Tuesday, 15 August 2017

बाबा नावाचा मित्र !


बाबा.. म्हणजे माझ्यासाठी बाबा आणि बाकी सगळ्यांसाठी मात्र अप्पा गुप्ते ! बाबा हे एक विलक्षण रसायन होतं. काही वेगळीच दृष्टी, कमालीचे आशावादी, प्रचंड मेहेनती, मनमिळाऊ आणि प्रेमळ मित्र. बाबांच्या मित्रमंडळाचा वयोगट ३० वर्षे ते ९० वर्षे हा कायम असायचा. गरज म्हणून काही वर्ष नोकरी केली पण मन कायम व्यवसायाकडे झुकलेलं. कल्पकतेने धंदा केला तरच आपण श्रीमंत होऊ शकतो, नोकरीत राम नाही हे माझ्या कोवळ्या मनावर बिंबवण्यात बाबा यशस्वी झाले होते आणि माझ्या वयाच्या १०/१२ च्या वर्षी त्यांनी मला त्यांच्या मदतीला घेतले होते. अकरावी बारावी च्या सुमारास धंद्याचे पैसे पण ते माझ्याजवळ ठेवण्यास देत. मला पण खूप बरं वाटे. धंद्याची ओढ लागत होती आणि पैशाची किंमतही कळत होती. अप्पाच घर म्हणजे अनेक नातेवाईकांना आपलंस वाटणारी एक जागा होती. रणदिवे वाड्यातल्या अगदी दोन खोल्यांच्या घरात नातेवाईकांचा कायम राबता असायचा. त्यावेळी धंद्याची परिस्थिती एकूणच बेताची म्हणून पैशाची चणचण नेहमीचीच, परंतु बाबाना कधी निराश झालेले पाहिल्याचं आठवत नाही. आज खिशात दहा हजार नसल्यावर जे दडपण येतं ते तेव्हा १० रुपये नसतानादेखील येत नव्हतं. जिगर - पराकाष्ठा - संयम - आशावाद अशा अनेक शब्दांना एकच प्रतिशब्द होता तो म्हणजे बाबा. व्यवसायाबरोबरच मी चित्रपट समीक्षक, लेखक - पत्रकार व्हावं अशी त्यांची इच्छा त्यांनी मला एकदोन वेळा बोलून दाखवली होती. पण माझा कल क्रिएटिव्ह कामात असल्यामुळे मी त्यांचे आवडीचे क्षेत्र प्रिंटिंग हेच माझे क्षेत्र म्हणून निवडलं. परंतु काही वर्षांपूर्वी मी चित्रपट निर्मिती केली तेव्हा ते सुखावले होते. बाबा उत्कृष्ट कंपोझिटर होते ( त्या वेळीस याला खिळे जुळवणे असेही म्हणत). १९७५ ला धंदा तोट्यात गेल्यामुळे भागीदार वेगळे झाले. यासाठी सर्वस्व विकल्यानंतर पुन्हा नव्या उमदीने उभे राहत बाबांनी सर्व पूर्वपदावर आणलं, या साठी लागणारी प्रबळ इच्छाशक्ती बाबाच्या ठायी ठासून भरली होती. अर्थात आईच्या नोकरीचा त्यांना मोठा आधार होता. अत्यंत बिकट परिस्थितीत पण विनोदबुद्धी जागृत असणं ही त्यांची खासियत होती. सहस्त्रचंद्र पाहिलेल्या (त्यांच्या शब्दात ८० पावसाळे पाहिलेल्या) माझ्या बाबांकडे अशा हजारो गोष्टी होत्या ज्या आजही आम्हाला हसवत ठेवतात, प्रेरणा देतात. कोणत्यातरी नाटकातलं "खिशात दमडी नसेल तरी चालेल पण राहायचं कसं तर अप टू डेट'' हे त्यांचं आवडतं वाक्य. जीवनातले सर्व उतरचढाव बघत, येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटण्याचं कसब बाबांकडे होतं आणि ते आमच्या अंगी बाणवण्यात पण ते यशस्वी ठरले.
गांधीजींना देव मानणारे - गांधीवादी विचारांनी भारलेले, साने गुरुजींवर निस्सीम प्रेम करणारे आणि स्वातंत्रपूर्व काळात राष्ट्र सेवा दलात कार्य केलेले बाबा खऱ्या अर्थाने देशभक्त होते. आज हे सगळं लिहायचं कारण म्हणजे बाबांना जाऊन आज ५ वर्षे झाली. देशावर प्रेम करणाऱ्या माझ्या बाबांनी देशाच्या स्वातंत्र्य दिनीच या जगातून स्वतंत्र व्हावे हे आम्हाला अनाकलनीयच आहे.
बाबा, तुमची आठवण आली नाही असा एकही दिवस वगैरे फालतू काही मी लिहिणार नाही.. दोन कारणांसाठी.. एक म्हणजे त्यांच्याच शैलीत सांगायचं तर हे वाचायला ते फेसबुकवर नाहीत आणि दोन .. माझ्या आत खोलवर माझ्या बाबांचे प्रामाणिक विचार, त्यांचे फायटिंग स्पिरिट, त्यांची विनोदबुद्धी आणि अर्थात त्यांच्या प्रेमाचा अंश न अंश भिनलेला आहे.
सांगायला हजारो गोष्टी आहेत पण,
आयुष्यात आलेल्या अंधारातसुद्धा लखलखणारी लाखो स्वप्न पाहायला शिकवणारे माझे बाबा, माझे मित्रही होते आणि गुरुही !

No comments:

Post a Comment