Thursday, 22 September 2016

ग्रँड मराठा

माझ्या तमाम मराठा समाजबांधवांचं मनस्वी अभिनंदन !
समाजबांधव यासाठी म्हणालो कि मी जरी जन्माने सीकेपी असलो तरी  भारतातल्या अमराठी राज्यात माझी ओळख महाराष्ट्रातील मराठा म्हणूनच असते. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच्या आलिशान अशा ' ITC ग्रँड मराठा' या हॉटेलमध्ये पाय ठेवल्यावर का कोणासठाऊक पण अभिमानाने त्या नावाकडे  परत परत पाहावेसे वाटते. वडील आवर्जून 'मराठा' नावाचे वर्तमानपत्र वाचत असत.घरी टीव्ही आल्यापासून गणतंत्र दिवस परेड मध्ये मराठा लाईट इन्फ्रंटरी चे करारी जवान पहिले कि आपल्यातलाच कोणीतरी सैन्यात असल्याचा अभिमान वाटायचा. जन्माने नसलो तरी मनाने तुमच्या समाजाशी खोलवर जुळल्याची भावना अजूनही तितकीच दृढ आहे. अभिनंदन तुमच्या शिस्तबद्ध आणि शांतता पूर्वक मोर्चासाठी. तुमच्यातलेच काही इतर पक्षांच्या मोर्चांमधे सहभागी होताना फारच बेशिस्त आणि अहिंसक वागतात हे कटू सत्य आहे पण याला छेद देत तुम्ही राष्ट्रीय संपत्तीचं कोणताही नुकसान न करता काढलेला मूक मोर्चा कौतुकास्पदच आहे..इतरांनीही निश्चितच शिकण्यासारखा आहे. असो.

वर वर पाहता अनेक मागण्या आहेत तुमच्या, पण नीट पाहता हा लढा आणि विषय तुमच्या आरक्षणाचा आहे. तो मांडा तुम्ही. आम्ही कोण नाही म्हणणारे. कदाचित काही क्षुल्लक मतांसाठी राज्यकर्ते तुम्हाला आरक्षण देतीलही आणि त्या नंतर तुम्ही आमच्यापेक्षा थोडे वेगळे असाल.  आपल्या वाट्याचं अजून काही तरी हिरावून घेतल्याची भावना आमच्या खुल्या वर्गातल्या उगवत्या पिढीला येईलच... पण समजूत काढू आम्ही त्यांची. या सर्व गडबडीत नाही म्हटलं तरी थोडा दुरावा येईलच आपल्या मैत्रीत पण तुम्ही मनाची तयारी ठेऊनच उतरला असाल या आरक्षणाच्या लढाईत. मैत्रीचं काय मोठं.  

खरं तर तुम्हा लढवय्यांची खरी ओळख आरक्षणापेक्षा संरक्षणाच्या लढाईसाठी होती,आहे आणि अखंड राहील. आमच्यासारख्या पिढीजात सरकार दरबारी इमाने इतबारे तुमची चाकरी करणाऱ्या मंडळींनी मराठा समाजाला कायम राज्यकर्ते म्हणूनच पाहिलंय. आमचे राज्यकर्ते,आमचे पालनकर्ते, आमचे शासनकर्ते, आमचे रक्षणकर्ते कधी तरी उठून आरक्षण मागतील हे स्वप्नातही नव्हते. पण ठीक आहे .. स्पर्धेच्या या युगात प्रत्येकाला स्वतःचे भविष्य घडवायचा अधिकार आहे आणि त्यासाठी कोणता मार्ग निवडावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आरक्षण मिळाल्यावर खरं पाहता तुमच्यातल्या अगदी थोडक्यानाच त्याचा लाभ होणार आहे पण त्यासाठी लढा तुम्ही सर्वच एकजुटीने  उभारताय हि पण साधी गोष्ट नाही.

लहानपणी पाहिलेला भालजी पेंढारकरांच्या छत्रपती शिवाजी या चित्रपटातील एक सिन आठवला. राजे पन्हाळ्यावरुन निसटले. घोडखिंडीत आल्यावर बाजीप्रभूंनी त्यांच्या निग्रही शब्दात महाराजांना विशाळगडाकडे निघायला सांगितले. राजे सर्व मावळ्यानिशी जोहरचा सैन्याचा मुकाबला करू इच्छित होते पण बाजी प्रभू देशपांड्यांच्या '' विजापुरी सेनेचा लोंढा खिंडिपार झाला तर सारी मराठेशाही  वाहून जाईल, या नोकराच्या इमानाची तमा बाळगा आणि विशाळगडावर सुखरूप पोहचा '' या आदेशरूपी विनंतीला मान देत त्यांनी पुढे जायचे ठरवले. भावविवश होऊन बाजी प्रभू चा निरोप घेतं असताना महाराजांच्या तोंडी स्मरणात राहणार एक वाक्य आहे "बाजी, मराठेशाहीचे मंदिर तुमच्या सारख्यांनी बांधलं " पुढे जे घडलं ते केवळ ऐतिहासिक आणि रोमांचकच. अतिशय अटीतटीच्या त्या लढाईत बाजी प्रभु देशपांडे यांनी स्वतःला त्या घोडखिंडीत "आरक्षित" करून स्वतःच्या प्राणाची आहुती देत महाराजांना आणि पर्यायाने मराठेशाहीला "सुरक्षित" ठेवले. चित्रपटात महाराजांच्या तोंडी  टाकलेल्या या वाक्याने,माझ्या समाजाचे स्फूर्तिस्थान असलेल्या बाजीप्रभूंसाठी असलेला आदर कमालीचा वाढून माझी छाती फुलून गेली. इथे या प्रसंगात बाजीप्रभू देशपांडे जन्माने कायस्थ असले तरी कर्माने मराठा होते. तुमचं आमच नातं इथून सुरु होतं मित्रानो.

असो, इतिहासतल्या गोष्टी ह्या शिकून मार्क मिळवण्यासाठी असतात, समाज जोडण्यासाठी नसतील बहुदा. आम्ही सीकेपी, बाजीं प्रभूंचे वंशज, संख्येने अल्प जरी असलो तरी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणारे नक्कीच नाही. स्वतःच्या कर्तृत्वावर, कौशल्यावर आणि बुद्धीच्या बळावर फक्त आपल्याच नाही तर इतर समाज बांधवांचाही आणि आधुनिक मराठेशाहीचा - अर्थात महाराष्ट्राचा उत्कर्ष करण्याची स्वप्ने आम्ही पाहतो. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगत 'मर्द मराठा' असे बिरुद अभिमानाने मिरवणारी भोसले, जाधव, म्हात्रे, घोरपडे, मालुसरे अशी अनेक नावे आमच्याच काय तर मराठी मातीत जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या हृदयात कायमस्वरूपी सन्मानाने 'आरक्षित' आहेत ... ती सरकारी कागदपत्रावर नोंदवून घेण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा !

इतिहासात तुमची ओळख लढवय्ये म्हणूनच आहे ...लढा कसला का असेना ... जिंकलंच पाहिजे तुम्हाला.. हरणारा आपला असला तरी काय फरक पडतो ?

राजकारणाला बाजूला ठेऊन लिहिलेला हा लेख  क्षणभर राजकारणाच्या पलीकडे जाऊन वाचाल ही अपेक्षा

जय महाराष्ट्र !

4 comments:

  1. Sameer.. Really a good write up.. Keep it up.. Abhay Gupte

    ReplyDelete
  2. Sameer, ckp chya lekhat C D Deshmukh pan add Kar.

    ReplyDelete
  3. Sameerji Khoop chhan lekhan ahe.
    Apale Hardik Abhinandan ....

    ReplyDelete