Wednesday, 13 December 2017

नाव नसलेलं, तरीही नाव कमावलेलं - सीकेप्यांचं 'निनावं'


''ए तुम्ही सीकेपी व्हेज खाता का रे ?'' या खोचक (तरीही आम्हाला अभिमानास्पद) प्रश्नाला होकारार्थी उत्तर मिळाल्यानंतर समोरचा माणूस कसला चमकतो सांगू. इतकंच नाही तर आम्ही सीकेपी व्हेज बरोबर गोडधोड पण चवीने खातो हे सांगितल्यावर ही धक्का बसलेली मंडळी सावरण्याआधीच परत कोसळतात. ''हं, ते गोड म्हणजे श्रीखंड वगैरे ना ?'' उगीचच आपल्याला कळतं हे सांगण्याचा अट्टाहास करत परत उभं राहायचा प्रयत्न होतो. पण यालापण निरुत्तर करणारं उत्तर आहेच आपल्याकडे - अहो 'आम्हा सीकेप्यांचं निनावं'. 'निनावं ? हे काय नाव आहे ?' या प्रश्नानंतर आपली सटकते आणि मग सुरु होतं निनावं महात्म्य.
निनावं - सीकेपी सुगरणीच्या पाक कौशल्याला दाद मिळवणाऱ्या ज्या हजारो पदार्थांचा जन्म झालाय त्याच्यात सर्वोच्च शिखरावर असणारा जो 'नावा'जलेला पदार्थ तो म्हणजे निनावं. इतके पदार्थ, इतक्या पाककृती, इतके खाण्यापिण्याचे लाड करत करत हा बिननावाचा पण नामचीन पदार्थ या पृथ्वीतलावर कसा अवतरला याचे मात्र आमच्याकडे उत्तर नाही. कदाचित प्रयोगशील गृहिणीमुळे किंवा कदाचित स्वयंपाकघरातील एखाद्या अपघातामुळे तयार झालेला हा पदार्थ असावा. अनेक पदार्थांचे नामकरण होऊन आता काय नाव ठेवायचे या विवंचनेत असलेल्या त्या भांबावलेल्या गृहिणीने 'निनावं' हे नाव मात्र कल्पकतेनेच ठेवलंय. नुसतच खाण्यात नाही तर खाताना जाणवणाऱ्या एका प्रेमाच्या गोडव्याने निनावं हा गोड पदार्थांमधलं एक अव्वल स्थान प्राप्त करतो. तसं पाहिलं तर फक्त गव्हाच्या आणि चण्याच्या पिठात तूप, गूळ. वेलची, जायफळ आणि त्यावर नारळाचं दूध या साध्याश्या मिश्रणातून बनलेला हा असाधारण पदार्थ. कृती पण अतिशय सोप्पी. लहानपणी कोळशाच्या शेगडीवर केला जाणारा आहे पदार्थ आता मात्र गॅस च्या चुलीवर बनतो. पण त्यावेळच्या तव्यावर ठेवलेल्या भांड्याच्या झाकणावर असलेल्या निखाऱ्याच्या धुराचा 'स्मोकी फ्लेवर' अजूनही मनात रुजलाय. दर पाच मिनिटांनी स्वयंपाक खोलीत जाऊन 'झालं का गं निनावं, झालं का गं निनावं' अशी गोड भुणभुण आईच्या मागे लावण्यातला आनंद काय असतो हे कदाचित आजच्या पिढीला कळणार नाही. कदाचित श्रावणात पुजलेल्या जिवतीच्या चित्राजवळ ठेवलेल्या नारळाच्या दूधामुळेच या निनाव्यात आईच्या ममतेचा गोडवा येत असावा. श्रावणाच्या शेवटी दाटा या सणाला पाहिजेच असलेले हे निनावं आणि त्याबरोबर खमंगअळू वडी हे भन्नाट कॉम्बिनेशन करून घरच्यांना देणे हा प्रत्येक सीकेपी गृहिणीचा एक आनंदोत्सव असतो. निनावे बनताना घरात जो सुगंध दरवळत असतो त्याला कोणत्याही सुगंधाची उपमा देणं शक्यच नाही.
निनावं बनल्यानंतर ज्यांच्याकडे खूप म्हणजे खूपच संयम आहे ते त्याच्या लोभस रुपाकडे पहात त्याच्या वड्या वगैरे व्हायची वाट पाहतात. आमच्यासारखे आचरट खादाड निनावंप्रेमी 'जरा बघू थोडंसं' म्हणून भांड खाली उतारताक्षणीच सुरुवात करतात.
काही पदार्थांबद्दल जास्त न बोलता ते फक्त आणि फक्त खाऊन तृप्त होणे या पेक्षा सुख ते काय... निनाव्याचं पण असंच आहे. तुम्ही जितके बोलाल तितकी आठवण येऊन स्वतःलाच त्रास होईल .. त्यापेक्षा आज निनाव्याचा बेतचं करून बघायला काय हरकत आहे. नव्या पिढीला निनावं आवडावं यासाठी 'निनावं मूस केक' यासारखा नाविन्यपूर्ण पदार्थ सीकेपी फूड फेस्ट मध्ये शेफ यशोधन देशमुख ने साकार केल्याचं तुम्ही ऐकलं असेलच. आपण कौतुकाने एखाद्याला निनावे खायला दिल्यानंतर 'हे थोडं मोहनथाळा सारखा लागतं नं' अस जर कोणी बोलला तर त्याच्या हातात उरलेलं निनावं परत घ्यायला क्षणभर पण कचरू नका .. ज्याने आपल्या अस्तित्वासाठी स्वतःच्या नावाचाही कधी हट्ट धरला नाही त्या मोठ्या मनाच्या 'सीकेपी' निनाव्याला मान द्यायला इतकं तर करूच शकतो आपण.. गम्मत म्हणून लिहतोय हो.. नाहीतर खरंच हिसकावून घ्याल. अहो निनावं म्हणजे फक्त सीकेप्यांच्या स्वयंपाक घरातला गोड पदार्थ नाहीये, निनावं म्हणजे आपल्या पाककलेचा आणि पाहुणचाराचा गोडवाच जणू. खाऊ द्या त्यांना निनावं.
समीर गुप्ते
संस्थापक - सीकेपी फूड फेस्ट

Saturday, 4 November 2017

वेध एकवीरेच्या दर्शनाचे, भाग्य सीकेपी समाजाचे !


सीकेपी समाज हा खरंच भाग्यशाली म्हणावा लागेल. म्हणजे कसं आहे नं की काही समाजबांधवांकडे पाहिलं तर कोणत्या कोणत्या कारणासाठी यांचे मेळावे, मोर्चे, उपोषणं, निदर्शनं चालू असलेले दिसतात. यांना एकत्र आणण्यासाठी एखादा नेता किंवा मग एखादा झेंडा याचा आधार घेतलेला आपण पाहतो. परंतु सर्वगुणसंपन्न आणि पुरोगामी विचारांच्या सीकेपी समाजाला एकत्र यायला ना कोणा नेत्याची गरज, ना कोणत्या झेंड्याची आणि ना ही कोणत्या घोषणेची. नोकरीपेशा आणि व्यवसायासाठी देशभर विखुरलेल्या या समाजाला कोणत्याही कारणाशिवाय एकत्र आणण्यासाठी साक्षात कुलस्वामिनी एकवीरा देवी धावून आली आहे तो समाज भाग्यशाली नाही तर काय. बघा ना, एका नवजात संस्थेचा एक कार्यकर्ता आपली संकल्पना मांडतो काय, तीला स्वीकारून ती संस्था त्या संकल्पनेला लोकांसमोर ठेवते काय आणि मग त्याला प्रचंड प्रतिसाद देत समस्त सीकेपी समाज आई एकविरेच्या छत्रछायेखाली एकवटण्याचं ठरवतो काय .. सगळं कसं स्वप्नवत. कल्याणच्या सीकेपी संस्थेने पुढाकार घेऊन केलेल्या या उपक्रमाबद्दल सर्व ज्ञातीतर्फे त्यांचे आभार मानावे तितके कमीच परंतू एकविरेच्या कृपेने ज्याने ही कल्पना मांडली त्याचे जाहीर कौतुक केलेच पाहिजे...माझ्या माहितीप्रमाणे डोंबिवलीचा माझा मित्र विजय देशमुख हाच तो ज्ञातिबांधव आहे ज्याच्यामुळे आज आपण सर्व आई एकविरेच्या चरणी तिच्या मुलांसारखे 'एक दिवस कायस्थांचा' ही संकल्पना साकारण्यास एकत्र येत आहोत.
कधी नव्हे इतक्या मोठ्या संख्येने आपण तिच्या कडे जातोय ... काय मागावं बरं तिच्याकडे ? भपकेबाज नोकरी, भरभराटीचा धंदा, आलिशान घर, भली मोठ्ठी गाडी, मुलांची लग्न, नातवंडांची ऍडमिशन, परदेशातल्या आप्तांची खुशाली, आई वडिलांचे आरोग्य, कोर्टकचेऱ्यांमधून सुटका, एक ना दोन अनेक मागण्या अनेक साकडं घालता येतील आपल्याला. पण खरंच गरज आहे का या सगळ्याची. अहो तिच्यामुळेच तर इतकं भरभरून मिळालंय. इतकं की काही वर्षांपूर्वी तिच्या दर्शनाला मळवलीहून बैलगाडीने येणारे आपण आज आपल्या एअर कंडिशन गाडीतून येतोय.
या वेळेला काही वेगळं मागुयात का आपण तिच्याकडे ? म्हणजे असं की आधीच अल्पसंख्यांक असणाऱ्या आपल्या समाजात प्रेम आणि सलोखा नांदू देत, एकमेकाला मदतीचा हात देत वर एकमेकाला वर आणण्याची जाणीव रुजू देत, समाजबांधवांचं दुःख ते आपलं ही मानसिकता वाढू देत, ज्ञातीतील उपेक्षितांच्या गरजेला धावण्याची बुद्धी येऊ देत आणि जमलंच तर छोट्या छोट्या वादांमुळे समाजातील दुरावलेल्या आणि दुभंगलेल्या नात्यांना जोडण्याची क्षमता आपल्या ठायी येऊ देत. यातली एक गोष्ट जरी तिच्या कृपेने आपल्या पदरात पडली तरी या कार्यक्रमाचं सार्थक होईल.
पाहिल्यान्दाच असं एकत्रपणे आईला भेटायला जातोय ... तिलाही काही देऊयात का आपण ? तिला काय देणार म्हणजे .. असच एकोप्याने राहू आणि नित्यनेमाने तुझ्या पायाशी येऊ असं वचन तर नक्कीच देऊ शकू ना आपण. मुलांनी एकत्र राहण्यापेक्षा दुसरं काही नको असतं एका आईला.
मग चला ज्ञातिबांधवांनो.. कार्यक्रम कोणाचा, कोणी ठरवला, आयोजक कोण, संयोजक कोण, ही संस्था कोणाची, श्रेय कोणाला हे सगळे क्षुल्लक प्रश्न मागे टाकून तिच्या भक्तीत तल्लीन होऊन, त्या तेजपुंज दिव्यत्वाला डोळ्यात साठवायला, तिच्या कृपादृष्टी चे धनी व्हायला, वाजत गाजत, हसत खेळत, तिच्या नावाचा जयघोष करत तिचा गड गाठूया. चला ज्ञातिबांधवांनो .. एकत्र येऊया ! एक नवा समाज घडवुया !!
शनिवार ११ नोव्हेंबर २०१७..आम्ही येतोय.. तुम्ही पण नक्की या !
आपलाच,
समीर गुप्ते
विश्वस्त - सीकेपी ज्ञातीगृह ट्रस्ट, ठाणे.
अध्यक्ष - सीकेपी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री.
अध्यक्ष - सीकेपी बीडीएफ ठाणे.
संस्थापक - सीकेपी फूड फेस्ट

साधंसं तरीही असाधारण.. फक्त आपलंच आंबटवरण !


''तू हल्ली हल्ली जरा जास्तच सीकेपी फूड, सीकेपी फूड करत असतोस रे " नाशिकहून परत येताना कल्याणजवळ कोणत्या हॉटेलमध्ये जेवायचं या विचारात असलेल्या माझ्या मित्राने मला टोकायला सुरुवात केली. तसं काहीच कारण नव्हतं, मी फक्त इतकंच म्हणालो की ''हे तुझं पंजाबी आणि चायनीज वगैरे नको रे आता..खूप कंटाळा आलाय मला' पण साहेब जरा जास्तच खवळले. मी म्हटलं जाऊदे ..गपचूप आपल्या घरी जेऊयात, बघ फोन लावून तुझ्या घरी काय केलंय ते. त्याने बायकोला तडक फोन लावला, काहीतरी बोलला आणि तेव्हढ्याच वेगात कट केला .." साधय रे, मेथीची भाजी आणि भाकरी'' तोंड वाकड करत माझ्याकडे पाहत पुटपुटला. मी म्हटलं जाऊदे माझ्या घरी फोन लाव आणि स्पीकर वर टाक म्हणजे मला गाडी चालवत बायकोशी बोलता येईल. घरचा फोन नेमका आईने उचलला. म्हटलं जेवायला काय आहे गं आज... "काही नाही, साधंच केलंय'' माझ्या आईच्या या उत्तराने त्याचा चेहरा अजूनच पडला. ''साधंच म्हणजे'' मी आपला विषय सुरूच ठेवला.. '' साधं म्हणजे आंबट वरण, भात, काचऱ्या बटाट्याची भाजी आणि मिरची तळलीये... तू येत असशील जेवायला, तर सुकट टाकते तव्यावर''.  ''ओके, मी अर्ध्या तासात येतो'' असं म्हटलं आणि फोन कट  केला. ''चायला, याला साधं जेवण म्हणतात तुमच्याकडे? पाच पाच पदार्थ बोलली तुझी आई'' आश्चर्यचकित होऊन विचारणाऱ्या मित्राकडे बघून मी शांत हसलो .. मेथीची भाजी भाकरी च्या समोर आमच्या घरातलं साधंसं  जेवण सरस ठरलं आणि आम्ही दोघे घरी येऊन मनसोक्त जेवलो.

या साध्याशा जेवणातले दोन सुपरस्टार पदार्थ म्हणजे आंबटवरण आणि काचऱ्या बटाट्याची भाजी. या दोघांना जगात पर्याय नाही. त्यातच सीकेप्यांचं आंबटवरण हे अनेकांना भुरळ घालणारं आहे आणि त्याच्याबरोबर जोडीला असलेली तव्याला चिकटलेली,थोडीशी करपलेली, तेलाच्या लालसर तवंगावर थोडीशी पिवळसर करडी झालेली पातळ कापलेल्या बटाट्याची भाजी म्हणजे केव्हाही लाजबाब. जेव्हा जेव्हा आम्ही आठ दहा दिवसांसाठी बाहेरगावी फिरायला जातो तेव्हा आम्हाला पहिले चार पाच दिवस, किती नवीन पदार्थ खातोय आणि किती नाही असं होतं पण सहावा सातवा दिवस लागला की आपलं आंबटवरण भात कधी खायला मिळतंय अस होऊन जातं. विमानतळावरून '' आज आंबटवरण भात करून ठेव'' असा फोन हमखास घरी जातो. आंबटवरणावरून एक खूप खूप जुनी आठवण झाली. त्यावेळी गडकरी रंगायतन नव्हतं. ठाण्याच्या मो.ह.विद्यालयात( MH High school) रात्रीचे नाटकाचे प्रयोग होत. आमच्या वाडयातल्या मामी, म्हणजे सुमती रणदिवे यांचं आणि त्यांच्या काही सीकेपी मैत्रिणीचं तिथे कॅन्टीन सारखं काहीतरी असायचं आणि नाटक संपल्यावर सर्व कलाकारांना त्यांचंच जेवण असायचं. त्या मलाही त्यांच्या मुलांबरोबर मदतीला न्यायच्या. अनेक दिगग्ज कलाकारांना म्हणजे गोरेपान काशिनाथ घाणेकर, कमलाकर सारंग, श्रीकांत मोघे, निळू फुले, वारणेच्या वाद्यवृंदातील चाळीसएक बालकलाकार आणि त्यांचे खूपच प्रेमळ गुरुजी, गायिका प्रमिला दातार या सर्वाना मी तेव्हा जवळून पाह्यलंय, अगदी मांडी घालून जेवताना पाह्यलंय आणि त्यांना पापड, लिंबू वाढलेत सुद्धा.  त्यावेळी एकदम राजबिंडे दिसणारे अभिनेते श्रीकांत मोघे यांना तर आमच्या मामींनी केलेलं आंबटवरण खूप आवडायचं .. अक्षरशः वाट्या वाट्या प्यायचे. आणि एकूणच त्यांचं जेवण आनंदाने आणि मनसोक्त जेवायचे ... हेच साधंसं जेवण पण त्या सर्वांना मनापासून आवडायचं.

आंबटवरण हा खरंतर सीकेपी जेवणातला एक संपूर्णपणे वेगळा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. आंबटवरणाला ''डाळ वाढा हो'' असं बोलणाऱ्याला परत जेवायला बोलावू नये या मताचा मी आहे.  जेवायच्या आधी आंबटवरणावरच गरम गरम पाणी वाटीभर प्यावं, परत जेवताना भातावर ओतल्यावर वाटीत उरलेले वरण थेट ओठाला लावून परत वाटी भरायला ताटात ठेवावी आणि पोटभर जेवल्यावर सुद्धा उठता उठता पाण्याऐवजी घट्ट राहिलेलं वरण पिऊनच उठावं याला म्हणतात आंबटवरण भाताचं जेवण. इतका अप्रतिम सुगंध असणाऱ्या,लसूण मोहरीच्या फोडणीने अजूनच तडकेदार झालेल्या या आंबटवरणाला 'साधंसं' या सदरात ज्याने कोणी टाकलं असेल त्याचा जाहीर सत्कारच करावा म्हणतो.  आजचं उरलेलं आंबटवरण दुसऱ्यादिवशी सकाळी तापवून आणि आटवून चपातीबरोबर खाताना जो काही आनंद मिळतो तो कोणत्याही शब्दात व्यक्त होऊच शकत नाही. आंबटवरणाबरोबर जगातली कोणतीही भाजी चालून जाते, भाजी नसेल तर सोडे, सुकट, लोणचं, पापड काहीही चालतं. आपल्याकडे आंबटवरणाची गोडी इतकी मोठी आहे की घरात तूरडाळीच्या महागाईची  कडवट चर्चा सुद्धा नसते.

मागचे काही आठवडे मी बघतोय, माझा लेख आवडला तर अनेक महिला आज तोच पदार्थ घरी करणार वगैरे कॉमेन्टमध्ये लिहितात.  बघा आजपण रविवार आहे..पण तुम्हाला नम्र विनंती - आज तुम्ही नेहेमीप्रमाणे मटणाचं जेवणच करा. नाही तर 'अखिल भारतीय तेचतेच खाऊन कंटाळलोय महासंघ' या संघटने मधले काही चिडलेले नवरे माझ्या घरावर मोर्चा आणायचे.

समीर गुप्ते
संस्थापक - सीकेपी फूड फेस्ट
#samhere #sameergupte.blogspot.com
#foodblog #delicious #ckpfood #ckpfoodfest
sameer6949@gmail.com.

टीप - माझ्या त्या मित्राचे नांव विचारू नका.. एकशे सत्ताविसाव्यावेळी त्याची बायको रागावून माहेरी गेल्याचे पाप लागेल मला. 

Monday, 30 October 2017

''याचना नही अब रण होगा, संघर्स बडा भीसण होगा''

प्रश्न ठाणे मुंबईत राहणाऱ्या सर्व युपी वाल्यांचा नाहीये बरं का.. शेकडो मित्र आहे माझे. प्रेम करणारे, जीवाला जीव देणारे, मदतीला धावून येणारे. मेहेनतीच्या पैशातून घेतलेल्या अधिकृत घरात राहतात, कर भरतात, प्रामाणिक व्यवसाय करतात, शेजारधर्म आणि नाती सांभाळतात, भूमिपुत्रांवर प्रेम करतात, अदबीने बोलतात, सणासुदीला तुम्ही त्यांना विसराल पण ते न विसरता तुमच्या पाया पडायला येणार आणि गावाहून येताना थोडं का होईना आपल्या शेतातलं काहीतरी घेऊन येणार. यांच्याबद्द्दल बोलतच नाही कोणी. देश माझाही आहे आणि यांचाही. मोठा प्रश्न आहे या स्वभावा विरुद्ध वागणाऱ्या अनधिकृत हरामखोरांचा , शहराची जागा ढापून, आपल्या नागरी सुविधा लुटून, आपल्याशी उर्मट वागणाऱ्या आणि त्यापेक्षाही मोठा त्यांना चिथावणाऱ्या आणि पाठीशी घालणाऱ्या कुत्र्यांचा. कुत्र्या कुत्र्या बोलून कुत्र्यांचा फार अपमान तर करत नाहीये ना मी ? कारण ज्या शहरात आपण मोठे झालो त्या शहराशी अप्रामाणिक राहणारे हे हलकट नेते प्रामाणिक कुत्र्यांची उपमा देण्याच्या लायकीचे नाहीत. काय अवदसा आठवली आणि ह्या भिकारड्याना मोठं केलं अस काही मराठी नेत्यांना नक्कीच वाटत असेल.

''याचना नही अब रण होगा, संघर्स बडा भीसण होगा'' हे वाक्य आहे त्या भिकमाग्या संजय निरूपमच. काँग्रेस पक्षाचा हा उपऱ्या 'सहरअद्यक्स" काय काय बरळतोय. अरे हिम्मत होते कशी याची मुंबईत राहून भोजपुरीत बोलून अनधिकृत फेरीवाल्याना चिथवायची. स्वतःची बायका पोरं गावाला सोडून आलेली ही मंडळी दुसऱ्याच्या बायकांना कोणत्या नजरेने बघतात, रिक्षावाले तर कोणत्या पद्धतीने वागतात हा तर मोठा विषय आहे. माझे शहर स्वतःच्या बापाचे असल्याच्या थाटात वागून जर आमच्या माणसावर हात उचलणार असाल तर हात उखडून टाकायला वेळ नाही आम्हाला. प्रामाणिक मेहेनत करा, कर भरा, शहर स्वच्छ ठेवा, अधिकृत बाजारपेठा वापरा ... कोणाची ना नाही या गोष्टीला. वेगाने वाढणाऱ्या आणि मोठ्या होणाऱ्या शहरामध्ये गरज आहेच या सर्वांची. जे काम करायला आमची मुलं तयार नाहीत ती कामं तुम्ही करताय, तुमची कुटुंब एखाद्या चाळीत सन्मान पूर्वक राहताहेत, तुमची मुलंबाळं चांगलं शिक्षण घेत आहेत, एक चांगलं वातावरण तयार करून तुम्ही सामाजिक स्वास्थ्य जपताय, कौतुकच आहे तुमचं. पण आमच्या नागरी सुखसुविधा ओरबाडणाऱ्या, अनैतिक धंदे करणाऱ्यांना आणि त्यांच्या 'मुलुख' मधली गुंडगिरी आणि गचाळगिरी इथे करू पाहणाऱ्या एकालाही माझ्या माझ्या माणसाकडे वाकड्या नजरेने पाहण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या नेत्यालाही थोबाडायला आम्ही मागेपुढे बघणार नाही.

पक्षभेद विसरून काल मनसेच्या कार्यकर्त्याची विचारपूस करायला गेलेला नितेश राणे मला पहिल्यांदा आवडला. राज ठाकरे साहेबांचा मी चाहता आहे म्हणून नव्हे पण मुंबईतल्या या उपऱ्यांच्या गुंडगिरीला शह देणाऱ्या मनसे ला शिवसेनेकडून या आंदोलनात एखाद्या घोषणेची साथ मीळावी ही माफक अपेक्षा होती. बाळासाहेब नावाचा ढाण्या वाघ काळाच्या पडद्यामागे गेला असला तरी आजही डरकाळी ला घाबरण्याची प्रथा आहे..पण डरकाळी न फोडण्यामागची राजकीय गणितं माझ्या बुद्धी पलीकडची आहेत. बाकी मराठी माणसाच्या हितासाठी 'त्या दोघांनी' आतातरी एकत्र यावं असली स्वप्न बघणं आता मराठी माणसांनी सोडून द्यावं.. जर तुम्हाला सन्मानाने आणि सुरक्षितपणे जगायचं असेल तर काही असामाजिक शक्तींना ठेचायला तुम्ही स्वतः पुढे सरसावलात तरच ठीक ..नाहीतर नाक्यावरच्या फेरीवाल्याकडे ''ए भैय्या, थोडा जादा देना हं'' हे हिंदीत बोलायची सवय आहेच आपल्याला.

शांतीप्रिय मुंबईला रण करून 'भीषण संघर्ष' करण्याची भाषा करणाऱ्या कुत्र्याला त्याच्या राजकीय अस्तित्वासाठी याचना करायला लावायची हीच वेळ आहे आणि जो पण ते करेल त्याच्या मागे सर्वानी ठामपणे उभे राहायची आजची गरज आहे.

जय महाराष्ट्र !

समीर गुप्ते.

Friday, 27 October 2017

'आपलं वडीचं सांबार'



बघा हं तुम्हाला पटतंय का ते. म्हणजे वाचल्यावर पटेलच पण तरीपण विचारतो. म्हणजे मला सांगा, जेवणात वडीचं सांबार खाल्यानंतर,  भातावर चार चार वाट्या  ओतून पोटभर जेवल्यानंतरसुद्धा परत स्वयंपाक घरात जाऊन ओट्यावरच्या त्या सांबाराच्या भांड्यावरच झाकण काढून बघता का हो तुम्ही?  खरंतर मला 'बघता ना हो तुम्ही' असच म्हणायचं होतं पण थोडं चाचरत असं बोललो. बहुतांशी मंडळींचं उत्तर 'हो' च असेल कारण माझं पण उत्तर तेच आहे. तसं माणसाने  स्वत:वरून जगाची परीक्षा करू नये पण या खाण्यापिण्याच्या परीक्षेत माझ्यासारख्या खादाडांची सगळी उत्तरं सारखीच असतात. असो.
तर आपला विषय आहे वडीचं सांबार...नव्हे 'आपलं वडीचं सांबार'.

सीकेपी सिग्नेचर डीशेस मधल्या अग्रक्रमांकावर असणाऱ्या निवडक पदार्थामधली माझी सर्वात आवडती अस म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही.

कसं आहे, एक तर हे वडीचं सांबार आपल्या घरी रोज रोज बनत नाही, बनलेच तर पुरता पुरत नाही, उरण्याचा प्रश्नच नाही आणि समजा चुकूनमाकून  उरलं तर उभ्या उभ्या वाटीभर पिऊन संपवल्याशिवाय आपला आत्मा शांत होत नाही. पटतंय का ?  एखादा कांदा, अर्धी वाटी नारळाचं दूध, वेलच्या, दालचिनी, चमचा दोन चमचे चण्याचं पीठ, तिखट मीठ हळद या साध्याशा वाटणाऱ्या साहित्याने जे काही भन्नाट रस्सायन तयार होतं  त्याचं नाव वडीचं सांबार. आणि चण्याचं पीठ वापरून केलेल्या काजू कतली च्या आकाराच्या पण जाडसर मोठया अशा वड्या या सांबारात सोडण्याचा एखाद्या सुग्रणीचा जो सोहळा असतो तो अवर्णनीय असतो .. एक तर जेवायला वडीचं सांबार आहे हे ऐकूनच सपाटून भूक लागलेली असते, ताटात कापलेल्या वड्यांवर हात टाकावा तर जेवताना वाटीत कमी मिळण्याची धमकी आधीच दिलेली असते आणि तरीही माझ्यासारखा एखादा उतावळा ताटात भात वाढून घेऊन ते ताट हातात धरूनच बायकोच्या बाजूला उभा असतो. एकदा का ताटात वडीचं सांबार पडलं की मांडी घालून बस्तान बसवायचं आणि वाफाळलेल्या भातावर सांबार ओतून नाकातून पाणी येईस्तोवर मनसोक्त जेवायचं. भुरक्या भुरक्याला अवीट आनंदाची साक्ष देणाऱ्या या वडीच्या सांबाराला पिऊ तेव्हडं कमी.  ते पिताना त्यातल्या  गरम गरम वड्यांचे सुसह्य आणि हवेहवेसे चटके जिभेला चोचले या शब्दाचा अर्थ खऱ्या अर्थाने समजावून सांगतात. आम्हा सीकेप्यांच्या घरात महिन्यातून एकदातरी अवतारणाऱ्या या स्वर्गलोकीच्या व्यंजनाला एक विशेष रंग प्राप्त झालेला असतो.. आणि तुम्हाला सांगतो खरा खवय्या या रंगावरच फिदा होतो. वडीचं सांबार कशाबरोबरही ही खाता येत असलं तरी त्याच्या चवीला योग्य न्याय द्यायला पांढऱ्या भाताशिवाय पर्याय नाही.

वाचताना भूक जागवली गेली असेल तर आजचाच बेत पक्का करा 'आपल्या वडीच्या सांबाराचा' !

समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट
#sam here #sameergupte.blogspot.com
#ckpfood #delighful #exoticfood

Sunday, 22 October 2017

आंदोलन कोणीही करा पण या अनधिकृत फेरीवाल्याना हाकला.


काल मनसे नी केलेल्या फेरीवाल्यांच्या विरोधातल्या आंदोलनानंतर अनेकांना फेरीवाल्यांचा पुळका आल्याचं दिसलं. वास्तविक या मंडळींनाही अनेकवेळा या फेरीवाल्यांचा त्रास होतच असेल पण तिथे बोलण्याची आणि आवाज उठवण्याची यांची हिम्मत नसते. अगदी स्वतःच्या बिल्डिंगच्या गेटवर बसलेल्या फेरीवाल्याला पण 'भाई थोडा सामान बाजूने लेना हं, आने जाने को तक्लिप होता है' असलं काहीतरी मुळमुळीत बोलल्याचं पण पाहायला मिळतं. ज्यांना या आंदोलनाचा राग आला असेल किंवा आंदोलन करणाऱ्या मनसेवर टीका करण्याची संधी साधण्याची हीच योग्य वेळ आहे अस वाटत असेल त्यांनी माझ्या काही मुद्य्यांकडे लक्ष द्यावं.
तूम्हाला फेरीवाल्यांचा इतका कळवळा असेल तर एकदा स्टेशनजवळ किंवा एखाद्या बाजारपेठेत स्वतःच्या पैशाने एक दुकान विकत घेऊन बघा.. नसेल जमत तर भाड्याने घेऊन बघा. पूर्णपणे अधिकृत बांधकाम केलेले दुकान, त्यावर दरवर्षी भरावयाचा कर, सर्व नियमांचे पालन आणि गुमास्ता फी भरल्यानंतर तुमच्या दुकानाबाहेर जेव्हा एखादा फालतू फेरीवाला माल विकून तुमच्याशी स्पर्धा करेल तेव्हा तुम्हाला तो नकोसा वाटेल.
स्टेशन जवळ जायच्या यायच्या रस्त्यात तुम्हाला फूटपाथ शोधावा लागतो आणि मग बेफाट रिक्षांच्या गर्दीला छेदत रस्त्यावरून चालत असताना तुम्हाला एखाद्या वाहनाचा जोरदार धक्का लागेल आणि तुमचे आठ दिवस अंथरुणावर कळवळण्यात जातील तेव्हा तुम्हाला हा फेरीवाला नकोसा वाटेल.
स्टेशनच्या पादचारी पुलावरून गाडी पकडायला धावताना जेव्हा एखाद्या फेरीवाल्याच्या मांडलेल्या सामानावर तुमचा पाय पडल्यानंतर तुमच्या आयाबहिणिंचा जो उद्धार तो करेल आणि तुमचा जाहीर अपमान होईल तेव्हा तुम्हाला तो नकोसा वाटेल.
कधी तुम्ही तुमच्या लाडक्या कटुंबाबरोबर तुमच्या एसी कारमधून खरेदीला जाल आणि थोड्या वेळासाठी रस्त्याच्या कडेला गाडी पार्क कराल तेव्हा समोरच्या फुटपाथवर अनधीकृतपणे 'सब्जी' विकणारा तुम्हाला अतिशय उद्धटपणे गाडी पुढे घ्यायला सांगेल तेव्हा तुम्हाला तो नकोसा वाटेल.
रस्त्यावर बसलेल्या फेरीवाल्यांबरोबर जे बिनकामाचे भिकारxx लोक गप्पा मारत बसलेले असतात त्यात काही त्यांचेआश्रयदाते, भाई, दादा पण असतात. हे लोक जेव्हा तुमच्या घरातल्या स्त्री ची छेडखानी किंवा अपमान करतील आणि तुम्ही हतबल असाल तेव्हा तुम्हाला ते नकोसे वाटतील.
संध्याकाळी देवळात जाणाऱ्या तुमच्या म्हाताऱ्या आईबापाला या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे जेव्हा रस्त्यात नीट चालता येणार नाही आणि एखाद्या अडचणीच्या ठिकाणी पडून त्यांचे एखादे हाड मोडेल कदाचित तेव्हा तुम्हाला हे फेरीवाले नकोसे होतील.
स्वच्छतेची काळजी न घेता, हायजिनचे कोणतेही नियम न पाळता विकायला ठेवलेल्या चायनीज भेळ, पाणीपुरी, रंगीत सरबत असल्या टुकार गोष्टी खाऊन तुमच्या लहान मुलांना एखादा आजार होईल तेव्हा तुम्हाला हा रस्त्यावरचा फेरीवाला नकोस होईल.
तुमचे शहर, तुमचे रस्ते, तुमचे फूटपाथ यावर कब्जा करण्यासाठी प्रामाणिक पोलिसांना पण अप्रामाणिक बनण्याची लालूच देणारे आणि गुंडगिरीचा आधार घेणारे हे फेरीवाले कसे सहन होतात तुम्हाला. बरं ' मग त्यांना हटवणाऱ्या राज ठाकरेंनी त्यांना नोकऱ्या द्याव्यात' असलेही मूर्ख मेसेज वाचण्यात आले. मला तर हा मूर्खपणा कळतच नाही. अरे ज्या फेरीवाल्यांनी काही महिन्यांपूर्वीच ड्युटीवर असलेले ठाण्याचे उपायुक्त संदीप माळवी यांच्यावर हल्ला करत त्यांना जबर मारहाण केली होती त्या फेरीवाल्यांबद्दल तुम्हाला सहानुभूती वाटते या पेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाही. खरं तर यांना लाथ मारून हाकलायचं काम पोलिसांचं आणि प्रशासनाचं. पण तिथूनही काही कारवाई नाही. मग एखाद्याने हे काम केलं तर चुकलं कुठे. आपल्या समक्ष चाललेल्या या गोष्टींकडे डोळेझाक करत स्वतः आंधळ्यासारख जगायचं आणि तुमचा रस्ता मोकळा करणाऱ्याला मात्र गुन्हेगारासारखं पाहायचं हे बरोबर नाही.
ज्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे शहरात कचरापट्टी वाढते, रोगराई वाढते, अपघात होतात, गुंडगिरी वाढते, भ्रष्टाचार बोकाळतो त्यांना रोखलेलं कधीही चांगलं. इथे मराठी अमराठी हा तर मुद्दाच नाही - अधिकृत आणि अनधिकृत हाच मोठा मुद्दा आहे. लक्षात घ्या, महानगरपालिकेचा योग्य कर भरून, लोकवस्त्यांमध्ये फिरत गाडीवर भाजीपाला विकणाऱ्या किंवा इतर फेरीवाल्यांबद्दल बोलत नाहीये मी.. शहरातले फूटपाथ ढापणाऱ्या आणि शहराचे सौन्दर्य नष्ट करणार्यांबद्दल माझा आक्षेप आहे.
आणि इतका त्रास असतानाही ज्यांना या अनधिकृत फेरीवाल्यांसाठी इतकी सहानुभूती असेल त्यांनी द्यावीत की त्यांना अधिकृत दुकाने घेऊन - एखाद्याला सन्मानपूर्वक जगण्याची दिशा दिल्याचं समाधान तरी तुम्हाला मिळेल.
समीर गुप्ते

Monday, 21 August 2017

ठिकाण फराळाच्या पदार्थांचे - 'मरूधन' कळव्याच्या खारकरांचे !







पूर्वी दिवाळीची खूप वाट पाहायला लागायची. नवीन कपडे, फटाके आणि अर्थातच दिवाळीचा फराळ. पण आता कसं आहे ना की सण नसला तरी सण साजरा करण्याची सोय आहे. म्हणजे आज गरज असो व नसो आपण कपडे विकत घेतो, फटाके म्हणाल तर ते तसे आऊट ऑफ फॅशन झालेत आणि दिवाळी फराळ म्हणाल तर ... काय म्हणता ? दिवाळीसाठी थांबावंच लागेल ?  दादा, आम्ही नाही थांबत आता. मनात आणलं तर पंधराव्या मिनिटाला दिवाळी साजरी करतो आम्ही. कसं म्हणजे ? सोप्पय की. स्कुटर ला किक मारायची आणि कळवा गाठायचं. आता तुमचा पुढचा प्रश्न ..कळवा ???? हो हो कळवा, कळवा नाका, ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे आणि इथे आहे वर्षभरात कधीही दिवाळी साजरी करण्याची सोय. जर अजूनही लक्षात येत नसेल तर सांगतो, खारकर यांचे 'मरूधन' नावाच्या दुकानात जायचं आणि बघायचं. अगदी तुमच्या घरच्या चवीच्या तोडीस तोड असणारी फराळाच्या पदार्थांची रेलचेल तुम्हाला येथे पाहायला मिळेल.  अस्सल सीकेपी पद्धतीचे खाजाचे कानवले, चिवडा, चकली, शंकरपाळ्या, बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, शेव अगदी अनारसे सुद्धा...  तुम्हाला जे पाहिजे ते इथे उपलब्ध आहे.

खरं पाहता, श्री पंकज खारकर यांनी नामांकित ब्रॅण्ड्स च्या , म्हणजे चितळ्यांची बाकरवडी वगैरे पदार्थांची एजन्सी अशा स्वरूपाचा व्यवसाय सुरु केला होता. पण लोकांच्या मागणीला मान देत आणि अर्थात काळाची गरज लक्षात घेत त्यांनी या फराळाच्या व्यवसायात येणाचे ठरवले. सीकेपी घरात बनला जाणारा पदार्थ जसाच्यातसा लोकांना मिळू लागला. पत्नी सौ. वैशाली हिने तिच्या पाक कौशल्याने आणि मेहेनतीने पदार्थांच्या दर्जावर लक्ष केंद्रित करून आपल्या सर्व उत्पादनांना जबरदस्त लोकप्रिय केलं. व्यवसाय वाढला की मनुष्यबळ पण वाढतं आणि मग हाताशी लागतं आपल्या घरचं आपलं माणूस.

शालेय जीवन संपतंय न संपतंय तोच त्यांचा मुलगा अथर्व त्यांच्या व्यवसायात रस घेऊ लागला. सीबीसी, सीसीसीआय अशा वेगवेगळ्या उद्योजक संस्थांमध्ये आपले पदार्थ सादर करून अनेकांची वाहवा तर त्याने मिळवलीच पण या व्यवसायाला अजूनही प्रोफेशनल लुक देण्याहेतू त्याने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला. आज अतिशय उच्च दर्जाच्या मशिन्स आणून अथर्व ने या व्यवसायाला फक्त वेग च नव्हे तर एक वेगळेपण ही दिले आहे. दिवाळी फराळाबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचा चिवडा, पुऱ्या, पापड्या आणि असे अनेक दर्जेदार पदार्थ अथर्व खारकर याच्या मरुधन या दुकानात उपलब्ध आहेत. जशी दिवाळी नसतानाही तुम्ही दिवाळी साजरी करू शकता तशीच होळी नसतानाही त्यांच्याकडच्या तेलपोळीने (पुरणपोळी) तुम्ही कधीही होळी साजरी करू शकता. मी आयुष्यात कधी तेलपोळी खाल्ली नव्हती, म्हणजे गोडाची आवडच नव्हती परंतु पाहताक्षणी ती तेलपोळी खायचा मोह मला आवरता आला नाही आणि मी तेलपोळी खायला सुरुवात केली. उत्कृष्ट चव, आकर्षक पॅकिंग, योग्य दर आणि घरपोच डिलिव्हरी सुद्धा मरूधन तर्फे दिली जाते. सीकेपी फूड फेस्ट मध्ये तुम्ही जर यांच्या स्टॉल ला भेट दिलीत तर तुमची पिशवी तिथेच भरली म्हणून समजा.

आज अनेक तरुण मंडळी शिक्षणावर अफाट खर्च करून कोणत्यातरी नोकरीच्या मागे धावताना दिसतात. परंतु आपल्या अंगी असलेले उद्योजकाचे सळसळते रक्त, शिक्षणाच्या बरोबरीने व्यवसायाचे आकर्षण आणि व्यवसायात येऊन यशस्वी होत, आपल्या सहज सुंदर स्मित हास्याने समोरच्यावर छाप टाकणारी देहबोली या सर्व गुणांच्या जोरावर या नवतरुणाने आपल्या वयाच्या इतर तरुणांना प्रेरित न केलं तर नवलंच.

आज अथर्व खारकर याचा वाढदिवस आहे.  व्यवसाय करून मैत्री जोपासण्याचे कौशल्य अथर्वने आपल्या अंगी बाणले आहे आणि अशा त्याच्या मित्रमंडळींचा रात्री १२ वाजल्या पासून त्याच्या नुसता धुमाकूळ सुरु आहे. अशा या शुभ दिवशी वयाने मोठ्या होणाऱ्या अथर्व ला कर्तृत्वाने आणि लौकिकाने पण मोठा होण्यासाठी अनेक आशीर्वाद.

मरूधन च्या रुचकर आणि चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेताना अथर्व च्या पाठीवर शाबासकीची थाप मारायला आणि त्याला यशाच्या उत्तुंग भरारी साठी शुभेच्छा द्यायला मात्र विसरू नका.

समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट.