Saturday, 4 November 2017

वेध एकवीरेच्या दर्शनाचे, भाग्य सीकेपी समाजाचे !


सीकेपी समाज हा खरंच भाग्यशाली म्हणावा लागेल. म्हणजे कसं आहे नं की काही समाजबांधवांकडे पाहिलं तर कोणत्या कोणत्या कारणासाठी यांचे मेळावे, मोर्चे, उपोषणं, निदर्शनं चालू असलेले दिसतात. यांना एकत्र आणण्यासाठी एखादा नेता किंवा मग एखादा झेंडा याचा आधार घेतलेला आपण पाहतो. परंतु सर्वगुणसंपन्न आणि पुरोगामी विचारांच्या सीकेपी समाजाला एकत्र यायला ना कोणा नेत्याची गरज, ना कोणत्या झेंड्याची आणि ना ही कोणत्या घोषणेची. नोकरीपेशा आणि व्यवसायासाठी देशभर विखुरलेल्या या समाजाला कोणत्याही कारणाशिवाय एकत्र आणण्यासाठी साक्षात कुलस्वामिनी एकवीरा देवी धावून आली आहे तो समाज भाग्यशाली नाही तर काय. बघा ना, एका नवजात संस्थेचा एक कार्यकर्ता आपली संकल्पना मांडतो काय, तीला स्वीकारून ती संस्था त्या संकल्पनेला लोकांसमोर ठेवते काय आणि मग त्याला प्रचंड प्रतिसाद देत समस्त सीकेपी समाज आई एकविरेच्या छत्रछायेखाली एकवटण्याचं ठरवतो काय .. सगळं कसं स्वप्नवत. कल्याणच्या सीकेपी संस्थेने पुढाकार घेऊन केलेल्या या उपक्रमाबद्दल सर्व ज्ञातीतर्फे त्यांचे आभार मानावे तितके कमीच परंतू एकविरेच्या कृपेने ज्याने ही कल्पना मांडली त्याचे जाहीर कौतुक केलेच पाहिजे...माझ्या माहितीप्रमाणे डोंबिवलीचा माझा मित्र विजय देशमुख हाच तो ज्ञातिबांधव आहे ज्याच्यामुळे आज आपण सर्व आई एकविरेच्या चरणी तिच्या मुलांसारखे 'एक दिवस कायस्थांचा' ही संकल्पना साकारण्यास एकत्र येत आहोत.
कधी नव्हे इतक्या मोठ्या संख्येने आपण तिच्या कडे जातोय ... काय मागावं बरं तिच्याकडे ? भपकेबाज नोकरी, भरभराटीचा धंदा, आलिशान घर, भली मोठ्ठी गाडी, मुलांची लग्न, नातवंडांची ऍडमिशन, परदेशातल्या आप्तांची खुशाली, आई वडिलांचे आरोग्य, कोर्टकचेऱ्यांमधून सुटका, एक ना दोन अनेक मागण्या अनेक साकडं घालता येतील आपल्याला. पण खरंच गरज आहे का या सगळ्याची. अहो तिच्यामुळेच तर इतकं भरभरून मिळालंय. इतकं की काही वर्षांपूर्वी तिच्या दर्शनाला मळवलीहून बैलगाडीने येणारे आपण आज आपल्या एअर कंडिशन गाडीतून येतोय.
या वेळेला काही वेगळं मागुयात का आपण तिच्याकडे ? म्हणजे असं की आधीच अल्पसंख्यांक असणाऱ्या आपल्या समाजात प्रेम आणि सलोखा नांदू देत, एकमेकाला मदतीचा हात देत वर एकमेकाला वर आणण्याची जाणीव रुजू देत, समाजबांधवांचं दुःख ते आपलं ही मानसिकता वाढू देत, ज्ञातीतील उपेक्षितांच्या गरजेला धावण्याची बुद्धी येऊ देत आणि जमलंच तर छोट्या छोट्या वादांमुळे समाजातील दुरावलेल्या आणि दुभंगलेल्या नात्यांना जोडण्याची क्षमता आपल्या ठायी येऊ देत. यातली एक गोष्ट जरी तिच्या कृपेने आपल्या पदरात पडली तरी या कार्यक्रमाचं सार्थक होईल.
पाहिल्यान्दाच असं एकत्रपणे आईला भेटायला जातोय ... तिलाही काही देऊयात का आपण ? तिला काय देणार म्हणजे .. असच एकोप्याने राहू आणि नित्यनेमाने तुझ्या पायाशी येऊ असं वचन तर नक्कीच देऊ शकू ना आपण. मुलांनी एकत्र राहण्यापेक्षा दुसरं काही नको असतं एका आईला.
मग चला ज्ञातिबांधवांनो.. कार्यक्रम कोणाचा, कोणी ठरवला, आयोजक कोण, संयोजक कोण, ही संस्था कोणाची, श्रेय कोणाला हे सगळे क्षुल्लक प्रश्न मागे टाकून तिच्या भक्तीत तल्लीन होऊन, त्या तेजपुंज दिव्यत्वाला डोळ्यात साठवायला, तिच्या कृपादृष्टी चे धनी व्हायला, वाजत गाजत, हसत खेळत, तिच्या नावाचा जयघोष करत तिचा गड गाठूया. चला ज्ञातिबांधवांनो .. एकत्र येऊया ! एक नवा समाज घडवुया !!
शनिवार ११ नोव्हेंबर २०१७..आम्ही येतोय.. तुम्ही पण नक्की या !
आपलाच,
समीर गुप्ते
विश्वस्त - सीकेपी ज्ञातीगृह ट्रस्ट, ठाणे.
अध्यक्ष - सीकेपी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री.
अध्यक्ष - सीकेपी बीडीएफ ठाणे.
संस्थापक - सीकेपी फूड फेस्ट

साधंसं तरीही असाधारण.. फक्त आपलंच आंबटवरण !


''तू हल्ली हल्ली जरा जास्तच सीकेपी फूड, सीकेपी फूड करत असतोस रे " नाशिकहून परत येताना कल्याणजवळ कोणत्या हॉटेलमध्ये जेवायचं या विचारात असलेल्या माझ्या मित्राने मला टोकायला सुरुवात केली. तसं काहीच कारण नव्हतं, मी फक्त इतकंच म्हणालो की ''हे तुझं पंजाबी आणि चायनीज वगैरे नको रे आता..खूप कंटाळा आलाय मला' पण साहेब जरा जास्तच खवळले. मी म्हटलं जाऊदे ..गपचूप आपल्या घरी जेऊयात, बघ फोन लावून तुझ्या घरी काय केलंय ते. त्याने बायकोला तडक फोन लावला, काहीतरी बोलला आणि तेव्हढ्याच वेगात कट केला .." साधय रे, मेथीची भाजी आणि भाकरी'' तोंड वाकड करत माझ्याकडे पाहत पुटपुटला. मी म्हटलं जाऊदे माझ्या घरी फोन लाव आणि स्पीकर वर टाक म्हणजे मला गाडी चालवत बायकोशी बोलता येईल. घरचा फोन नेमका आईने उचलला. म्हटलं जेवायला काय आहे गं आज... "काही नाही, साधंच केलंय'' माझ्या आईच्या या उत्तराने त्याचा चेहरा अजूनच पडला. ''साधंच म्हणजे'' मी आपला विषय सुरूच ठेवला.. '' साधं म्हणजे आंबट वरण, भात, काचऱ्या बटाट्याची भाजी आणि मिरची तळलीये... तू येत असशील जेवायला, तर सुकट टाकते तव्यावर''.  ''ओके, मी अर्ध्या तासात येतो'' असं म्हटलं आणि फोन कट  केला. ''चायला, याला साधं जेवण म्हणतात तुमच्याकडे? पाच पाच पदार्थ बोलली तुझी आई'' आश्चर्यचकित होऊन विचारणाऱ्या मित्राकडे बघून मी शांत हसलो .. मेथीची भाजी भाकरी च्या समोर आमच्या घरातलं साधंसं  जेवण सरस ठरलं आणि आम्ही दोघे घरी येऊन मनसोक्त जेवलो.

या साध्याशा जेवणातले दोन सुपरस्टार पदार्थ म्हणजे आंबटवरण आणि काचऱ्या बटाट्याची भाजी. या दोघांना जगात पर्याय नाही. त्यातच सीकेप्यांचं आंबटवरण हे अनेकांना भुरळ घालणारं आहे आणि त्याच्याबरोबर जोडीला असलेली तव्याला चिकटलेली,थोडीशी करपलेली, तेलाच्या लालसर तवंगावर थोडीशी पिवळसर करडी झालेली पातळ कापलेल्या बटाट्याची भाजी म्हणजे केव्हाही लाजबाब. जेव्हा जेव्हा आम्ही आठ दहा दिवसांसाठी बाहेरगावी फिरायला जातो तेव्हा आम्हाला पहिले चार पाच दिवस, किती नवीन पदार्थ खातोय आणि किती नाही असं होतं पण सहावा सातवा दिवस लागला की आपलं आंबटवरण भात कधी खायला मिळतंय अस होऊन जातं. विमानतळावरून '' आज आंबटवरण भात करून ठेव'' असा फोन हमखास घरी जातो. आंबटवरणावरून एक खूप खूप जुनी आठवण झाली. त्यावेळी गडकरी रंगायतन नव्हतं. ठाण्याच्या मो.ह.विद्यालयात( MH High school) रात्रीचे नाटकाचे प्रयोग होत. आमच्या वाडयातल्या मामी, म्हणजे सुमती रणदिवे यांचं आणि त्यांच्या काही सीकेपी मैत्रिणीचं तिथे कॅन्टीन सारखं काहीतरी असायचं आणि नाटक संपल्यावर सर्व कलाकारांना त्यांचंच जेवण असायचं. त्या मलाही त्यांच्या मुलांबरोबर मदतीला न्यायच्या. अनेक दिगग्ज कलाकारांना म्हणजे गोरेपान काशिनाथ घाणेकर, कमलाकर सारंग, श्रीकांत मोघे, निळू फुले, वारणेच्या वाद्यवृंदातील चाळीसएक बालकलाकार आणि त्यांचे खूपच प्रेमळ गुरुजी, गायिका प्रमिला दातार या सर्वाना मी तेव्हा जवळून पाह्यलंय, अगदी मांडी घालून जेवताना पाह्यलंय आणि त्यांना पापड, लिंबू वाढलेत सुद्धा.  त्यावेळी एकदम राजबिंडे दिसणारे अभिनेते श्रीकांत मोघे यांना तर आमच्या मामींनी केलेलं आंबटवरण खूप आवडायचं .. अक्षरशः वाट्या वाट्या प्यायचे. आणि एकूणच त्यांचं जेवण आनंदाने आणि मनसोक्त जेवायचे ... हेच साधंसं जेवण पण त्या सर्वांना मनापासून आवडायचं.

आंबटवरण हा खरंतर सीकेपी जेवणातला एक संपूर्णपणे वेगळा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. आंबटवरणाला ''डाळ वाढा हो'' असं बोलणाऱ्याला परत जेवायला बोलावू नये या मताचा मी आहे.  जेवायच्या आधी आंबटवरणावरच गरम गरम पाणी वाटीभर प्यावं, परत जेवताना भातावर ओतल्यावर वाटीत उरलेले वरण थेट ओठाला लावून परत वाटी भरायला ताटात ठेवावी आणि पोटभर जेवल्यावर सुद्धा उठता उठता पाण्याऐवजी घट्ट राहिलेलं वरण पिऊनच उठावं याला म्हणतात आंबटवरण भाताचं जेवण. इतका अप्रतिम सुगंध असणाऱ्या,लसूण मोहरीच्या फोडणीने अजूनच तडकेदार झालेल्या या आंबटवरणाला 'साधंसं' या सदरात ज्याने कोणी टाकलं असेल त्याचा जाहीर सत्कारच करावा म्हणतो.  आजचं उरलेलं आंबटवरण दुसऱ्यादिवशी सकाळी तापवून आणि आटवून चपातीबरोबर खाताना जो काही आनंद मिळतो तो कोणत्याही शब्दात व्यक्त होऊच शकत नाही. आंबटवरणाबरोबर जगातली कोणतीही भाजी चालून जाते, भाजी नसेल तर सोडे, सुकट, लोणचं, पापड काहीही चालतं. आपल्याकडे आंबटवरणाची गोडी इतकी मोठी आहे की घरात तूरडाळीच्या महागाईची  कडवट चर्चा सुद्धा नसते.

मागचे काही आठवडे मी बघतोय, माझा लेख आवडला तर अनेक महिला आज तोच पदार्थ घरी करणार वगैरे कॉमेन्टमध्ये लिहितात.  बघा आजपण रविवार आहे..पण तुम्हाला नम्र विनंती - आज तुम्ही नेहेमीप्रमाणे मटणाचं जेवणच करा. नाही तर 'अखिल भारतीय तेचतेच खाऊन कंटाळलोय महासंघ' या संघटने मधले काही चिडलेले नवरे माझ्या घरावर मोर्चा आणायचे.

समीर गुप्ते
संस्थापक - सीकेपी फूड फेस्ट
#samhere #sameergupte.blogspot.com
#foodblog #delicious #ckpfood #ckpfoodfest
sameer6949@gmail.com.

टीप - माझ्या त्या मित्राचे नांव विचारू नका.. एकशे सत्ताविसाव्यावेळी त्याची बायको रागावून माहेरी गेल्याचे पाप लागेल मला.