Saturday, 13 January 2018

दारू..म्हटलं तर नशा, म्हटलं तर मैत्रीची वाहती भाषा


सॅम, यार तू नेहेमी खाण्यावर लिहितोस कधी आपल्या पिण्यावर पण लिहून काढ ना.. माझ्या दोन व्हाट्सअप ग्रुप च्या मित्रांनी मला केलेली  विनंती ऐकून घसा कासावीस झाला. तसं पाहता मी काही सलीम दुराणी काका सारखा पब्लिक डिमांड वर सिक्सर मारणारा गडी नाही तरीही मी हे चॅलेंज घेतलंय.(बाय द वे, सलीम दुराणी काकांना पण बिअरचा ग्लास भरून देणारा भाग्यवान आहे मी)  तर काय म्हणत होतो मी, घसा कासावीस झाला.  सर्व साधारण अशा मागणीने मन  भरून येतं.  पण या ग्रुप ची नावं ऐकलीत तर तुम्हालाही कळेल मनामध्ये काय काय भरून येतं ते. एका ग्रुपचं नाव आहे 'चिअर्स' आणि दुसरा ग्रुप आहे 'गोवा चलो'. काय कल्पकतेनी नाव ठेवतात ही मंडळी.  नावातच फसफसणारी बिअर आणि समुद्रावरच्या धुंदीचा आनंद दडलाय. बरं तसं पाहिलं तर मी पण पितो, नाही असं नाही, पण म्हणून डायरेक्ट पिण्यावर लिहायचं म्हणजे थोडं जोखमीचं काम. म्हणजे एक तर मी लिहिलेलं त्या मद्यरसिक मित्रांना आवडलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे मी  लिहिलेलं बऱ्याच जणांच्या पचनी पडणार नाही, ते बोंबाबोंब करतीलच याची भीती. खरं पाहता ते पण पितात पण गपचूप, लपून, दुसऱ्याच्या पार्टीत, बाहेरगावी, बायको  गेली की वगैरे. पण आम्हा पट्टीच्या पिणाऱ्यांचं तस नाही. प्यायची तर राजरोस पण दररोज नव्हे.  प्यायची तर आपल्या मित्रांबरोबर, कुटुंबीयांबरोबर,  मर्जीने आणि मनापासून आणि अर्थातच जबाबदारीने. प्यायची तर आनंदाच्या मूडमध्ये, रागात आणि दुःखात नाही.  जसं उत्तम खाण्यासारख सुख नाही तसच उंची दारू पिण्यासारखा आनंद नाही. दारू,जरी स्कॉच किंवा सिंगल माल्ट जरी असली तरी तिचा उल्लेख पिताना दारू म्हणूनच जे करतात तेच खरे मद्यपी. मला तर हा मद्यपी शब्द पण खूप आवडतो .. त्या शब्दातच 'मद्य पी' असा आग्रह आहे. चल ड्रिंक घेऊ या असे बोलून घेतलेल्या द्रव्यात ती मजा नाही..नुसतं औपचारिक वाटतं. असो.

दारू पिताना माणूस नको इतका प्रामाणिक, प्रांजळ, प्रेमळ आणि दिलदार असतो. एक दोन पेग नंतर तर जगातली कोणतीही गोष्ट तो आपल्या मित्रांसाठी देऊ शकतो, नव्हे, उद्याच्या उद्याच द्यायची त्याची तयारी असते. जगाच्या पाठीवर चाललेल्या सर्व घडामोडींवर येथे साधकबाधक चर्चा होते इतकंच नव्हे तर त्याची सोल्युशन्स पण त्या टेबलवर तयार असतात .. दुर्दैवाने ट्रम्प, पुतीन वगैरे मंडळी वेळेअभावी या गुत्त्यांवर येऊ ना शकल्यामुळे जग फार चांगल्या चांगल्या सूचनांना मुकत असावं. इथे कोणी शत्रुत्व घेऊन प्यायला बसत नाही, इथे मिळत फक्त आणि फक्त प्रेम. आणि आग्रह ?, तो तर विचारूच नका राव. तुमच्या सासुरवाडीच्या लोकांनी पहिल्या सणाला पण केला नसेल असा आग्रह तुम्हाला फक्त दारूच्या टेबलवरच केला जातो.. आणि खरं सांगायचं तर हा आग्रह नुसता फॉर्मॅलिटी असतो..आग्रहाच्या आधीच ग्लास भरलेला असतो. बिअर ही दारू नसते, वाईन चढत नाही, वोडका बटाट्यापासून बनते आणि ते म्हणजे रशियाचं राष्ट्रीय पेय आहे, जीन फक्त लेडीज पितात, सिंगल माल्ट मध्ये सोडा घालणारे महामूर्ख हे सर्व ज्ञान तुम्हाला इथेच मिळते. इथे दिल्या जाणाऱ्या शिव्या कोणालाही कुठेही लागत नाहीत.. प्रत्येक घोटा बरोबर शिव्यांचा चाखणा नसेल तर काय मजा.

दारू पिताना अनेक विषयांचे,अनुभवलेल्या घटनांचे आणि नको असलेल्या  ज्ञानाचे पाट वाहात असतात. शेजारच्या बिल्डिंगमधल्या भाभीपासून ते सनी लिओनी पर्यंत, एखाद्या नगरसेवकापासून ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबद्दल, टुकार टेलिव्हिजन शो पासून ते अमिताभच्या मानधनाबद्दल  तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी तुम्हाला इथे ऐकायला मिळतात. त्यातच, आपण कसे सगळ्यांना क्लोज आहोत, आपण त्या त्या  प्रसंगी कसे वागलो, नाकाबंदी वाल्या पोलिसांना कसे पटवले, एखाद्या मित्राला घरी सोडायला गेलो असता त्याच्या बायकोने काय राडा घातला याच्या सुरस कथा तुम्हाला फक्त आणि फक्त दारूच्या टेबलावरच ऐकायला मिळतात. रामजी, कृष्णा, मीरा, शंकर, गणेश, भक्तिमंदिर, हृषीकेश, गंगा, अमृत अशा पावन नावांनी चालणाऱ्या या बार्स मध्ये पापी माणसाला पण शुद्ध करण्याची क्षमता असते.  ढसाढसा ढोसल्यानंतर ढसाढसा रडून आपल्या चुकांची कबुली देणारे अनेक मित्र आणि मोठ्या मनाने त्यांना माफ करणारे त्यांचे खरे मित्र तुम्हाला येथेच मिळतात. दर ग्रुपमध्ये एकजण तरी असा असतो की त्याची एखाद्या वेटरशी किंवा बार मालकाशी चांगली ओळख असते (किंवा असे भासवले जाते) साधारणपणे इथे सर्व ऑर्डर हाच देत असतो. याच ग्रुपमधला एक जण न पिता नुसता थम्सअप वगैरे पीत इतरांची मजा बघत असतो. नंतर इक्वल काँट्रीब्युशन करताना याची मजा बघण्यासारखी असते ..बघा तुम्ही. यातलाच  एखादा सगळ्या पिणाऱ्यांची जबाबदारी घेणारा असतोच असतो.. बस्स कर रे, तुला जास्त झालीय, त्रास होईल वगैरे हाच माणूस फुल्ल तऱ्हाट मोड मध्ये बोलत असतो. एखादा मित्र दारू पिऊन आऊट झाल्यानंतर त्याला परत शुद्धीत आणण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात ते कोणत्याही वैद्यकीय अभ्यासक्रमात पाहायला मिळणार नाहीत. लिंबू काय, पाव काय, डोक्यावर सोडा ओतणे काय किंवा त्याचे केस ओढणे काय सगळं कस शास्रोक्तपणे करतात. मुख्य म्हणजे या प्रसंगी बारमधले सर्व च्या सर्व तुमच्या मदतीला येऊन अजून काही उपाय करता येईल या याचापण विचार करतात. तो मित्र ओकला तरी त्याला फार गिल्टी वाटून न देण्याचं कसब इतरांकडे आपोआप येतं. एकूण काय, तर जगातल्या सर्व कटकटींपासून दूर नेणारी ही दारू म्हणजे तमाम मित्रमंडळांना सुखदुःख वाटायची एक छान संधी देते...खरं पाहता दारूच्या नशेपेक्षा मैत्रीचा बहर जास्त चढलेला असतो.

ठाण्याच्या एका बारमध्ये मी आणि एका मोठ्या कंपनीच्या उच्च पदावर असलेला माझा मित्र आपल्या देशाच्या एव्हिएशन इंडस्ट्री साठी इम्पोर्ट पॉलिसिज वर गहन चर्चा करत असता आमच्याच टेबलवर बसलेल्या दोन मित्रांचे बोलणे ऐकले.( हो,हो. काही बारमध्ये तुमच्या बाजूला दुसरे पण येऊन बसू शकतात, त्यांचं बिल आणि विषय वेगळे असतात तरीही पहिल्या आलेल्या ग्राहकाला त्रास होत नाही, ही आपलेपणाची भावना फक्त बारमध्येच पाहायला मिळते) हं तर आम्ही काही कोटीच्या गप्पा मारत असताना त्या दोघांमध्ये रिक्षाचा सायलेन्सर फाटल्यावर गण्या मेकॅनिक बेस्ट आहे कि सुलेमान बेस्ट आहे या विषयावर वर गंभीर चर्चा सुरु होती.ते ऐकून आम्ही धन्य झालो.  त्या दोन्ही रिक्षावाल्यानी नकळत आमचं विमान जमिनीवर आणून ठेवलं होतं. एक ना दोन अशा अनेक घटना तुम्हाला फक्त बार मधेच पाहायला आणि ऐकायला मिळतात.

माझा हा लेख दारू ला लोकप्रिय करणे किंवा दारूचे उदात्तीकरण करणे या उद्देशाने लिहिलेला नसून,माझी बोली भाषा समृद्ध करणाऱ्या त्याच टेबलावरच्या माझ्या मित्रांच्या विनंतीला मान देऊन लिहिण्यात आलेला आहे याची टीकाकारांनी नोंद घ्यावी. जास्त जहरी टीका केल्यास, तुमच्या टीकेला उत्तर द्यायला वरीलपैकी कुठेही तुम्हाला आमंत्रित केले जाईल याचीही तयारी ठेवा.  

शेवटची दोन वाक्य माझ्या आणि एकूणच दारू या विषयाचा आनंद घेणाऱ्या मंडळींसाठी.
दूर गेलेल्या नात्यांना जोडते ती दारू, मात्र जोडलेली नाती दुरावण्यास ती कारणीभूत होऊन देऊ नका आणि जेव्हा कधी प्यायला बसाल  तेव्हा या पीण्याशिवाय, "घरची ओढ" नावाची एक जगावेगळी नशा आहे हे विसरू नका. 

Wednesday, 3 January 2018

प्रिय प्रसाद,



प्रिय प्रसाद,
तुझ्या जगण्यात आणि वागण्यात प्रचंड विरोधाभास आहे.
तू प्रचंड हुशार आहेस तरीपण विनम्र आहेस.
तू मोठ्या हुद्द्यावर काम करतोस तरी पण लहानांची काळजी घेतोस.
तुझं आयुष्य अतिशय नीटनेटके चालू असतानाही तुला समाजाप्रती नको तितकं देणंघेणं आहे.
तू आंतरराष्ट्रीय पातळीवरचा मानमर्तब मिळवलेला एक उच्चशिक्षित विख्यात माणूस आहेस तरी देखील माझ्यासारख्या जेमतेम ग्रॅज्युएट झालेल्या मित्रांना जवळ बाळगून आहेस. एका आंतरराष्ट्रीय बँकेच्या मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत माझ्यासारख्या मित्राच्या ध्येयाला स्वतःच स्वप्न समजून त्याचा पाठपुरावा करण्यास तू कसा काय वेळ काढतोस हे तुझं तुलाच माहित.
 एरव्ही सुटाबुटात फिरणारा आणि कचकचून बांधलेला टाय मिरवणारा तू गणपतीच्या पूजेला मात्र सोवळं आणि उपरणं ही तितक्याच सहजतेने कॅरी करतोस हे पाहूनसुद्धा विश्वास बसायला काही मिनिटे लागतात. एखाद्या बँकिंग फायनान्स च्या कॉन्फेरंस मधले तुझे प्रेझेंटेशन तू जितक्या सहजतेने हाताळत असशील तितक्याच सहजतेने एकदाही पुस्तकात न पाहता कधीही न ऐकलेल्या ३०/३५ आरत्या तू कशा काय बोलू शकतोस हे पण एक कोडं आहे. एरव्ही स्वतःसाठी पण वेळ नसलेला तू गणपतीसाठी चक्क ७ दिवस सुट्टी घेतोस हे गणपतीशिवाय कोणाला पटणार नाही. कामानिमित्त अर्धे आयुष्य विमानात घालवणाऱ्या, पंचतारांकित आयुष्य जगणाऱ्या तुझ्यासारख्या हायफ्लायर माणसाला आजही ऑफिसला जाताना घरून आईने दिलेला भाजी चपातीचा डबा ताज च्या जेवणापेक्षा प्रिय वाटतो हे मी याची डोळा पाहिलंय...नुसतं पाहिलं नाही तर तुझ्या डब्यातलं जेवलोय सुद्धा.
प्रसाद, तू माझा मित्र आहे हे तुझ्यासाठी फार मोठं नाही ..पण कोणत्याही क्षणाला तू आपल्या मैत्रीला जागतोस हे माझ्यासाठी खूप काही आहे. आईच्या ७५ व्या वाढदिवसाच्या वर्षी तिला भेट म्हणून ओलीन बिसिनेस स्कुल मधून मिळवलेली असाध्य अशी ग्लोबल एक्झिक्युटिव्ह एमबीए या भल्यामोठ्या पदवीची भेट देतोस, किती कृतकृत्य वाटत असेल तिला. मुंबईतली अनेक मोठी प्रस्थ, अनेक नामांकित उद्योजक आणि हिंदी चित्रपट सृष्टीत चार पिढ्या गाजवणारे एक दिग्गज घराणे तुझ्या मैत्रीच्या घट्ट नात्यात आहेत .. तरीदेखील तूझा पाय जमिनीवर आहे. मित्रा तू खूप मोठा आहेस पण दाखवत नाहीस ..तू उत्तुंग जगतोस पण साधा वागतोस ..
खरंच तुझ्या जगण्यात आणि वागण्यात मोठा विरोधाभास आहे.
तुला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ! तुला नववर्षाच्याही अनेक शुभेच्छा !! आज तू परदेशात आहेस, येशील तेव्हा दोन्ही एकत्र साजरे करूच !!
Cheers Bro..! Proud to be your close friend !

Bhima Koregaon War

चला थोडा इतिहास उकरूयात 
महाराष्ट्राला २०० वर्ष मागे नेऊयात !

#dirtypolitics #shame
  

रंग भगवा,
हिरवा अन निळा
आम्ही गर्वे  मिरवला,
उरला रंग काळा 
हृदयी घट्ट रुजवला !

Tuesday, 2 January 2018

ठाण्याच्या तहसीलदार कचेरी कँटीन ची मामलेदार मिसळ

हे असं मोठ्ठ टायटल लिहिण्याचं कारण म्हणजे मामलेदारवरचं प्रेम, दुसरं काही नाही. आम्ही ठाणेकर मिसळ खायला जायचं असल्यास , येतो का मामलेदारला'  इतकंच बोलतो. आज अनेक ठिकाणी सुप्रसिद्ध मामलेदार मिसळ असे  बोर्ड लावलेले पाहतो. पण ज्या जागेवर मनापासून प्रेम केले त्या गर्दीच्या आणि कायम गजबजलेल्या ठाण्याच्या तहसीलदार कचेरीच्या कँटीन मध्ये, जे आता फक्त मामलेदार मिसळ म्हणून ओळखले जाते, तिथे आणि फक्त तिथेच जाऊन मिसळ नव्हे तर कमीतकमी दोन मिसळीवर ताव मारतो. तसं पाहिलं तर थोड्याशा एलिट क्राउड साठी यांनी आमंत्रण नावाचे एक छान हॉटेल देखील बाजूलाच सुरु केलंय. पण इतकी सोफिस्टिकेटेड मिसळ खाण्याची सवय नाही अजून जडली मला .. गर्दी गचडीतली, खिशात पैसे आहेत कि नाही हे चाचपत लाईनीत उभं राहून जागा मिळवलेली आणि प्लॅस्टिकच्या करड्या रंगाच्या बशीतली तीच मिसळआजही  छान वाटते.

तसं पाहता आजवर हजारो लोकांनी या मामलेदार मिसळीची रम्यकथा किंवा महती तुम्हाला सांगितलीच असेल त्यात मी नवीन ते काय सांगणार. पण तरी देखील 'खाल्ल्या मिसळीला जागायलाचं हवं' म्हणून हा एक प्रयत्न. तर या मामलेदार मिसळ अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या मिसळ सम्राटाकडे एक भलं मोठं मेनू कार्ड म्हणजे मेनू फलक पण आहे. एकूण ५२ पदार्थ असलेल्या या मेनूबोर्ड वरचे दोनच पदार्थ इथे चालतात ..एक मिसळ आणि दुसरा त्यावरचा उतारा म्हणजे ताक. उताराच म्हणूया.. कारण एकदा लालेलाल मिसळ खाल्यानंतर तुमच्या आत्म्याला शांत करणारं या जगात काही असेल तर ते थंडगार ताकच  असतं.

मामलेदारची मिसळ जरी बोर्डावर एकच असली तरी वेगवेगळ्या तिखटाच्या मापात मोजली जाते.. म्हणजे  लाईट, मिडीयम, मिडीयम बिगर बटाटा, रेग्युलर मिसळ आणि तिखट. यातली लाईट मिसळ म्हणजे  ज्यांच्यात (दुसऱ्या दिवशी त्रास सहन करण्याची) डेरिंग नसते पण मामलेदारची मिसळ खाल्ली आहे असं गावभर मिरवायचं असतं त्यांच्यासाठी. मिडीयम मिसळ म्हणजे, खातो पण उद्या ऑफिसला जाताना लफडा नको अशा मंडळींसाठी योग्य असलेली मिसळ.  मिडीयम बिगरबटाटा म्हणजे, आम्ही येथे नेहेमीच येतो आम्हाला मिसळमधलं कळतं अस दाखवणाऱ्यांसाठी बटाटा नसल्यामुळे थोडी अधिक तिखट झालेली मिसळ.  रेग्युलर मिसळ म्हणजे, मेनू बोर्डवर मिसळपाव या सदरात मोडणारी आणि इथे पहिल्यांदाच आलेले, लाईट मिडीयम असले प्रकार माहित नसलेले आणि दुसऱ्यांच्या टेबलावर बघून ऑर्डर देणाऱ्या मंडळींची लाडकी मिसळ.  आणि सर्वात शेवटी तिखट मिसळ .. हे खाणारे लोक म्हणजे टॉप क्लास मिसळ नव्हे तिखट खवय्ये. विषही दिले तरी पचवतील अशा दिसणाऱ्या या मंडळींच्या एकूण अवताराकडे पाहूनच त्यांची तिखट खाण्याची कपॅसिटी कळते. इथे आपला टिकाव लागणं शक्यच नाही, भलते साहस नकोच.

साधारणपणे रेग्युलर मिसळ खाणाऱ्या माणसाची काय अवस्था होते ते सांगतो. हा माणूस आल्याआल्या 'दोन मिसळ घे रे' अशी एकदम कडक ऑर्डर देतो. मग मिसळ येईपर्यंत इथे तिथे बघत बसतो तोच टेबलावर दोन काचेच्या बशा आपटून त्यात दोन दोन पाव ठेवले जातात. मिनिटा दोन मिनिटात  लालबुंद तवंग असलेला खतरनाक रंग पांघरलेली, मधूनच डोकावणारी शेव दिसणारी आणि वर मस्त कांदा लेऊन नटलेली आणि कोणत्याही ट्रे शिवाय फक्त बोटांच्या साहाय्याने आणलेली एक खोलगट डिश तुमच्या टेबलावर अवतरते. नाही नाही.. लगेच खाऊच शकत नाही तुम्ही राव. त्यातले दोन रुतवलेले चमचे काढणं पण दिव्य असतं ..मिसळ सांडण्याची हमखास शक्यता. नंतर 'काय मस्त ना' अशा एक्प्रेशन नी मिसळपाव ग्रहण सोहळा सुरु होतो. पहिल्या दोन चार घासापर्यन्त आयुष्य अतिशय सुंदर असतं, नंतर मिसळ तुमच्या सर्व शरीराचा ताबा घ्यायला सुरुवात करते. तुम्ही वर बघता.. पंखा सुरूच असतो. 'जमतंय ना रे हे तिखट तुला' असं बरोबर च्या मित्राला विचारलं जातं.  घासागणिक मिसळ कोरडी होत जाते. समोर बसलेल्या गिऱ्हाइकाने ऑर्डर दिली म्हणून ' दोन रस्सा घे रे' ही तुमची ऑर्डर तुमचा जवळजवळ सत्यानाश करते. रस्सा तर मिसळीपेक्षा तिखट. खा लेको. कपाळावर घाम साचलेला, नाकातलं पाणी टेबलावर पडण्याच्या तयारीत, डोळे तर ऑलरेडी वाहायला लागलेले, जिभेला चरचर आणि थोबाडाला आग लागलेल्या परिस्थितीत तुम्ही रुमाल काढता. पांढराशुभ्र रुमाल क्षणात रंग बदलतो.. एव्हाना तुमच्याकडून ताकाची ऑर्डर नकळत गेलेली असते. ताक तुम्हाला क्षणिक शांती देत खरं पण खाल्लेली मिसळ पुढच्या २४ तासात तुमचं  अंतर्बाह्य शुद्धीकरण करण्याच्या तयारीला लागलेली असते. बिल फार मोठं येत नाही हाच काय तो मोठा आनंद. हॉटेलच्या गल्ल्यावर सर्व ऋतूत,सर्व हवामानात, सर्व परिस्थितीत, सकाळ संध्याकाळ कधीही शून्य एक्स्प्रेशन घेऊन लेंगा शर्ट घालून बसलेले लक्ष्मणशेट एकही शब्द न बोलता उरलेले पैसे परत देतात. त्यांच्या बाजूला नेहेमीच कोणी ना कोणी कायम उभा असतो,
त्यांना बरंच काहीतरी सांगत असतो आणि त्यालाही लक्ष्मणशेटची उत्तरे तशीच हावभावशून्य. पण अतिशय सज्जन माणूस. खरं सांगतो मी हजार दीडहजार वेळा त्यांच्याकडे गेलो असेन पण त्यांची माझी साधी ओळखही नाही .. किती जणांशी ओळख ठेवणार हो ते. ज्या नव्या पिढीला मामलेदार म्हणजे काय हे माहित नाही ते बहुदा यांनाच मामलेदार नावाचे कोणीतरी समजत असावेत.

मामलेदार मिसळीचे अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे ही  मिसळ तुम्ही कधीही खाऊ शकता. तुमचा कोणी ठाणे नगर पोलीस चौकीत लॉकअप मध्ये असताना, तहसिदार कचेरीत डोमेसाइल सर्टिफिकेट काढायला जाताना, स्टेशनरोड वर खरेदीला जाताना इतकंच नव्हे तर मागच्या रस्त्याला असलेल्या स्मशानात एखाद्याला पोचवल्यानंतर पण मिसळ खायला जायची प्रथा सध्या जोरात आहे.. मी तर आजच माझे जेष्ठ मित्र सुधाकर वैद्यांना स्मशानातून डायरेक्ट तिथे घेऊन गेलो होतो. पाहतो तर काय, स्मशानतला सगळा माणूस तिथेच. अहो आमच्या मामलेदार मिसळची लोकप्रियता दुसरं काय.

मला अजूनही प्रश्न पडतो की ते मेनू बोर्डवरचे उरलेले ५० पदार्थ कोण खात असेल. गेलात तर बोर्ड वाचून पहा.. पण जा नक्की. मामलेदार मिसळीच्या तिखटपणातला गोडवा तुम्हाला परत परत बोलावल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मी देतो, बघा तुम्ही.

-समीर गुप्ते

Image Source - Google 

Wednesday, 13 December 2017

नाव नसलेलं, तरीही नाव कमावलेलं - सीकेप्यांचं 'निनावं'


''ए तुम्ही सीकेपी व्हेज खाता का रे ?'' या खोचक (तरीही आम्हाला अभिमानास्पद) प्रश्नाला होकारार्थी उत्तर मिळाल्यानंतर समोरचा माणूस कसला चमकतो सांगू. इतकंच नाही तर आम्ही सीकेपी व्हेज बरोबर गोडधोड पण चवीने खातो हे सांगितल्यावर ही धक्का बसलेली मंडळी सावरण्याआधीच परत कोसळतात. ''हं, ते गोड म्हणजे श्रीखंड वगैरे ना ?'' उगीचच आपल्याला कळतं हे सांगण्याचा अट्टाहास करत परत उभं राहायचा प्रयत्न होतो. पण यालापण निरुत्तर करणारं उत्तर आहेच आपल्याकडे - अहो 'आम्हा सीकेप्यांचं निनावं'. 'निनावं ? हे काय नाव आहे ?' या प्रश्नानंतर आपली सटकते आणि मग सुरु होतं निनावं महात्म्य.
निनावं - सीकेपी सुगरणीच्या पाक कौशल्याला दाद मिळवणाऱ्या ज्या हजारो पदार्थांचा जन्म झालाय त्याच्यात सर्वोच्च शिखरावर असणारा जो 'नावा'जलेला पदार्थ तो म्हणजे निनावं. इतके पदार्थ, इतक्या पाककृती, इतके खाण्यापिण्याचे लाड करत करत हा बिननावाचा पण नामचीन पदार्थ या पृथ्वीतलावर कसा अवतरला याचे मात्र आमच्याकडे उत्तर नाही. कदाचित प्रयोगशील गृहिणीमुळे किंवा कदाचित स्वयंपाकघरातील एखाद्या अपघातामुळे तयार झालेला हा पदार्थ असावा. अनेक पदार्थांचे नामकरण होऊन आता काय नाव ठेवायचे या विवंचनेत असलेल्या त्या भांबावलेल्या गृहिणीने 'निनावं' हे नाव मात्र कल्पकतेनेच ठेवलंय. नुसतच खाण्यात नाही तर खाताना जाणवणाऱ्या एका प्रेमाच्या गोडव्याने निनावं हा गोड पदार्थांमधलं एक अव्वल स्थान प्राप्त करतो. तसं पाहिलं तर फक्त गव्हाच्या आणि चण्याच्या पिठात तूप, गूळ. वेलची, जायफळ आणि त्यावर नारळाचं दूध या साध्याश्या मिश्रणातून बनलेला हा असाधारण पदार्थ. कृती पण अतिशय सोप्पी. लहानपणी कोळशाच्या शेगडीवर केला जाणारा आहे पदार्थ आता मात्र गॅस च्या चुलीवर बनतो. पण त्यावेळच्या तव्यावर ठेवलेल्या भांड्याच्या झाकणावर असलेल्या निखाऱ्याच्या धुराचा 'स्मोकी फ्लेवर' अजूनही मनात रुजलाय. दर पाच मिनिटांनी स्वयंपाक खोलीत जाऊन 'झालं का गं निनावं, झालं का गं निनावं' अशी गोड भुणभुण आईच्या मागे लावण्यातला आनंद काय असतो हे कदाचित आजच्या पिढीला कळणार नाही. कदाचित श्रावणात पुजलेल्या जिवतीच्या चित्राजवळ ठेवलेल्या नारळाच्या दूधामुळेच या निनाव्यात आईच्या ममतेचा गोडवा येत असावा. श्रावणाच्या शेवटी दाटा या सणाला पाहिजेच असलेले हे निनावं आणि त्याबरोबर खमंगअळू वडी हे भन्नाट कॉम्बिनेशन करून घरच्यांना देणे हा प्रत्येक सीकेपी गृहिणीचा एक आनंदोत्सव असतो. निनावे बनताना घरात जो सुगंध दरवळत असतो त्याला कोणत्याही सुगंधाची उपमा देणं शक्यच नाही.
निनावं बनल्यानंतर ज्यांच्याकडे खूप म्हणजे खूपच संयम आहे ते त्याच्या लोभस रुपाकडे पहात त्याच्या वड्या वगैरे व्हायची वाट पाहतात. आमच्यासारखे आचरट खादाड निनावंप्रेमी 'जरा बघू थोडंसं' म्हणून भांड खाली उतारताक्षणीच सुरुवात करतात.
काही पदार्थांबद्दल जास्त न बोलता ते फक्त आणि फक्त खाऊन तृप्त होणे या पेक्षा सुख ते काय... निनाव्याचं पण असंच आहे. तुम्ही जितके बोलाल तितकी आठवण येऊन स्वतःलाच त्रास होईल .. त्यापेक्षा आज निनाव्याचा बेतचं करून बघायला काय हरकत आहे. नव्या पिढीला निनावं आवडावं यासाठी 'निनावं मूस केक' यासारखा नाविन्यपूर्ण पदार्थ सीकेपी फूड फेस्ट मध्ये शेफ यशोधन देशमुख ने साकार केल्याचं तुम्ही ऐकलं असेलच. आपण कौतुकाने एखाद्याला निनावे खायला दिल्यानंतर 'हे थोडं मोहनथाळा सारखा लागतं नं' अस जर कोणी बोलला तर त्याच्या हातात उरलेलं निनावं परत घ्यायला क्षणभर पण कचरू नका .. ज्याने आपल्या अस्तित्वासाठी स्वतःच्या नावाचाही कधी हट्ट धरला नाही त्या मोठ्या मनाच्या 'सीकेपी' निनाव्याला मान द्यायला इतकं तर करूच शकतो आपण.. गम्मत म्हणून लिहतोय हो.. नाहीतर खरंच हिसकावून घ्याल. अहो निनावं म्हणजे फक्त सीकेप्यांच्या स्वयंपाक घरातला गोड पदार्थ नाहीये, निनावं म्हणजे आपल्या पाककलेचा आणि पाहुणचाराचा गोडवाच जणू. खाऊ द्या त्यांना निनावं.
समीर गुप्ते
संस्थापक - सीकेपी फूड फेस्ट

Saturday, 4 November 2017

वेध एकवीरेच्या दर्शनाचे, भाग्य सीकेपी समाजाचे !


सीकेपी समाज हा खरंच भाग्यशाली म्हणावा लागेल. म्हणजे कसं आहे नं की काही समाजबांधवांकडे पाहिलं तर कोणत्या कोणत्या कारणासाठी यांचे मेळावे, मोर्चे, उपोषणं, निदर्शनं चालू असलेले दिसतात. यांना एकत्र आणण्यासाठी एखादा नेता किंवा मग एखादा झेंडा याचा आधार घेतलेला आपण पाहतो. परंतु सर्वगुणसंपन्न आणि पुरोगामी विचारांच्या सीकेपी समाजाला एकत्र यायला ना कोणा नेत्याची गरज, ना कोणत्या झेंड्याची आणि ना ही कोणत्या घोषणेची. नोकरीपेशा आणि व्यवसायासाठी देशभर विखुरलेल्या या समाजाला कोणत्याही कारणाशिवाय एकत्र आणण्यासाठी साक्षात कुलस्वामिनी एकवीरा देवी धावून आली आहे तो समाज भाग्यशाली नाही तर काय. बघा ना, एका नवजात संस्थेचा एक कार्यकर्ता आपली संकल्पना मांडतो काय, तीला स्वीकारून ती संस्था त्या संकल्पनेला लोकांसमोर ठेवते काय आणि मग त्याला प्रचंड प्रतिसाद देत समस्त सीकेपी समाज आई एकविरेच्या छत्रछायेखाली एकवटण्याचं ठरवतो काय .. सगळं कसं स्वप्नवत. कल्याणच्या सीकेपी संस्थेने पुढाकार घेऊन केलेल्या या उपक्रमाबद्दल सर्व ज्ञातीतर्फे त्यांचे आभार मानावे तितके कमीच परंतू एकविरेच्या कृपेने ज्याने ही कल्पना मांडली त्याचे जाहीर कौतुक केलेच पाहिजे...माझ्या माहितीप्रमाणे डोंबिवलीचा माझा मित्र विजय देशमुख हाच तो ज्ञातिबांधव आहे ज्याच्यामुळे आज आपण सर्व आई एकविरेच्या चरणी तिच्या मुलांसारखे 'एक दिवस कायस्थांचा' ही संकल्पना साकारण्यास एकत्र येत आहोत.
कधी नव्हे इतक्या मोठ्या संख्येने आपण तिच्या कडे जातोय ... काय मागावं बरं तिच्याकडे ? भपकेबाज नोकरी, भरभराटीचा धंदा, आलिशान घर, भली मोठ्ठी गाडी, मुलांची लग्न, नातवंडांची ऍडमिशन, परदेशातल्या आप्तांची खुशाली, आई वडिलांचे आरोग्य, कोर्टकचेऱ्यांमधून सुटका, एक ना दोन अनेक मागण्या अनेक साकडं घालता येतील आपल्याला. पण खरंच गरज आहे का या सगळ्याची. अहो तिच्यामुळेच तर इतकं भरभरून मिळालंय. इतकं की काही वर्षांपूर्वी तिच्या दर्शनाला मळवलीहून बैलगाडीने येणारे आपण आज आपल्या एअर कंडिशन गाडीतून येतोय.
या वेळेला काही वेगळं मागुयात का आपण तिच्याकडे ? म्हणजे असं की आधीच अल्पसंख्यांक असणाऱ्या आपल्या समाजात प्रेम आणि सलोखा नांदू देत, एकमेकाला मदतीचा हात देत वर एकमेकाला वर आणण्याची जाणीव रुजू देत, समाजबांधवांचं दुःख ते आपलं ही मानसिकता वाढू देत, ज्ञातीतील उपेक्षितांच्या गरजेला धावण्याची बुद्धी येऊ देत आणि जमलंच तर छोट्या छोट्या वादांमुळे समाजातील दुरावलेल्या आणि दुभंगलेल्या नात्यांना जोडण्याची क्षमता आपल्या ठायी येऊ देत. यातली एक गोष्ट जरी तिच्या कृपेने आपल्या पदरात पडली तरी या कार्यक्रमाचं सार्थक होईल.
पाहिल्यान्दाच असं एकत्रपणे आईला भेटायला जातोय ... तिलाही काही देऊयात का आपण ? तिला काय देणार म्हणजे .. असच एकोप्याने राहू आणि नित्यनेमाने तुझ्या पायाशी येऊ असं वचन तर नक्कीच देऊ शकू ना आपण. मुलांनी एकत्र राहण्यापेक्षा दुसरं काही नको असतं एका आईला.
मग चला ज्ञातिबांधवांनो.. कार्यक्रम कोणाचा, कोणी ठरवला, आयोजक कोण, संयोजक कोण, ही संस्था कोणाची, श्रेय कोणाला हे सगळे क्षुल्लक प्रश्न मागे टाकून तिच्या भक्तीत तल्लीन होऊन, त्या तेजपुंज दिव्यत्वाला डोळ्यात साठवायला, तिच्या कृपादृष्टी चे धनी व्हायला, वाजत गाजत, हसत खेळत, तिच्या नावाचा जयघोष करत तिचा गड गाठूया. चला ज्ञातिबांधवांनो .. एकत्र येऊया ! एक नवा समाज घडवुया !!
शनिवार ११ नोव्हेंबर २०१७..आम्ही येतोय.. तुम्ही पण नक्की या !
आपलाच,
समीर गुप्ते
विश्वस्त - सीकेपी ज्ञातीगृह ट्रस्ट, ठाणे.
अध्यक्ष - सीकेपी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री.
अध्यक्ष - सीकेपी बीडीएफ ठाणे.
संस्थापक - सीकेपी फूड फेस्ट

साधंसं तरीही असाधारण.. फक्त आपलंच आंबटवरण !


''तू हल्ली हल्ली जरा जास्तच सीकेपी फूड, सीकेपी फूड करत असतोस रे " नाशिकहून परत येताना कल्याणजवळ कोणत्या हॉटेलमध्ये जेवायचं या विचारात असलेल्या माझ्या मित्राने मला टोकायला सुरुवात केली. तसं काहीच कारण नव्हतं, मी फक्त इतकंच म्हणालो की ''हे तुझं पंजाबी आणि चायनीज वगैरे नको रे आता..खूप कंटाळा आलाय मला' पण साहेब जरा जास्तच खवळले. मी म्हटलं जाऊदे ..गपचूप आपल्या घरी जेऊयात, बघ फोन लावून तुझ्या घरी काय केलंय ते. त्याने बायकोला तडक फोन लावला, काहीतरी बोलला आणि तेव्हढ्याच वेगात कट केला .." साधय रे, मेथीची भाजी आणि भाकरी'' तोंड वाकड करत माझ्याकडे पाहत पुटपुटला. मी म्हटलं जाऊदे माझ्या घरी फोन लाव आणि स्पीकर वर टाक म्हणजे मला गाडी चालवत बायकोशी बोलता येईल. घरचा फोन नेमका आईने उचलला. म्हटलं जेवायला काय आहे गं आज... "काही नाही, साधंच केलंय'' माझ्या आईच्या या उत्तराने त्याचा चेहरा अजूनच पडला. ''साधंच म्हणजे'' मी आपला विषय सुरूच ठेवला.. '' साधं म्हणजे आंबट वरण, भात, काचऱ्या बटाट्याची भाजी आणि मिरची तळलीये... तू येत असशील जेवायला, तर सुकट टाकते तव्यावर''.  ''ओके, मी अर्ध्या तासात येतो'' असं म्हटलं आणि फोन कट  केला. ''चायला, याला साधं जेवण म्हणतात तुमच्याकडे? पाच पाच पदार्थ बोलली तुझी आई'' आश्चर्यचकित होऊन विचारणाऱ्या मित्राकडे बघून मी शांत हसलो .. मेथीची भाजी भाकरी च्या समोर आमच्या घरातलं साधंसं  जेवण सरस ठरलं आणि आम्ही दोघे घरी येऊन मनसोक्त जेवलो.

या साध्याशा जेवणातले दोन सुपरस्टार पदार्थ म्हणजे आंबटवरण आणि काचऱ्या बटाट्याची भाजी. या दोघांना जगात पर्याय नाही. त्यातच सीकेप्यांचं आंबटवरण हे अनेकांना भुरळ घालणारं आहे आणि त्याच्याबरोबर जोडीला असलेली तव्याला चिकटलेली,थोडीशी करपलेली, तेलाच्या लालसर तवंगावर थोडीशी पिवळसर करडी झालेली पातळ कापलेल्या बटाट्याची भाजी म्हणजे केव्हाही लाजबाब. जेव्हा जेव्हा आम्ही आठ दहा दिवसांसाठी बाहेरगावी फिरायला जातो तेव्हा आम्हाला पहिले चार पाच दिवस, किती नवीन पदार्थ खातोय आणि किती नाही असं होतं पण सहावा सातवा दिवस लागला की आपलं आंबटवरण भात कधी खायला मिळतंय अस होऊन जातं. विमानतळावरून '' आज आंबटवरण भात करून ठेव'' असा फोन हमखास घरी जातो. आंबटवरणावरून एक खूप खूप जुनी आठवण झाली. त्यावेळी गडकरी रंगायतन नव्हतं. ठाण्याच्या मो.ह.विद्यालयात( MH High school) रात्रीचे नाटकाचे प्रयोग होत. आमच्या वाडयातल्या मामी, म्हणजे सुमती रणदिवे यांचं आणि त्यांच्या काही सीकेपी मैत्रिणीचं तिथे कॅन्टीन सारखं काहीतरी असायचं आणि नाटक संपल्यावर सर्व कलाकारांना त्यांचंच जेवण असायचं. त्या मलाही त्यांच्या मुलांबरोबर मदतीला न्यायच्या. अनेक दिगग्ज कलाकारांना म्हणजे गोरेपान काशिनाथ घाणेकर, कमलाकर सारंग, श्रीकांत मोघे, निळू फुले, वारणेच्या वाद्यवृंदातील चाळीसएक बालकलाकार आणि त्यांचे खूपच प्रेमळ गुरुजी, गायिका प्रमिला दातार या सर्वाना मी तेव्हा जवळून पाह्यलंय, अगदी मांडी घालून जेवताना पाह्यलंय आणि त्यांना पापड, लिंबू वाढलेत सुद्धा.  त्यावेळी एकदम राजबिंडे दिसणारे अभिनेते श्रीकांत मोघे यांना तर आमच्या मामींनी केलेलं आंबटवरण खूप आवडायचं .. अक्षरशः वाट्या वाट्या प्यायचे. आणि एकूणच त्यांचं जेवण आनंदाने आणि मनसोक्त जेवायचे ... हेच साधंसं जेवण पण त्या सर्वांना मनापासून आवडायचं.

आंबटवरण हा खरंतर सीकेपी जेवणातला एक संपूर्णपणे वेगळा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. आंबटवरणाला ''डाळ वाढा हो'' असं बोलणाऱ्याला परत जेवायला बोलावू नये या मताचा मी आहे.  जेवायच्या आधी आंबटवरणावरच गरम गरम पाणी वाटीभर प्यावं, परत जेवताना भातावर ओतल्यावर वाटीत उरलेले वरण थेट ओठाला लावून परत वाटी भरायला ताटात ठेवावी आणि पोटभर जेवल्यावर सुद्धा उठता उठता पाण्याऐवजी घट्ट राहिलेलं वरण पिऊनच उठावं याला म्हणतात आंबटवरण भाताचं जेवण. इतका अप्रतिम सुगंध असणाऱ्या,लसूण मोहरीच्या फोडणीने अजूनच तडकेदार झालेल्या या आंबटवरणाला 'साधंसं' या सदरात ज्याने कोणी टाकलं असेल त्याचा जाहीर सत्कारच करावा म्हणतो.  आजचं उरलेलं आंबटवरण दुसऱ्यादिवशी सकाळी तापवून आणि आटवून चपातीबरोबर खाताना जो काही आनंद मिळतो तो कोणत्याही शब्दात व्यक्त होऊच शकत नाही. आंबटवरणाबरोबर जगातली कोणतीही भाजी चालून जाते, भाजी नसेल तर सोडे, सुकट, लोणचं, पापड काहीही चालतं. आपल्याकडे आंबटवरणाची गोडी इतकी मोठी आहे की घरात तूरडाळीच्या महागाईची  कडवट चर्चा सुद्धा नसते.

मागचे काही आठवडे मी बघतोय, माझा लेख आवडला तर अनेक महिला आज तोच पदार्थ घरी करणार वगैरे कॉमेन्टमध्ये लिहितात.  बघा आजपण रविवार आहे..पण तुम्हाला नम्र विनंती - आज तुम्ही नेहेमीप्रमाणे मटणाचं जेवणच करा. नाही तर 'अखिल भारतीय तेचतेच खाऊन कंटाळलोय महासंघ' या संघटने मधले काही चिडलेले नवरे माझ्या घरावर मोर्चा आणायचे.

समीर गुप्ते
संस्थापक - सीकेपी फूड फेस्ट
#samhere #sameergupte.blogspot.com
#foodblog #delicious #ckpfood #ckpfoodfest
sameer6949@gmail.com.

टीप - माझ्या त्या मित्राचे नांव विचारू नका.. एकशे सत्ताविसाव्यावेळी त्याची बायको रागावून माहेरी गेल्याचे पाप लागेल मला.