Tuesday, 12 February 2019

राजसाहेबच का ?


'काय रे, राज ठाकरेच का ?' मनसे पक्षाचा ठाणे शहरातील पदाधिकारी झाल्यानंतर मला विचारल्या गेलेल्या प्रश्नांमध्ये जास्तीत जात विचारला गेलेला प्रश्न कोणता असेल तर हाच . 'राज ठाकरे नाही ..राजसाहेबच का असे विचारा' असं बोलून माझ्या उत्तराला सुरुवात होते.
'राजसाहेबच का?' या प्रश्नाला खरंतर हजारो उत्तरं आहेत. म्हणजे महाराष्ट्रापुढे जी संकटं आ वासून उभी आहेत,अनेक महानगरांचे - विशेषकरून पुणे मुंबईकरांचे जितके नागरी प्रश्न आहेत, ठाणे मुंबईत खासगी व सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या चाकरमान्यांच्या न्यायहक्कासाठी आणि तमाम मराठी माणसांच्या मानत ठाण मांडून बसलेल्या हजारो प्रश्नांना जर राजसाहेब हेच एकमात्र उत्तर आणि पर्याय म्हणून लोकांना दिसत असतील तर माझ्यासारख्या त्यांच्या निस्सीम चाहत्यांचे सांगणे वेगळे काय असेल. सन्माननीय राजसाहेबांच्या व्यक्तित्वाविषयी, त्यांच्या स्वभावधर्माविषयी हजारो लेख लिहिले गेले असतील. जसा ज्यांचा अनुभव तसे त्यांचे लिखाण असेल. माझ्याबाबतीत सांगायचं तर २००६ हे साल मला राजसाहेबांकडे घेऊन जाणार ठरलं. राजसाहेब हे खऱ्या अर्थाने माझ्या मनात भरले ते त्यांनी पक्ष स्थापन केल्यानंतरच्या पहिल्यावहिल्या भाषणातच. 'आज मी स्वतःला महाराष्ट्राला अर्पण करतो' हे वाक्य ऐकूनच महाराष्ट्राच्या करोडो लोकांना जे वाटलं ते शब्दात सांगणे अशक्य. हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेबानंतर जर कोणत्या नेत्याने माझ्या हृदयात हात घातला असेल तर तो नेता म्हणजे फक्त आणि फक्त मा. राजसाहेब ठाकरे.
२००९ साली मी पाहिल्यान्दा साहेबाना भेटलो ते माझ्या पहिल्या चित्रपटासाठी. थिएटरचा प्रश्न नव्हता कारण माझा चित्रपट पुणे ते कोल्हापूर या पट्ट्यात प्रदर्शित होत होता तिथे मराठी चित्रपटांना थिएटर उपलब्ध असे. साहेबांविषयी असलेल्या प्रेमामुळे मला माझ्या या चित्रपटाच्या ध्वनिफितीचे प्रकाशन मा. राजसाहेबांच्या हस्तेच आणि तेही ७ जानेवारीलाच करावयाचे होते. परंतु त्यांच्या वेळेअभावी ते ठाण्याला येऊ शकत नव्हते हे त्यांच्याकडूनच कळले. थोडासा हिरमोड झाला पण अगदी क्षणिक. 'आपण ऑडिओ रिलीज इथे करूयात' या साहेबांच्या वाक्याने मी अवाक झालो. आजही कोणाला सांगितल्यावर विश्वास बसणार नाही की माझ्या चित्रपटाचे ऑडिओ रिलीज समारंभ कृष्णकुंज येथे झाला आणि अगदी थाटामाटात, सर्व कलाकार. मित्रपरिवार आणि मीडियाच्या उपस्थितीत. आमच्या चित्रपटातील सर्व कलाकार - दिग्दर्शक, मा राजसाहेबाना भेटून अक्षरशः भारावून गेले होते.राजसाहेबांच्या या दिलदारीमुळे माझ्या मित्रपरिवारात त्यांच्याबद्द्दलचा आदर कमालीचा वाढला हे मात्र सत्य. यानंतर काही ना काही कामासाठी किंवा निमंत्रणासाठी साहेबांकडे अनेकदा जाणे झाले. २०१७ मध्ये माझ्या आयोजनात होत असलेल्या सीकेपी फूड फेस्ट चे निमंत्रण साहेबानी स्वीकारल्यानंतर जो काही जल्लोष आम्हा मंडळींमध्ये झाला त्याचे वर्णन करणे अशक्य. साहेब पाच मिनिटसाठीच येणार होते आणि ठरल्याप्रमाणे आलेही. पण पाच मिनिटे नव्हे..तब्बल ४० मिनिटे साहेब आमच्यात होते. प्रत्येक स्टॉलवर जाऊन, विचारपूस करत प्रत्येक स्टॉलवरील भगिनींकडून खरेदी करत साहेबांनी संपूर्ण फेस्ट जिंकला होता. त्यावेळेला स्टेजवर प्रमुख उदघाटक सुप्रसिद्ध हॉटेल उद्योजक मा श्री विठ्ठल कामत साहेब होते. पण त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने 'जा, तू राजसाहेबांच्या बरोबरच राहा'असे सांगून मला स्टेजवरून मोकळे केले.
मध्ये एकदा सहजच साहेबांची सदिच्छा भेट घेण्यासाठी मित्रपरिवारबरोबर त्यांच्या निवासस्थानी जाण्याचा योग्य आला. साहेब अतिशय छान मूडमध्ये होते. राजकारणाचा आणि सामान्य माणसाचा दैनंदिन जीवनात कसा आणि कितीवेळा संबंध येतो हे त्यांनी इतक्या सहजतेने सांगितले की तिथे उपस्थित प्रत्येकाला साहेबांचा शब्द न शब्द पटला होता. जवळपास तासभर चाललेल्या गप्पांमध्ये तरुणांनी राजकारणात यावे हे त्या सर्व तरुणांना सांगताना एकदाही त्यांनी त्यांच्याच पक्षात यावे असे सांगितलं नाही पण खेळीमेळीत सुरु असलेल्या या बैठकीत क्षणभर थोडे सिरीयस होत आम्हा मंडळींकडे बघून 'तुम्ही लवकरात लवकर सक्रिय राजकारणात आलं पाहिजे' हे सांगितल्याने आमच्यात एक वेगळेच चैतन्य आले.
राजसाहेबांच्या सभा म्हणजे सांगायलाच नको. भाषणाची सुरुवातच टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात होते. मा राजसाहेबांचे विचार ऐकताना, त्यांचे भाषण ऐकताना भारावून जायला होतं. त्यांची शैली, त्यांची लकब, त्यांची देहबोली आपोआपच आपली व्हावीशी वाटते. ते बोलत असलेला शब्द नि शब्द आपल्या मनातला वाटतो. एखाद्या विरोधकावर भाष्य करताना साधलेला ह्युमर आणि टायमिंग याला तोड नाही. त्यांच्या पॉज मध्ये दडलेला एक सस्पेन्स केवळ लाजबाब.
महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे स्वप्न पाहणारा हा नेता, एका असामान्य वलय घेऊन फिरणारा तरीही सर्वसामान्यांना ऍप्रोचेबल वाटणारा आणि खरोखरीच ऍप्रोचेबल असणारा हा जबरदस्त ताकदीचा नेता, मा. बाळासाहेबांच्या नेतृत्वाची आणि दृष्टिकोनाची क्षणोक्षणी आठवण देणारा, कधी गंभीर तर कधी मिश्किल प्रतिक्रिया देणारा, लाखोंच्या सभेतही तुमच्याशीच बोलतोय असे वाटणारा आणि खऱ्या अर्थाने मराठी मनाचा मानबिंदू असणारा हा असामान्य नेता आज महाराष्ट्राला लाभलाय हे माझे आणि माझ्या राज्याचे भाग्य समजतो.
आताच काही दिवसांपूर्वी प्रिय मित्र मनसे नेते श्री अभिजित पानसे साहेब आणि जिल्हाध्यक्ष श्री अविनाश जाधव साहेब यांच्या पुढाकाराने कृष्णकुंज या निवासस्थानी साहेबांची पुन्हा भेट झाली - तिथेच माझी ठाणे शहर सचिव म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी जाताजाता माझ्या पाठीवर मारलेली थाप मला खूप काही देऊन गेली, खूप काही सांगून गेली. समाजभानाची जाणीव असलेल्या, एका अनन्यसाधारण विचारांच्या, सर्वसामान्यांविषयी कळकळ असलेल्या, राज्याच्या प्रश्नांची जाण असलेल्या आणि त्या प्रश्नांना सोडविण्याची धम्मक असलेल्या या प्रचंड उंचीच्या नेत्यासाठी - त्यांच्या स्वप्नासाठी आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या हितासाठी मला काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो.
'राजसाहेबच का?' याचे उत्तर 'राजसाहेबांशिवाय आहेच कोण?' या प्रतिप्रश्नात आहे. 'तुमच्या राजाला साथ द्या' या शब्दात ' आपल्या राज्याला हात द्या' हाही अर्थ सामावलेला आहे. स्वाभिमानाने जगणाऱ्या आणि जगू इच्छिणाऱ्या मराठी मातीत जन्माला आलेल्या प्रत्येकाला हवं असलेलं खंबीर नेतृत्व ज्याच्या ठायी ओतप्रोत भरलेलं आहे तोच माझा नेता का आहे हे येणारे दिवस नक्कीच सांगतील .. नावातच असलेला 'राज'योग प्रत्यक्षात यायला आता मात्र काहीच काळ बाकी आहे.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !! जय मनसे !!!
समीर गुप्ते
ठाणे शहर सचिव
महाराष्ट्र नवनिर्माण सेना

No comments:

Post a Comment