Sunday, 9 July 2017

गुरु

गुरु .......

गुरु हा मानण्यावर असतो.  तुम्ही ज्याला गुरु मानता तो तुम्हाला शिष्य मानेलच असं जरुरीचं नाही आणि तुम्ही त्याचेच शिष्य आहात असे जगाला ठोकून सांगतोय तो तुमचा गुरु म्हणवून घ्यायला योग्य असेल असेही नाही.

कधी हा निसर्ग तुमचा गुरु असतो तर कधी एखादा प्रसंग. कधी वेळ, कधी नशीब, कधी सन्मान, कधी अपमान, कधी यश, कधी अपयश एक ना दोन हजारो गोष्टीत तुम्ही गुरु शोधू शकता.

तुमच्या आयुष्याला वळण देणारा, गती देणारा आणि त्यामुळे आर्थिक नसली तरी मानसिक समृद्धी देणारा एखादा धाडसी निर्णय देखील तुमचा गुरु असू शकतो.

गुरु मानण्यावर असतो .. तुमच्या आतही तो वसलाय, आहे हे मानण्यावरती सुद्धा !


Saturday, 1 July 2017

आठवणीने पण तोंडाला पाणी सुटणारे 'वालाचे बिरडे'



रात्री जेवायला बिरडं हवं असेल तर गपचूप वाल निवडायला बस.. सांगा बरं तुमच्यातल्या कोणा कोणाच्या लहानपणी तुमच्या आईने हे सांगून तुमच्या कडून वाल सोलून घेतलेत. तसं वाल सोलायचे म्हणजे काही खूप मोठे काम नसे वाटत तेव्हा. वाल निवडता निवडता गप्पा मारणे आणि मध्येच आलेले कुचर कोणालातरी फेकून मारणे हे नित्याचेच. कधी कधी तर दोन्ही हातानी फुल्ल स्पीड मध्ये अर्धा तासात वाल निवडून खेळायला जायचे आणि खेळून आल्यावर हातपाय धुवून शुभंकरोती वगैरे बळेबळे आटपून पाटावर बसायच. चमचमीत बिरडं, भात, कैरीच्या करमटल्या आणि एखादी सांडगी मिरची पानात आली तर पंचपक्वान्नाला पण लाजवेल असे ताट सजलेले दिसायचं. जेवायला सुरुवात करतानाच बिरड्याची वाटी डायरेक्ट ओठाला लावायची आणि नाकात झणझणीत सुगंध भरत एक फुरका मारून मगच भातावर ओतायची तरच त्याची खरी मजा. एप्रिल मे मधल्या बिरड्यात दाताखाली येणाऱ्या वालाबरोबर बिरड्यातल्या कैरीच्या गरम गरम कापा हमखास हव्यातच. बिरडं भाताचं जेवण असलं की जेवण कसं झालय वगैरे सांगायच सुचतच नसे, बस्स जेवतच राहायचं.. त्या तिखट बिरड्याबरोबर किती भात खाल्ला गेला याची गणतीच नसायची. जेवण संपत संपता भांड्याचा आवाज आला की 'हे काय, इतक्यात संपलं पण ?' असे विचारात पुढच्यावेळेस थोडं जास्त कर असे आईला सांगत भोजन समारंभ आटपयाचा. माझ्याच काय तुमच्याही घरात बिरडं भाताच्या जेवणानंतर बिरडं उरल्याचं तुम्हाला आठवत नसेल ..अहो उरलं तर ते बिरडं कसलं. बिरडं भात जेवल्यावर कितीतरी वेळ तुम्ही त्याच्या अविट चवीच्या दुनियेत असता.

तर अस हे स्वर्गीय चवीची अनुभूती देणारं वालाचं बिरडं.. नुसतंच वालाचं नाही नागोठण्याच्या कडव्या वालाचं बिरडं. नागोठणे आणि कडवे वाल हे समीकरण इतकं डोक्यात बसलंय की कोणी नागोठण्याचा नातेवाईक भेटला तर तो नक्कीच वाल विकत असावा असं नेहमी वाटायचं. आमच्या बाहेरगावच्या म्हणजे इंदूर, भोपाळ येथील नातेवाईकांना तिथे हे कडवे वाल मिळत नाहीत. ठाण्याला आल्यावर खूपच कासावीस झाल्यासारखे ते लोक कोणाकोणाला कडवे वाल मिळतील का म्हणून फोन करत असतात. मी पण थोडावेळ गम्मत बघून, मग बघा माझी किती ओळख आहे असे दाखवत पेणच्या झिराळ आळीतल्या देशपांडे ला फोन लावतो आणि त्यांचा वालाचा (जीवनमरणाचा) प्रश्न सोडवल्यासारखे भासवतो आणि मग दुसऱ्या दिवशी घरी आलेल्या पिशवीतले टपटपीत हिरवट सोनेरी वाल पाहिल्यानंतर ही मंडळी काहीतरी जिंकल्याच्या अविर्भावात त्यांच्या निघण्याची तयारी करतात. नागपूरकरांची पण थोडीफार हीच गत असते..तिथे नागपूरमध्ये धरमपेठेतल्या बापट या एकमात्र दुकानात चांगले कडवे वाल मिळतात..थोडे महाग असतात पण मिळतात. एकूणच ठाणे मुंबईकडचे लोक या बाबतीत फारच नशीबवान म्हणावे लागतील.

वालाच्या बिरड्याला वालाची रस्सा भाजी किंवा वालाची आमटी बोलणाऱ्या मंडळींशी मी या विषयावर फार बोलत नाही..म्हणजे काही कारण नाही पण नाही बोलत. बिरड्याच्या जातीतला डाळिंबी हा प्रकार देखील मला आवडतो .. त्याचं एक वेगळेपण आहे. सहसा ब्राह्मण लग्नात किंवा मुंजीत डाळींब्या असतात. परवा तर ठाण्याच्या टिपटॉप मध्ये एका लग्नात 'वालाचं बेर्ड' असा बोर्ड लावून पंजाबी मसाल्यात केलेलं गुजराथी चवीचं 'बेर्ड' खाल्लं..क्षणभर काही सुचेना..कशाला नको ते प्रयत्न करतात हे लोक कळत नाही. कडव्या वालाचा असा क्रिमिनल वेस्ट मला अजिबात सहन होत नाही.

वालाची खिचडी म्हणजे सीकेप्यांचा जेवणातला मानबिंदूच. जेवणात साबुदाणा खिचडीला नसेल इतकी मागणी आणि मान नारळाच्या दुधात शिजवलेल्या वालाच्या खिचडीला असतो. नागपूरच्या सीकेपी फूड फेस्टिवल मध्ये तीन दिवस पुरतील इतके वाल नेऊनसुद्धा ते दुसऱ्याच दिवशी संपले तेव्हा तिथे केटरिंग ची व्यवस्था पाहणाऱ्या गिरीष गुप्ते काकाना रविवारी सकाळी मुंबईहून २५ किलो भिजवलेले वाल 'विमानाने' मागवायला लागले होते..सकाळच्या पहिल्या विमानाने येऊन मोठ्या मानाने ते वाल चिटणवीस सेंटरमध्ये दाखल झाल्याचे अनेक नागपूरकरांना माहित असेलच. अर्थात ते ही कमी पडले. सीकेपी खवय्यांची हृदये काबीज करणाऱ्या बिरड्या बरोबरच पडवळासारख्या लिबलिबीत भाजीला आणि तत्सम दुसऱ्या काही भाज्यांना चटपटीत भाजीचा दर्जा देण्याचे काम फक्त कडवे वालचं करू शकतात.

राजेशाही राजमा आणि पाव इंची पावट्याला कुठच्याकुठे मागे टाकणाऱ्या कडव्या वालाला सीकेपी घरातच काय तर अनेक मराठी घरात मानाचं स्थान आहे. वालाचं बिरडं आठवड्यातून एकदा तरी झालंच पाहिजे अशी अनेक घरं तुम्हाला मिळतील. पण वालाच्या बिरड्याची ही चव, हा वारसा पुढे नेणाऱ्या सुगरणी मात्र कमी होत चालल्या आहेत याची खंत नक्कीच आहे

समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट
Sameer6949@gmail.com

पाऊस ठरवतो...


पावसाळ्याच्या दिवसात आपण काय खायचं, कधी खायचं, कुठे खायचं हे आपण नाही तर पाऊस ठरवतो. एका तासापूर्वी जेवलेल्या आपल्या पोटातली नसलेली भूक जागृत करण्याचे काम पाऊस व्यवस्थित करत असतो. आज पाऊस जास्त आहे म्हणून ऑफिसमधून लवकर घरी जाण्यासाठी निघाल्यावर बसस्टॉप जवळ कुठेतरी वडे तळल्याचा खमंग वास येतो. तसा तो रोजच येतो, पण पाऊस पडत असताना तो तुमच्या आतपर्यंत भिडतो. मग अगदी धो धो पडणाऱ्या पावसात पण वडापाव च्या गाडीभोवती पडलेल्या गराड्यात घुसून आपल्याकडे जास्तीतजास्त एक सेकंद पाहणाऱ्या त्या गाडीवाल्याला नजरानजर होताच 'वडापाव दे रे एक' अशी ऑर्डर टाकून रटरटणाऱ्या तेलाच्या कढईतला वड्याचा पुढचा लॉट त्या ट्रे मध्ये कधी पडतोय आणि कधी आपल्या हातात येतोय असं आपल्याला होतं. आपल्या मागून आलेला कोणी तरी हात लांब करून आपल्या आधी तर घेणार नाही ना .. वडावाला त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या त्याच्या ओळखीच्या गिऱ्हाईकाला तर मोठ्ठ पार्सल देणार नाही ना, परातीतला आधी उरलेला थंडगार वडा आपल्या नशिबी येणार नाही ना, एक ना दोन अशा अनेक शंका मनात ठेऊन गाडीच्या टपा वरून पडणारे ओघळ पाठीवर घेत आपण आपला गड लढवत असतो. पाठीवर भिजलेल्या कपड्यांची थंडी आणि पुढे धगधगणाऱ्या स्टोव्ह ची गर्मी यांच्या अफलातून जुगलबंदीत वरून कोसळणारा पाऊस तुम्हाला फक्त बटाटावडाच खायला प्रवृत्त करतो. तयारच आहे म्हणून परातीमधल्या केविलवाण्या गोळाभजी कडे तुम्ही डुंकूनसुद्धा पाहात नाही.. 'काय मस्त पाऊस आहे ना, चल आज एक मस्त इडली चटणी खाऊ ' असं बोलून गेलात का कधी तुम्ही इडली खायला.. नाही ना...पाऊसच ठरवतो.

पाऊसच ठरवतो तुमची संध्याकाळ ..रविवारची दुपार मटणावर ताव मारण्यात गेलेली असते..जेवण अंगावर आलेलं, त्यामुळे छानशी झोप झालेली आणि संध्याकाळी मस्त पाऊस सुरु. कुठेच नसतं जायचं. फक्त पावसाकडे बघायचं आणि गेल्या पावसाळ्यांच्या आठवणीत रमायचं. आज तिने नाही, तुम्ही काम करायचं. आल्याच्या चहाबरोबर बटाट्याची भजी, असेल घरात एखादं तर चार कापट्या वांग्याच्यापण पिठात बुडवून तळून काढायच्या. गॅलरीत टीपॉय सजवायचा. खुर्चीवर बसल्याबसल्या पाय लांब करून डोळे मिटायचे, परत उघडायचे .. सुखावलेल्या चेहेऱ्यानी तिच्याकडे बघायचं ..नशिबाला मानायचं, एक हातात भजी आणि दुसऱ्या हातात चहा .. पाऊसच ठरवतो, आठवून तर पहा.

पाऊसच ठरवितो तुम्ही जेवणार काय ते ...असो रविवार की मधला कोणताही वार..पावसाळाच तो, सुरु असते संततधार. पन्नास पदार्थ येतात करता तुम्हाला पण कधी कधी जेवायला काय करावं हे सुचतंच नसतं, सुचत नसतं म्हणून ठरत नसतं .. पण पाऊस आहेच की ठरवायला. तोच सुचवतो एखादा साधासा बेत आणि सुरु होते तुमची तयारी. अचानक तुम्हाला मांडणीवरच्या, मागे गेलेल्या एका खास डब्याची आठवण येते. डबा उघडताच त्या अलौकिक सुगंधाचा दरवळ घरभर पसरतो, आज घरात काहीतरी खास शिजणार याची चाहूल सर्वांचं लागते. डब्यातली वस्तू ओट्यावर येते आणि साजरी होऊ लागते पावसाळ्यातली एक खास मेजवानी..हो मेजवानी, गरमागरम भात आणि सीकेप्यांची आवडती काड्यांची मिरवणी. मिरवणी म्हणजे साजूक तुपावर परतवलेल्या सुक्या बोंबलाच्या, म्हणजेच काड्यांच्या जोडीला बटाट्याच्या फोडी आणि मिरी घातलेल्या वाटणात मस्त उकळलेलं कालवण ..बाहेर पावसाचा थयथयाट आणि घरात मिरवणीचा घमघमाट. वाफाळलेल्या पांढऱ्या शुभ्र भातावर हिरवट मिरवणी ओतून घेतलेल्या पहिल्या घासाबरोबरच तुमचे नाक आणि डोळेही या मिरीच्या फणकाऱ्याचा आनंद घेतात, तुपाच्या तवंगाची काड्यांची मिरवणी क्षणात तुमच्या मनाचा ताबा घेते.. वाटी वाटी पिऊन मग जीव असा तृप्त होतो.. ध्यानी मनी नसतानाही बेत कसा फक्कड बनतो..तुम्ही नाही हो ,पाऊसच ठरवतो.

पाऊसच ठरवतो कधी यायचं आणि पाऊसच ठरवतो कधी जायचं. पण या पावसाळ्यात जरा लक्ष ठेऊन बघा ..तोच तुम्हाला सुचवतो काय खायचं आणि काय प्यायचं.

समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट
#samhere #sameergupte.blogspot.in
sameer6949@gmail.com

Saturday, 13 May 2017

सीकेपी आणि सोडे - एक अतूट नातं


तुम्ही सीकेपी लोकांनी 'सोडे' या सुक्या बाजाराला थोडं जास्तच "ओव्हर हाईप'' करून ठेवलंय असे बोलणारे काही मित्र व काही मोजकेच ओव्हर हेल्थकॉन्शस ज्ञातीबांधव मला 'बोअर टाईप' वाटतात. ओव्हर हाईप ? अहो हे सोडे म्हणजे काय नुसता खायचा पदार्थ वाटला काय तुम्हाला? की टाकली जाळी, काढला समुद्रातून, वाळवला, शिजवला, खाल्ला आणि झालं. अहो सोडे म्हणजे आमचा जीव की प्राण, आमची अस्मिता - आमची शान, आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक वगैरे वगैरे. या सोड्यांच्या गप्पांवरपण आम्ही तास दोन तास घालवू शकतो. दिवाळीत भेट म्हणून आलेल्या प्रशांत कॉर्नर च्या चमकदार मिठाई च्या बॉक्सकडे जसं प्रेमाने बघतो ना त्या पेक्षा जास्त प्रेमाने टेबलावर आणून ठेवलेल्या सोड्याच्या पिशवीकडे पाहतो आम्ही. आपल्या सीकेपी फुड फेस्ट ला ग्लॅमरस सेलिब्रिटी गेस्ट रेशम टिपणीस भेट देते तेव्हा तिच्याकडे लोक जितक्या कौतुकाने पाहत बसतात त्यापेक्षा जास्त कौतुकाने रेशम स्टॉल वर मांडलेल्या सोड्यांकडे पाहत असल्याचं मी पाह्यलंय, पटत नसेल तर विचारा तिला. जूनपासून ऑगस्टपर्यंत आम्हा सीकेप्यांच्या जेवणाला आणि जिवनाला (दोन्ही एकच असतं)असलेला एकमात्र भक्कम आधार म्हणजेच हे सोडे..उभे सोडे...नुसतेच उभे सोडे नाहीत तर मुरुडचे - दिघीचे उभे सोडे. तसं पाहिलं तर समुद्र हा सगळीकडे सारखाच, पण कोणजाणे असं काय आहे त्या मुरुडच्या समुद्रात की आपल्या जीवावर उदार होत, लांबसडक सोडे बनून, स्वतःचा भाव कमालीचा वाढवत, सीकेपी घरात आणि ताटात पडू इच्छिणाऱ्या कोलंब्या फक्त तिथेच पोहायला जातात. असो.
तर आपले हे लाडके सोडे... हे सोडे बाजारातून आणायचे नसतात बरं का ...ते घरी येतात. तुमच्या घरातले सोडे संपत आले की आपोआप ते येतात. साधारणपणे प्रत्येक सीकेपी घरामागे एक ओळखीचा सोडेवाला फिक्स असतो तो बरोबर वेळेवर ते आणून देतो. जणू एखादा पाहुणा यावा तशी याची उठबस केली जाते. म्हणजे खूप वर्षांपूर्वी आमच्या घरी मुलुंडचे रणदिवे सोडे देत असत, ठाण्यातल्या अनेक घरात प्रधान काका सोडे देत असत, अलीकडल्या काळात नव्या दमाचे ठाण्याचे साई, प्राजक्ता, कौशिक, पुण्याचे देशमुख ही मंडळी फेसबुक आणि फूड फेस्ट मध्ये सोडे विकताना दिसतात. याना नुसतं पाहूनदेखील आपल्याला किती हायसं वाटतं. आपलेच सोडे कसे सर्वात बेस्ट हे तर या सगळ्यांकडून तुम्ही एकदा तरी ऐकावच. इतर काही जण अगदी अतिरेक करत जणू काही त्या लाल गुलाबी कोलंब्याना अंगाखांद्यावर खेळवलंय आणि मगच त्यांचे सोडे करून तुम्हाला दिलेत अशा अविर्भावात,अहो १६०० रुपयाकडे काय बघता .. बाहेर २००० चा भाव सुरु आहे, थोडाच माल शिल्लक आहेत, चला पाव किलो तरी घेऊन टाका, अशा प्रकारे गळेपडू मार्केटिंगपण करतात.
सोडे म्हणजे सीकेपी घरातली एक जीवनावश्यक वस्तूच म्हणा. तूरडाळ एकशे चाळीस ची दोनशे झाली तर महाग महाग म्हणून ओरडणारे आम्ही दोन हजारावर गेलेल्या सोड्याच्या भावाची काळजी नाही हो करत कधी. एकवेळ सणासूदीला घ्यायच्या साड्यांची खरेदी पुढे ढकलू पण मुरुडच्या सोड्यांच्या खरेदीत हयगय नाही. अमेरिकेला मुलाकडे जाताना एक जोड कपडे कमी नेतील पण मुलासाठी २ किलो सोडे वेगळे आणि पाव किलोच्या चार पाच पुड्या तिथल्या मित्रपरिवाराला वाटण्यासाठी वेगळ्या अशी जय्यत तयारी करून आपली मंडळी प्रवासाला निघतात. सकाळच्या नाश्त्याला सोडे घालून पोहे (असं ऐकण्यापेक्षा पोहे घालून सोडे) केलेत अस ऐकायला मिळालं तर त्या दिवसाचं सोनं झालं म्हणून समजा. सोड्याची खिचडी, सोड्याचं लीप्त, सोड्याची चटणी,नुसतेच कुरकुरीत तळलेले सोडे, न खपणाऱ्या भाजीची मागणी चारपट वाढवणारी सोडे घालून केलेली वांग्याची भाजी आणि भातावर ओतण्याआधी वाटीतल्या लालबूंद कालवणावर तरंगणाऱ्या तेलाच्या हलक्याश्या तवंगातून डोकावणाऱ्या गरम बटाट्याचा चटका लाऊन घेत घेत डोळे मिटून मनसोक्त प्यायल जाणारं सोड्याचं झणझणीत कालवण असे अनेक खाद्यपदार्थ आठवड्यातून एकदा तरी सीकेपी घरात बनतातच बनतात. तुम्ही घरी आलेल्या एखाद्या नातेवाईकाला 'सोड्याची खिचडी चालेल का जेवायला?' असं विचारून पहा..कधी एकदा टुणकन उडी मारून पानावर बसतोय असा भाव त्याच्या चेहेऱ्यावर येतो कि नाही बघा. एखाद्या कायस्थ भगिनी मंडळानी कधी ''सोडे घालून केलेले नाविन्यपूर्ण पदार्थ '' अशा संकल्पनेवर आधारित पाककला स्पर्धा जरी आयोजित केली तर त्याला देखील उत्तम प्रतिसाद मिळेल...प्रयत्न करून बघा.. परीक्षक म्हणून मी आहेच की.
छे छे... उभ्या सोड्याचा फेस्टिवल वगैरे नाही करायचा मला. पण आडव्या हाताने ताव मारत मटकावायच्या उभ्या सोड्यांशिवाय आपल्या याआयुष्याच्या फूड फेस्ट ला मजा नाही. ओव्हर हाईप्ड तर ओव्हर हाईप्ड पण पानात चार सोडे असलेलं साधसं जेवण सुद्धा माझ्यासाठी एकशेएक टक्के ''सुपर लाइक्ड'' अशी मेजवानी असते. शाकाहारी जेवण कितीही रुचकर आणि चांगलं असलं तरी त्यातल्या एखाद्या भाजीत थोडेतरी सोडे घालायला पाहिजे होते असं नकळत मनात येणं हे माझ्या जिभेचं आणि सोड्यांचं अतूट नातं सांगतं. तुमचं काय सांगा बरं ?
समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट
sameer6949@gmail.com #samhere #sameergupte.blogspot.in#passionforfood

Tuesday, 2 May 2017

झमझम पुलाव

'झमझम पुलाव'
अकील शेख...तसे ठाण्याच्या पहिल्या राबोडीत माझे असंख्य मुसलमान मित्र आहेत पण या माणसाच्या मैत्रीला तोड नाही. खूप वर्षांपूर्वी जेव्हा याला कळलं की मी फूडी आहे ( खादाड आहे असं बोलण्या पेक्षा फूडी आहे काय मस्त वाटतं ना ) तेव्हा पासून वेगवेगळ्या पद्धतीच्या बिर्याण्या, कबाब, रान,तंदूर, काली मिरी भेजा, जबान का सूप असले पदार्थ खाऊ घालण्यासाठी अनेकदा मला कुठे कुठे घेऊन जात असतो. त्याच्याबरोबर असताना काही नियम आहेत .. म्हणजे ऑर्डर तोच देणार, आपण किती (दाबून) खायचं हे तोच ठरवणार, त्या हॉटेलमध्ये तो कितीवेळा आलाय आणि अजून काय काय खाल्लं पाहिजे हे तोच बोलत राहणार आणि अर्थात बिलाच्या वेळेला 'दादा, इधर चूप रैनेका' म्हणून बिलही तोच भरणार हा प्रकार काही वर्ष सुरु आहे. रमजान सुरु झाला की याचे फोन सुरु होतात आणि अस्सल मोगलाई पदार्थांचे मुंबई आणि कौसा येथील गल्लीबोळातील अड्डे पाहण्याचे बेत रचले जातात. अकील ला ओळखणारे माझे अनेक मित्र याला फोन करून बिर्याणीची ऑर्डर देतात - अनेकांनी त्याचा मोबाईल पण अकील बिर्याणीवाला म्हणून सेव्ह करून ठेवला आहे. वास्तविक याचा धंदा छपाईचा आहे पण हा पण माझे नाव सांगून कोणी फोन केला कि बिर्याणी त्याच्या घरी पोचेपर्यंत इस्माईल बिर्याणीवाल्याच्या मागे असतो. हा अकील खाणे आणि खिलवणे या बाबतीत इतका उत्साही आहे की माझ्या मुलीच्या लग्नात मेनू काय असणार हे त्याने माझी मुलगी पाच वर्षाची असताना ठरवलंय. खरंच सांगतो, भविष्यात माझ्या मुलीच्या लग्नात तुम्हाला "अरे अयुब अम्मीको बिर्याणी दे, युसूफ वो अपा के थाली मे सालन डाल, उस्मान जल्दी टिक्के लेके आजा - मैमान चिल्ला रईले है .. अशा आरोळ्या ऐकायला आल्या तर चमकून जाऊ नका.. हा काहीही करू शकतो.
या साहेबाचं लग्न झालंय, सुग्रण आणि प्रेमळ बायको अंजुम, मुलगा अर्शान आणि मुलगी अरिबा असा छोटासा परिवार आहे. परवा माझ्या ऑफिसमध्ये याला बसल्या बसल्या काय झालं कोणासठाऊक पण याने बायकोला फोन केला .. "कल छुट्टी है .. देख अपने दादा को झमझम पुलाव खाना है.. कल बना दे , सारी तयारी मै लेके आऊंगा". मी काही बोलायच्या आताच ' दादा कल तू ये चीज खाके देख.. मेरेको याद करेगा" असा म्हणून निघून गेला आणि खरोखर दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजता गरमागरम डबा घेऊन हजर झाला. एक तर रविवारी त्या सोडेवाल्या साई कुळकर्णी च्या मुलाच्या मुंजीत आमरस पुरीचे जेवण पोटभर जेऊन मी घरी आलो होतो पण पिशवीतून डोकावणारा तो स्टील चा डबा बघून मला राहवेना. तुम्हाला सांगतो, पोट फुटेस्तोवर जेवल्यानंतरही असे ज्याला होते त्या खादाडालाच 'फूडी' म्हणतात बरंका. हं तर मी डबा उघडला आणि उघडताच त्या पुलावाची सजावट पाहून कधी नाही ते मला फोटो काढावेसे वाटले . झाकण उघडताच दरवळत येणाऱ्या त्या मोगलाई सुगंधाने अस्सल कायस्थ मनाचा ताबा घेतला .. ज्या प्रकारे डबा सजवला होता ते पाहून तर डब्यात चमचा घालायची पण इच्छा होत नव्हती पण शेवटी न राहवून पुलाव ताटात घेत मी पुन्हा एकदा मनसोक्त जेवलो. पानात चमचमीत झमझम पुलाव .. कधीही न ऐकलेला - न पाहिलेला - न चाखलेला - एका शब्दात सांगायचं तर केवळ लाजबाब ! नेहेमीच्या साध्या तांदुळाचा केलेला, मटण, कलेजी, चिकन घातलेला, वर खिमा कोफ्ते आणि अंडी लावून सजवलेला आणि खाताक्षणी अस्सल मोगलाई जायक्याचा साक्षात्कार होणारा हा झमझम पुलाव म्हणजे अकील ने दिलेली एक भन्नाट भेट.
मैत्रीचे बंध जोपासण्याचे अनेक फायदे असतात - झमझम पुलाव खायला मिळाला म्हणून नाही पण आपल्या घरात आपल्या पद्धतीची एक खासियत बनवून आपल्या मित्राला द्यावी या विचाराची पण दाद द्यावीशी वाटते. खाल्यानंतर त्याला आभार मानायला फोन केला तर 'दादा, अल्लाने तेरा नाम लिखके भेजा था, तेरे तक पहुंचा दिया बस्स'' आणि नंतर जोरात ओरडून " अरे देख, दादा और अम्मी तेरेको दुआ दे रैली है' असे बायकोला सांगू लागला . हे कौतुक वाचण्यासाठी अकील आणि अंजुम दोघेही व्हाट्सअप आणि फेसबुक वर नाहीत, नाहीत म्हणजे फेसबुक च्या १०-१२ मैल आसपास पण नाहीत .. पण ओतप्रोत प्रेमाने बनवलेल्या झमझम पुलावाच्या स्वादाने माझ्या फेस वर एक समाधानाची दिलखुष स्माईली आणण्यात यांचा हातखंडा आहे. तुम्हाला झमझम पुलावची ओळख करून देणारा आजचा हा लेख , तो बनवणाऱ्या अंजुम भाभीला आणि धाकट्या भावासारख्या असलेल्या प्रिय अकील यास प्रेमपूर्वक समर्पित. जमल्यास याची रेसिपी नक्कीच शेअर करीन.
समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट
#samhere #sameergupte.blogspot.in#loveforfood

Friday, 11 November 2016

# My मराठी



भाषा... म्हणजे मराठी भाषा कशी टिकवावी हा एक मोठा प्रश्न आहे. काही प्रसंगी ऐकूनच बेशुद्ध पडू अशी भाषा आपल्याच माणसांकडून आणि आपल्यासमोरच सर्रास बोलली जाते.

प्रसंग एक -
स्थळ : माझेच घर ..
साधारण १० वर्षांपूर्वीची गोष्ट.  माझी मुलगी शाळेतून घरी आली. मी, माझी बायको, आई - बाबा असे सर्व तिची वाट पाहत बसायचो तसे त्या दिवशी पण बसलो होतो. ही आली आणि दप्तर सोफ्यावर भिरकावले. "मम्मा,आजपासून नवीन टीचर आली आहे - आमची सगळ्यांची फुल फाटलीये " असा बोलून ती धपकन सोफ्यावर बसली. हे वाक्य ऐकल्यानंतर मी आणि बाबा माझ्या मुलीकडे, बायको माझ्या आईकडे आणि आणि आई माझ्याकडे पाहू लागली. घरात पूर्ण सन्नाटा. मी आईकडे पाहताच आईने स्वतःला स्थिर ठेवत, शक्य तेवढ्या शांतपणे  "तिला फाटली या शब्दाच्या मागे कोणता शब्द आहे ते समजावून सांग मग तिला कळेल" अस म्हणताच "आजी, हे काय सांगणार मला, टीचर इतकी डेंजर आहे कि हे शाळेत आले तर यांची पण फाटेल". आता मात्र कमाल झाली. कस या मुलीला समजावू कि हे सगळं बोलणं चांगलं नाही..कुठे शिकली हे सर्व.

प्रसंग दोन -
स्थळ : माझी माजी बँक..
कुठल्यातरी तरी कर्जासाठी लागणारा महत्वाचा कागद घेऊन मी बँकेत गेलो होतो. केबिन मध्ये पाहिलं तर व्यवस्थापक साहेब काही लोकांबरोबर बोलत हॊते. त्यांना व्यत्यय नको म्हणून कर्ज विभागातल्या एक जुनिअर क्लार्क असलेल्या मुलीच्या हातात कागद देऊन आठवणीने साहेबांच्या सुपूर्त करावयास सांगितला. इतक्यात काहीही कारण नसताना बाजूच्या टेबलावरून एक सिनिअर मुलगी काम करता करता तिला म्हणाली ' ए बाई, विसरू नकोस मागच्यासारखी.. नाहीतर साहेब परत चढतील तुझ्यावर"... पुन्हा एक सन्नाटा...पण या वेळी फक्त माझ्या मनात .. त्या दोघीनांही यात आपण काही वेगळं बोलतोय याची सुतराम जाणीव नव्हती...'चिडतील' या शब्दाची जागा 'चढतील' या शब्दाने घेतली होती ... मी वळून साहेबांकडे पाहिलं...काही न बोलता बँकेतून बाहेर पडलो.

मराठी भाषेवरच्या इंग्रजी आक्रमणामुळे तर जे काही ऐकायला मिळतं काय सांगू.  'तुझ्या पॅंटीवर डाग लागलाय, शर्टाला व्हाईटनेसपणा पाहिजे ,तापामुळे खूप विकनेसपणा आलाय, मॉर्निगवॉक साठी चालायला गेलेत, केटरिंगची मोठी ऑर्डर मारली, वयामुळे आईच्या डोळ्यांची साईट वीक झालीये, उगीच डोक्याला हेडेक नको, पुढे जाऊन डावीकडे लेफ्ट घ्या, मोबाईल चा रिचार्ज मारला' हे नवजात शब्दसंच तर इतके अंगवळणी पडलेत कि ते आपल्या भाषेचाच एक भाग आहेत असा वाटायला लागलंय. कोकणातल्या काही घरात तर झोपताना  'दिवा विझव' म्हणण्या ऐवजी 'लाईट काढ' असं बोलताना मी स्वतः ऐकलंय. एक ना दोन ..अनेक प्रसंग, अनेक शब्द असे आठवतात की जर भाषेला आत्मा असेल तर तर त्याचा पण थरकाप उडेल.

मुंबईत राहणाऱ्या अमराठी लोकांची मराठी हा एक वेगळा विषय आहे. अतिशय प्रयत्नपूर्वक मराठी बोलून ते व्यवसाय करतात हे कौतुकास्पद आहे. पण कधी कधी मोठे विनोदही घडतात.

माझ्या ओळखीतले एक कन्नड गृहस्थ 'अचानक' हा शब्द इतक्यावेळा आणि इतक्याठिकाणी वापरतात काय सांगू. म्हणजे "उद्या संध्याकाळी ५ वाजता तुम्ही अचानक माझ्या ऑफिसला या. चहा पाणी पिल्ला कि आपण इंजिनीअर ला कळवून अचानक साईटवर जाऊ आणि गाडी पार्किंगमध्ये ठेवा, येतेवेळी तुम्हाला  खाली सोडून मी अचानक वर जाईन." हे संभाषण जर कोणी ऐकलं तर त्याला अचानक काहीतरी व्हायचं. हा कन्नड माणूस मराठी इतकं चांगल बोलतो म्हणून कौतुक करावं की मराठीची 'अचानक' वाट लावतो म्हणून झोडून काढावं कळत नाही.

जवळपास अमराठी वस्ती असलेल्या घाटकोपर, मालाड इथे राहणाऱ्या गुजराती माणसांनी पूर्ण शिकल्याशिवाय मराठी बोलूच नये या मताचा मी आहे. मी राहतो तिथे म्हणजे खारकर आळीत हा समाज खूप मोठ्या संख्येने आहे. अस्सल मराठी वस्तीत राहिल्यामुळे त्यांच्यावर मराठीचे संस्कार चांगले आहेत. तरीपण  दुसऱ्या गुजराती माणसाला माझी ओळख करून देताना काय सांगतात माहीत आहे "हे लै मोठा मानूस हाय..हेचा लै मोठ्ठा होल हाय - फुल्ली ऐरकंडिसन - चार पाच से माणस आरामसुन मावते .. सोरी एक नाय हा सोरी..  ४-५ होल हाय''...अरे कशाला...त्याला गुजराती मध्ये सांग ना. एकाच वेळी माझी, मराठीची आणि इंग्रजीची का वाट लावतोस. पण उत्साह दांडगा  मराठी बोलण्याचा.
 
याच्या बरोब्बर विरुद्ध ठाण्याच्या हरी निवास सर्कलवरचा क्वालिटी पेंटवाला सरदारजी - माझा मित्र परमजीत. इतकं सहज, सोप्प आणि अस्खलित मराठी बोलतो कि तुम्हाला वाटावं हा दाढी वाढवून फेटा बांधलेला गोडबोले किंवा केळकर आहे. माझा अनुभव हा आहे की एकूणच मुंबई पुण्यातली ही सरदार मंडळी मराठी उत्कृष्ट बोलतात.

एक मात्र नक्की..या सर्व मंडळींनी आपल्या मराठी भाषेला जवळ करून भाषेला नसलं तरी मराठी मैत्रीला समृद्ध केलंय. भाषा टिकवायला ती चलनात असणं गरजेचं आणि भाषा जपायला ती वापरणाऱ्या सर्वांचं कौतुक करत आपण त्यांचं करेक्शन करणं महत्वाचं.

समीर गुप्ते
samhere#sameergupte.blogspot.com#sameer6949@gmail.com

Wednesday, 2 November 2016

"सीकेपी म्हणजे ....."

सीकेपी म्हणजे फक्त खाणारे पिणारे असे समजणाऱ्या मंडळींसाठी सीकेपी समाजाची थोडीशी ओळख !

"सीकेपी म्हणजे ....."

या एक दोन महिन्यातील वेगवेगळ्या मोर्चांच्या वातावरणामुळे हल्ली लोक खूप चौकशी करू लागलेत हो. म्हणजे,तुम्ही कोणत्या जातीचे, तुम्ही सीकेपी सीकेपी म्हणजे नक्की कोण वगैरे. उत्तरादाखल मी सांगतोच की आम्ही चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजेच सीकेपी. साधारणपणे ठाणे मुंबई बाहेरच्या लोकांना हा प्रश्न पडतो. "अच्छा म्हणजे तुम्ही मच्छी खाणारे ब्राह्मण का ?" हे ऐकून तर मला गंमतच वाटते. अहो मच्छी खाणाऱ्या काही ब्राह्मणांनी आम्हाला कधीच मागे टाकलंय. आम्ही सोमवार गुरुवार तरी पाळतो. पण आमचे हे दाते, कुलकर्णी, रिसबूड,जोशी, देशपांडे या आडनावांचे घट्टमित्र तर सगळेच वार सारखेच म्हणत आम्हा सीकेप्यांनाच कुठे काय 'बेस्ट' मिळतं हे सांगतात. म्हणून वाटलं कि या चौकस मंडळींना थोडं आपल्याविषयी सांगावं. खरंतर जातीपातीचे दिवस आपल्या दृष्टीने काही दशकांपूर्वीच संपले असले तरी आपली ओळख देताना काही गोष्टी सांगणे गरजेचं. बघा तुम्हाला पटतंय का... सीकेपी म्हणजे .....

सीकेपी म्हणजे बाजीप्रभूंचा आवेश,
सीकेपी म्हणजे बाळासाहेबांचा आदेश,
सीकेपी म्हणजे गडकऱ्यांचे प्याले,
सीकेपी म्हणजे आमचे खळे काका आणि मोहिले

सीकेपी म्हणजे अवधूतच गाणं,
सीकेपी म्हणजे दिलखुलास जगणं,
सीकेपी म्हणजे नितांत सौंदर्याच लेणं,
सीकेपी म्हणजे बुद्धिमत्तेच खणखणीत नाणं

सीकेपी म्हणजे रविवारच मटण,
सीकेपी म्हणजे बोम्बलाच कालवण,
सीकेपी म्हणजे चीम्बोरीचा घट्ट रस्सा,
सीकेपी म्हणजे चवदार हातांचा रुचकर वारसा

सीकेपी म्हणजे निष्ठा ,
सीकेपी म्हणजे विश्वास,
सीकेपी म्हणजे भरवसा,
सीकेपी म्हणजे प्रगत समाजाचा खराखुरा आरसा

सीकेपी म्हणजे नितिमत्ता,
सीकेपी म्हणजे गुणवत्ता,
सिकेपी म्हणजे सीडीं ची विद्वत्ता,
सीकेपी म्हणजे क्रांतिकारी विचारांची सुबत्ता,

सीकेपी म्हणजे धैर्य,
सीकेपी म्हणजे शौर्य ,
सीकेपी म्हणजे संकटांशी दोन हात,
सीकेपी म्हणजे ताठ मानेने जगणाऱ्यांची जात

देशाच्या उभारणीत हिरहिरीने भाग घेणारा,कला क्रीडा मनोरंजन क्षेत्रात आपली अनोखी छाप पाडणारा, सरकारी प्रशासकीय सेवेत सदैव अग्रस्थानी असलेला पुरोगामी विचारांचा सुशिक्षितांचा हा समाज. स्वाभिमान आणि देशाभिमानापेक्षा जगात काहीही मोठं नाही हे जन्मापासूनच मनावर बिंबवलेला हा आमचा समाज. अल्पसंख्यांक असूनही आरक्षणापेक्षा देश रक्षणासाठी लढणारा आमचा हा समाज. आपल्या संभाषण चातुर्याने, बुद्धिवादाने आणि अर्थातच पाककौशल्याने इतर सर्व समाजबांधवांची हृदये काबीज करणारा हा आमचा समाज. खऱ्या अर्थाने नाती जोडून मैत्रीचे बंध दृढ करणारा आणि या देशाच्या इतिहासात अनेक गौरवास्पद पदे भूषविलेल्या दिग्गजांचा हा समाज. सर्वात महत्वाचे म्हणजे... तुमची जात, तुमचा धर्म कोणताही असो, चांगल्या कामासाठी आजही तुमच्यासाठी आणि तुमच्यापाठी भक्कमपणे उभा राहणारा, तुमच्या दुःखात हळहळणारा आणि सुखात समरस होणारा आमचा हा समाज. अजून काय सांगू.

एक लाख नसू कदाचित..पण लाखात एक नक्कीच आहोत!

माझ्या सर्वधर्मीय समाजबांधवांना, मित्र परिवाराला आणि तमाम देशबांधवांना आम्हा सर्व सीकेपी समाजबांधवां तर्फे हार्दिक शुभेच्छा.

समीर गुप्ते, ठाणे.
samhere#sameergupte.blogspot.in#sameer6949@gmail.com
( आवडलं तर फॉरवर्ड करा ...माझ्या नावासहित केलं तर मला पण आवडेल)