रात्री जेवायला बिरडं हवं असेल तर गपचूप वाल निवडायला बस.. सांगा बरं तुमच्यातल्या कोणा कोणाच्या लहानपणी तुमच्या आईने हे सांगून तुमच्या कडून वाल सोलून घेतलेत. तसं वाल सोलायचे म्हणजे काही खूप मोठे काम नसे वाटत तेव्हा. वाल निवडता निवडता गप्पा मारणे आणि मध्येच आलेले कुचर कोणालातरी फेकून मारणे हे नित्याचेच. कधी कधी तर दोन्ही हातानी फुल्ल स्पीड मध्ये अर्धा तासात वाल निवडून खेळायला जायचे आणि खेळून आल्यावर हातपाय धुवून शुभंकरोती वगैरे बळेबळे आटपून पाटावर बसायच. चमचमीत बिरडं, भात, कैरीच्या करमटल्या आणि एखादी सांडगी मिरची पानात आली तर पंचपक्वान्नाला पण लाजवेल असे ताट सजलेले दिसायचं. जेवायला सुरुवात करतानाच बिरड्याची वाटी डायरेक्ट ओठाला लावायची आणि नाकात झणझणीत सुगंध भरत एक फुरका मारून मगच भातावर ओतायची तरच त्याची खरी मजा. एप्रिल मे मधल्या बिरड्यात दाताखाली येणाऱ्या वालाबरोबर बिरड्यातल्या कैरीच्या गरम गरम कापा हमखास हव्यातच. बिरडं भाताचं जेवण असलं की जेवण कसं झालय वगैरे सांगायच सुचतच नसे, बस्स जेवतच राहायचं.. त्या तिखट बिरड्याबरोबर किती भात खाल्ला गेला याची गणतीच नसायची. जेवण संपत संपता भांड्याचा आवाज आला की 'हे काय, इतक्यात संपलं पण ?' असे विचारात पुढच्यावेळेस थोडं जास्त कर असे आईला सांगत भोजन समारंभ आटपयाचा. माझ्याच काय तुमच्याही घरात बिरडं भाताच्या जेवणानंतर बिरडं उरल्याचं तुम्हाला आठवत नसेल ..अहो उरलं तर ते बिरडं कसलं. बिरडं भात जेवल्यावर कितीतरी वेळ तुम्ही त्याच्या अविट चवीच्या दुनियेत असता.
तर अस हे स्वर्गीय चवीची अनुभूती देणारं वालाचं बिरडं.. नुसतंच वालाचं नाही नागोठण्याच्या कडव्या वालाचं बिरडं. नागोठणे आणि कडवे वाल हे समीकरण इतकं डोक्यात बसलंय की कोणी नागोठण्याचा नातेवाईक भेटला तर तो नक्कीच वाल विकत असावा असं नेहमी वाटायचं. आमच्या बाहेरगावच्या म्हणजे इंदूर, भोपाळ येथील नातेवाईकांना तिथे हे कडवे वाल मिळत नाहीत. ठाण्याला आल्यावर खूपच कासावीस झाल्यासारखे ते लोक कोणाकोणाला कडवे वाल मिळतील का म्हणून फोन करत असतात. मी पण थोडावेळ गम्मत बघून, मग बघा माझी किती ओळख आहे असे दाखवत पेणच्या झिराळ आळीतल्या देशपांडे ला फोन लावतो आणि त्यांचा वालाचा (जीवनमरणाचा) प्रश्न सोडवल्यासारखे भासवतो आणि मग दुसऱ्या दिवशी घरी आलेल्या पिशवीतले टपटपीत हिरवट सोनेरी वाल पाहिल्यानंतर ही मंडळी काहीतरी जिंकल्याच्या अविर्भावात त्यांच्या निघण्याची तयारी करतात. नागपूरकरांची पण थोडीफार हीच गत असते..तिथे नागपूरमध्ये धरमपेठेतल्या बापट या एकमात्र दुकानात चांगले कडवे वाल मिळतात..थोडे महाग असतात पण मिळतात. एकूणच ठाणे मुंबईकडचे लोक या बाबतीत फारच नशीबवान म्हणावे लागतील.
वालाच्या बिरड्याला वालाची रस्सा भाजी किंवा वालाची आमटी बोलणाऱ्या मंडळींशी मी या विषयावर फार बोलत नाही..म्हणजे काही कारण नाही पण नाही बोलत. बिरड्याच्या जातीतला डाळिंबी हा प्रकार देखील मला आवडतो .. त्याचं एक वेगळेपण आहे. सहसा ब्राह्मण लग्नात किंवा मुंजीत डाळींब्या असतात. परवा तर ठाण्याच्या टिपटॉप मध्ये एका लग्नात 'वालाचं बेर्ड' असा बोर्ड लावून पंजाबी मसाल्यात केलेलं गुजराथी चवीचं 'बेर्ड' खाल्लं..क्षणभर काही सुचेना..कशाला नको ते प्रयत्न करतात हे लोक कळत नाही. कडव्या वालाचा असा क्रिमिनल वेस्ट मला अजिबात सहन होत नाही.
वालाची खिचडी म्हणजे सीकेप्यांचा जेवणातला मानबिंदूच. जेवणात साबुदाणा खिचडीला नसेल इतकी मागणी आणि मान नारळाच्या दुधात शिजवलेल्या वालाच्या खिचडीला असतो. नागपूरच्या सीकेपी फूड फेस्टिवल मध्ये तीन दिवस पुरतील इतके वाल नेऊनसुद्धा ते दुसऱ्याच दिवशी संपले तेव्हा तिथे केटरिंग ची व्यवस्था पाहणाऱ्या गिरीष गुप्ते काकाना रविवारी सकाळी मुंबईहून २५ किलो भिजवलेले वाल 'विमानाने' मागवायला लागले होते..सकाळच्या पहिल्या विमानाने येऊन मोठ्या मानाने ते वाल चिटणवीस सेंटरमध्ये दाखल झाल्याचे अनेक नागपूरकरांना माहित असेलच. अर्थात ते ही कमी पडले. सीकेपी खवय्यांची हृदये काबीज करणाऱ्या बिरड्या बरोबरच पडवळासारख्या लिबलिबीत भाजीला आणि तत्सम दुसऱ्या काही भाज्यांना चटपटीत भाजीचा दर्जा देण्याचे काम फक्त कडवे वालचं करू शकतात.
राजेशाही राजमा आणि पाव इंची पावट्याला कुठच्याकुठे मागे टाकणाऱ्या कडव्या वालाला सीकेपी घरातच काय तर अनेक मराठी घरात मानाचं स्थान आहे. वालाचं बिरडं आठवड्यातून एकदा तरी झालंच पाहिजे अशी अनेक घरं तुम्हाला मिळतील. पण वालाच्या बिरड्याची ही चव, हा वारसा पुढे नेणाऱ्या सुगरणी मात्र कमी होत चालल्या आहेत याची खंत नक्कीच आहे
समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट
Sameer6949@gmail.com
No comments:
Post a Comment