सीकेपी समाज हा खरंच भाग्यशाली म्हणावा लागेल. म्हणजे कसं आहे नं की काही समाजबांधवांकडे पाहिलं तर कोणत्या कोणत्या कारणासाठी यांचे मेळावे, मोर्चे, उपोषणं, निदर्शनं चालू असलेले दिसतात. यांना एकत्र आणण्यासाठी एखादा नेता किंवा मग एखादा झेंडा याचा आधार घेतलेला आपण पाहतो. परंतु सर्वगुणसंपन्न आणि पुरोगामी विचारांच्या सीकेपी समाजाला एकत्र यायला ना कोणा नेत्याची गरज, ना कोणत्या झेंड्याची आणि ना ही कोणत्या घोषणेची. नोकरीपेशा आणि व्यवसायासाठी देशभर विखुरलेल्या या समाजाला कोणत्याही कारणाशिवाय एकत्र आणण्यासाठी साक्षात कुलस्वामिनी एकवीरा देवी धावून आली आहे तो समाज भाग्यशाली नाही तर काय. बघा ना, एका नवजात संस्थेचा एक कार्यकर्ता आपली संकल्पना मांडतो काय, तीला स्वीकारून ती संस्था त्या संकल्पनेला लोकांसमोर ठेवते काय आणि मग त्याला प्रचंड प्रतिसाद देत समस्त सीकेपी समाज आई एकविरेच्या छत्रछायेखाली एकवटण्याचं ठरवतो काय .. सगळं कसं स्वप्नवत. कल्याणच्या सीकेपी संस्थेने पुढाकार घेऊन केलेल्या या उपक्रमाबद्दल सर्व ज्ञातीतर्फे त्यांचे आभार मानावे तितके कमीच परंतू एकविरेच्या कृपेने ज्याने ही कल्पना मांडली त्याचे जाहीर कौतुक केलेच पाहिजे...माझ्या माहितीप्रमाणे डोंबिवलीचा माझा मित्र विजय देशमुख हाच तो ज्ञातिबांधव आहे ज्याच्यामुळे आज आपण सर्व आई एकविरेच्या चरणी तिच्या मुलांसारखे 'एक दिवस कायस्थांचा' ही संकल्पना साकारण्यास एकत्र येत आहोत.
कधी नव्हे इतक्या मोठ्या संख्येने आपण तिच्या कडे जातोय ... काय मागावं बरं तिच्याकडे ? भपकेबाज नोकरी, भरभराटीचा धंदा, आलिशान घर, भली मोठ्ठी गाडी, मुलांची लग्न, नातवंडांची ऍडमिशन, परदेशातल्या आप्तांची खुशाली, आई वडिलांचे आरोग्य, कोर्टकचेऱ्यांमधून सुटका, एक ना दोन अनेक मागण्या अनेक साकडं घालता येतील आपल्याला. पण खरंच गरज आहे का या सगळ्याची. अहो तिच्यामुळेच तर इतकं भरभरून मिळालंय. इतकं की काही वर्षांपूर्वी तिच्या दर्शनाला मळवलीहून बैलगाडीने येणारे आपण आज आपल्या एअर कंडिशन गाडीतून येतोय.
या वेळेला काही वेगळं मागुयात का आपण तिच्याकडे ? म्हणजे असं की आधीच अल्पसंख्यांक असणाऱ्या आपल्या समाजात प्रेम आणि सलोखा नांदू देत, एकमेकाला मदतीचा हात देत वर एकमेकाला वर आणण्याची जाणीव रुजू देत, समाजबांधवांचं दुःख ते आपलं ही मानसिकता वाढू देत, ज्ञातीतील उपेक्षितांच्या गरजेला धावण्याची बुद्धी येऊ देत आणि जमलंच तर छोट्या छोट्या वादांमुळे समाजातील दुरावलेल्या आणि दुभंगलेल्या नात्यांना जोडण्याची क्षमता आपल्या ठायी येऊ देत. यातली एक गोष्ट जरी तिच्या कृपेने आपल्या पदरात पडली तरी या कार्यक्रमाचं सार्थक होईल.
पाहिल्यान्दाच असं एकत्रपणे आईला भेटायला जातोय ... तिलाही काही देऊयात का आपण ? तिला काय देणार म्हणजे .. असच एकोप्याने राहू आणि नित्यनेमाने तुझ्या पायाशी येऊ असं वचन तर नक्कीच देऊ शकू ना आपण. मुलांनी एकत्र राहण्यापेक्षा दुसरं काही नको असतं एका आईला.
मग चला ज्ञातिबांधवांनो.. कार्यक्रम कोणाचा, कोणी ठरवला, आयोजक कोण, संयोजक कोण, ही संस्था कोणाची, श्रेय कोणाला हे सगळे क्षुल्लक प्रश्न मागे टाकून तिच्या भक्तीत तल्लीन होऊन, त्या तेजपुंज दिव्यत्वाला डोळ्यात साठवायला, तिच्या कृपादृष्टी चे धनी व्हायला, वाजत गाजत, हसत खेळत, तिच्या नावाचा जयघोष करत तिचा गड गाठूया. चला ज्ञातिबांधवांनो .. एकत्र येऊया ! एक नवा समाज घडवुया !!
शनिवार ११ नोव्हेंबर २०१७..आम्ही येतोय.. तुम्ही पण नक्की या !
आपलाच,
समीर गुप्ते
विश्वस्त - सीकेपी ज्ञातीगृह ट्रस्ट, ठाणे.
अध्यक्ष - सीकेपी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री.
अध्यक्ष - सीकेपी बीडीएफ ठाणे.
संस्थापक - सीकेपी फूड फेस्ट
समीर गुप्ते
विश्वस्त - सीकेपी ज्ञातीगृह ट्रस्ट, ठाणे.
अध्यक्ष - सीकेपी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री.
अध्यक्ष - सीकेपी बीडीएफ ठाणे.
संस्थापक - सीकेपी फूड फेस्ट

No comments:
Post a Comment