी असते.

कशी असेल हो चव मागच्यासारखी सेम टू सेम. बाजारातून आणलेल्या जिन्नसांच सोडा पण इतरही अनेक गोष्टी कारणीभूत आहेत चवित बदल करण्यासाठी. मला सांगा, पूजेच्या दिवशी सत्यनारायणाचा प्रसाद आणि इतर दिवशी त्याच मापाने बनवलेला शिरा वेगळा का लागतो बरं. उन्हाळ्यात खाल्लेली आणि पावसाळ्यात खाल्लेली कांदा भजी वेगळी का लागते. कितीही लज्जतदार जेवणाचा पहिला घास आणि शेवटचा घास सारखाच लागतो का हो ?. नाही ना , कारण चवीची अनुभूती स्थलकालऋतू परत्वेच नव्हे तर तुमच्या मनस्थिती (मूड) वर पण अवलंबून असते, तुमच्या भूकेवर अवलंबून असते, तुमच्या त्या व्यक्तीवरच्या प्रेमावर पण अवलंबून असते. एरवी बघताक्षणीच फस्त होणारा पिठलं भात घरात घडलेल्या एखाद्या दुःखद प्रसंगा नंतर खाताना कुठे चवदार लागतो सांगा बरं. एखाद्याच्या व्यक्तीच्या विरहात किंवा आठवणीत 'अन्न गोड लागत नाही' असे म्हणतात ते यालाच. पदार्थाची चव तीच असते, तूम्हालाच बेचव किंवा वेगळी लागते.

कधी तुमची नववी-दहावीतली मुलगी पहिल्यांदाच तिच्या आईच्या देखरेखीत एखादी साधीशी भाजी बनवते...किती धांदल असते तिची .. काहीतरी नक्कीच कमी पडलेलं असतं त्या भाजीत. पण कसले खुश असता तुम्ही ...इथे कौतुकाच्या मसाल्याने त्या भाजीची चव बदललेली असते. कधी सणकून भूक लागली असते, तेव्हा घरातली शिळी भाकरी पण गोड लागते. रोजच्या घाईत ऑफिसला निघता निघता कसाबसा प्यायलेला चहा आणि सुट्टीच्या दिवशी आरामखुर्चीत पेपर वाचत घेतलेला तोच चहा परत 'घोटभर' प्यावासा वाटतो. कधी कधी लग्न होऊन गेलेल्या बहिणीकडे जेवताना तुम्हाला प्रत्येक घासागणीक तुमच्या आईच्या हातच्या चवीची आठवण येते.. टचकन डोळ्यात पाणी येतं आणि नंतरचा तो प्रत्येक घास त्या आठवणीत अधिकच चवदार होत जातो.

भुकेला धर्म नसतो, अन्नाला जात नसते, पण चवीला मात्र नातं असतं. खरंच सांगतो, चव फक्त पदार्थात नसते , चव मनात असते, चव प्रेमात असते, चव आठवणीत असते. चवीची अनुभूती घेण्यासाठी जीभ नावाचे एक वेगळे इंद्रिय जरी देवाने दिले असले तरी ती चवदार आठवणींचा अनमोल ठेवा जपण्यासाठी तुमच्या हृदयासारखी दुसरी जागा नाही. म्हणूनच हृदयात रुळणाऱ्या आणि जिभेवर रेंगाळणाऱ्या प्रत्येक चवीबरोबर एकातरी प्रिय व्यक्तीची आठवण नेहेमीच जपलेली असते. पटतंय ना तुम्हाला.

समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट.
#SameerGupte#ckpfoodfest#SamHere#chavdaar#funwriting#enjoyreading#sameergupte.blogspot.in#sameer6949@gmail.com