Saturday, 1 July 2017

पाऊस ठरवतो...


पावसाळ्याच्या दिवसात आपण काय खायचं, कधी खायचं, कुठे खायचं हे आपण नाही तर पाऊस ठरवतो. एका तासापूर्वी जेवलेल्या आपल्या पोटातली नसलेली भूक जागृत करण्याचे काम पाऊस व्यवस्थित करत असतो. आज पाऊस जास्त आहे म्हणून ऑफिसमधून लवकर घरी जाण्यासाठी निघाल्यावर बसस्टॉप जवळ कुठेतरी वडे तळल्याचा खमंग वास येतो. तसा तो रोजच येतो, पण पाऊस पडत असताना तो तुमच्या आतपर्यंत भिडतो. मग अगदी धो धो पडणाऱ्या पावसात पण वडापाव च्या गाडीभोवती पडलेल्या गराड्यात घुसून आपल्याकडे जास्तीतजास्त एक सेकंद पाहणाऱ्या त्या गाडीवाल्याला नजरानजर होताच 'वडापाव दे रे एक' अशी ऑर्डर टाकून रटरटणाऱ्या तेलाच्या कढईतला वड्याचा पुढचा लॉट त्या ट्रे मध्ये कधी पडतोय आणि कधी आपल्या हातात येतोय असं आपल्याला होतं. आपल्या मागून आलेला कोणी तरी हात लांब करून आपल्या आधी तर घेणार नाही ना .. वडावाला त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या त्याच्या ओळखीच्या गिऱ्हाईकाला तर मोठ्ठ पार्सल देणार नाही ना, परातीतला आधी उरलेला थंडगार वडा आपल्या नशिबी येणार नाही ना, एक ना दोन अशा अनेक शंका मनात ठेऊन गाडीच्या टपा वरून पडणारे ओघळ पाठीवर घेत आपण आपला गड लढवत असतो. पाठीवर भिजलेल्या कपड्यांची थंडी आणि पुढे धगधगणाऱ्या स्टोव्ह ची गर्मी यांच्या अफलातून जुगलबंदीत वरून कोसळणारा पाऊस तुम्हाला फक्त बटाटावडाच खायला प्रवृत्त करतो. तयारच आहे म्हणून परातीमधल्या केविलवाण्या गोळाभजी कडे तुम्ही डुंकूनसुद्धा पाहात नाही.. 'काय मस्त पाऊस आहे ना, चल आज एक मस्त इडली चटणी खाऊ ' असं बोलून गेलात का कधी तुम्ही इडली खायला.. नाही ना...पाऊसच ठरवतो.

पाऊसच ठरवतो तुमची संध्याकाळ ..रविवारची दुपार मटणावर ताव मारण्यात गेलेली असते..जेवण अंगावर आलेलं, त्यामुळे छानशी झोप झालेली आणि संध्याकाळी मस्त पाऊस सुरु. कुठेच नसतं जायचं. फक्त पावसाकडे बघायचं आणि गेल्या पावसाळ्यांच्या आठवणीत रमायचं. आज तिने नाही, तुम्ही काम करायचं. आल्याच्या चहाबरोबर बटाट्याची भजी, असेल घरात एखादं तर चार कापट्या वांग्याच्यापण पिठात बुडवून तळून काढायच्या. गॅलरीत टीपॉय सजवायचा. खुर्चीवर बसल्याबसल्या पाय लांब करून डोळे मिटायचे, परत उघडायचे .. सुखावलेल्या चेहेऱ्यानी तिच्याकडे बघायचं ..नशिबाला मानायचं, एक हातात भजी आणि दुसऱ्या हातात चहा .. पाऊसच ठरवतो, आठवून तर पहा.

पाऊसच ठरवितो तुम्ही जेवणार काय ते ...असो रविवार की मधला कोणताही वार..पावसाळाच तो, सुरु असते संततधार. पन्नास पदार्थ येतात करता तुम्हाला पण कधी कधी जेवायला काय करावं हे सुचतंच नसतं, सुचत नसतं म्हणून ठरत नसतं .. पण पाऊस आहेच की ठरवायला. तोच सुचवतो एखादा साधासा बेत आणि सुरु होते तुमची तयारी. अचानक तुम्हाला मांडणीवरच्या, मागे गेलेल्या एका खास डब्याची आठवण येते. डबा उघडताच त्या अलौकिक सुगंधाचा दरवळ घरभर पसरतो, आज घरात काहीतरी खास शिजणार याची चाहूल सर्वांचं लागते. डब्यातली वस्तू ओट्यावर येते आणि साजरी होऊ लागते पावसाळ्यातली एक खास मेजवानी..हो मेजवानी, गरमागरम भात आणि सीकेप्यांची आवडती काड्यांची मिरवणी. मिरवणी म्हणजे साजूक तुपावर परतवलेल्या सुक्या बोंबलाच्या, म्हणजेच काड्यांच्या जोडीला बटाट्याच्या फोडी आणि मिरी घातलेल्या वाटणात मस्त उकळलेलं कालवण ..बाहेर पावसाचा थयथयाट आणि घरात मिरवणीचा घमघमाट. वाफाळलेल्या पांढऱ्या शुभ्र भातावर हिरवट मिरवणी ओतून घेतलेल्या पहिल्या घासाबरोबरच तुमचे नाक आणि डोळेही या मिरीच्या फणकाऱ्याचा आनंद घेतात, तुपाच्या तवंगाची काड्यांची मिरवणी क्षणात तुमच्या मनाचा ताबा घेते.. वाटी वाटी पिऊन मग जीव असा तृप्त होतो.. ध्यानी मनी नसतानाही बेत कसा फक्कड बनतो..तुम्ही नाही हो ,पाऊसच ठरवतो.

पाऊसच ठरवतो कधी यायचं आणि पाऊसच ठरवतो कधी जायचं. पण या पावसाळ्यात जरा लक्ष ठेऊन बघा ..तोच तुम्हाला सुचवतो काय खायचं आणि काय प्यायचं.

समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट
#samhere #sameergupte.blogspot.in
sameer6949@gmail.com

No comments:

Post a Comment