Monday, 21 August 2017

ठिकाण फराळाच्या पदार्थांचे - 'मरूधन' कळव्याच्या खारकरांचे !







पूर्वी दिवाळीची खूप वाट पाहायला लागायची. नवीन कपडे, फटाके आणि अर्थातच दिवाळीचा फराळ. पण आता कसं आहे ना की सण नसला तरी सण साजरा करण्याची सोय आहे. म्हणजे आज गरज असो व नसो आपण कपडे विकत घेतो, फटाके म्हणाल तर ते तसे आऊट ऑफ फॅशन झालेत आणि दिवाळी फराळ म्हणाल तर ... काय म्हणता ? दिवाळीसाठी थांबावंच लागेल ?  दादा, आम्ही नाही थांबत आता. मनात आणलं तर पंधराव्या मिनिटाला दिवाळी साजरी करतो आम्ही. कसं म्हणजे ? सोप्पय की. स्कुटर ला किक मारायची आणि कळवा गाठायचं. आता तुमचा पुढचा प्रश्न ..कळवा ???? हो हो कळवा, कळवा नाका, ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे आणि इथे आहे वर्षभरात कधीही दिवाळी साजरी करण्याची सोय. जर अजूनही लक्षात येत नसेल तर सांगतो, खारकर यांचे 'मरूधन' नावाच्या दुकानात जायचं आणि बघायचं. अगदी तुमच्या घरच्या चवीच्या तोडीस तोड असणारी फराळाच्या पदार्थांची रेलचेल तुम्हाला येथे पाहायला मिळेल.  अस्सल सीकेपी पद्धतीचे खाजाचे कानवले, चिवडा, चकली, शंकरपाळ्या, बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, शेव अगदी अनारसे सुद्धा...  तुम्हाला जे पाहिजे ते इथे उपलब्ध आहे.

खरं पाहता, श्री पंकज खारकर यांनी नामांकित ब्रॅण्ड्स च्या , म्हणजे चितळ्यांची बाकरवडी वगैरे पदार्थांची एजन्सी अशा स्वरूपाचा व्यवसाय सुरु केला होता. पण लोकांच्या मागणीला मान देत आणि अर्थात काळाची गरज लक्षात घेत त्यांनी या फराळाच्या व्यवसायात येणाचे ठरवले. सीकेपी घरात बनला जाणारा पदार्थ जसाच्यातसा लोकांना मिळू लागला. पत्नी सौ. वैशाली हिने तिच्या पाक कौशल्याने आणि मेहेनतीने पदार्थांच्या दर्जावर लक्ष केंद्रित करून आपल्या सर्व उत्पादनांना जबरदस्त लोकप्रिय केलं. व्यवसाय वाढला की मनुष्यबळ पण वाढतं आणि मग हाताशी लागतं आपल्या घरचं आपलं माणूस.

शालेय जीवन संपतंय न संपतंय तोच त्यांचा मुलगा अथर्व त्यांच्या व्यवसायात रस घेऊ लागला. सीबीसी, सीसीसीआय अशा वेगवेगळ्या उद्योजक संस्थांमध्ये आपले पदार्थ सादर करून अनेकांची वाहवा तर त्याने मिळवलीच पण या व्यवसायाला अजूनही प्रोफेशनल लुक देण्याहेतू त्याने अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला. आज अतिशय उच्च दर्जाच्या मशिन्स आणून अथर्व ने या व्यवसायाला फक्त वेग च नव्हे तर एक वेगळेपण ही दिले आहे. दिवाळी फराळाबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचा चिवडा, पुऱ्या, पापड्या आणि असे अनेक दर्जेदार पदार्थ अथर्व खारकर याच्या मरुधन या दुकानात उपलब्ध आहेत. जशी दिवाळी नसतानाही तुम्ही दिवाळी साजरी करू शकता तशीच होळी नसतानाही त्यांच्याकडच्या तेलपोळीने (पुरणपोळी) तुम्ही कधीही होळी साजरी करू शकता. मी आयुष्यात कधी तेलपोळी खाल्ली नव्हती, म्हणजे गोडाची आवडच नव्हती परंतु पाहताक्षणी ती तेलपोळी खायचा मोह मला आवरता आला नाही आणि मी तेलपोळी खायला सुरुवात केली. उत्कृष्ट चव, आकर्षक पॅकिंग, योग्य दर आणि घरपोच डिलिव्हरी सुद्धा मरूधन तर्फे दिली जाते. सीकेपी फूड फेस्ट मध्ये तुम्ही जर यांच्या स्टॉल ला भेट दिलीत तर तुमची पिशवी तिथेच भरली म्हणून समजा.

आज अनेक तरुण मंडळी शिक्षणावर अफाट खर्च करून कोणत्यातरी नोकरीच्या मागे धावताना दिसतात. परंतु आपल्या अंगी असलेले उद्योजकाचे सळसळते रक्त, शिक्षणाच्या बरोबरीने व्यवसायाचे आकर्षण आणि व्यवसायात येऊन यशस्वी होत, आपल्या सहज सुंदर स्मित हास्याने समोरच्यावर छाप टाकणारी देहबोली या सर्व गुणांच्या जोरावर या नवतरुणाने आपल्या वयाच्या इतर तरुणांना प्रेरित न केलं तर नवलंच.

आज अथर्व खारकर याचा वाढदिवस आहे.  व्यवसाय करून मैत्री जोपासण्याचे कौशल्य अथर्वने आपल्या अंगी बाणले आहे आणि अशा त्याच्या मित्रमंडळींचा रात्री १२ वाजल्या पासून त्याच्या नुसता धुमाकूळ सुरु आहे. अशा या शुभ दिवशी वयाने मोठ्या होणाऱ्या अथर्व ला कर्तृत्वाने आणि लौकिकाने पण मोठा होण्यासाठी अनेक आशीर्वाद.

मरूधन च्या रुचकर आणि चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेताना अथर्व च्या पाठीवर शाबासकीची थाप मारायला आणि त्याला यशाच्या उत्तुंग भरारी साठी शुभेच्छा द्यायला मात्र विसरू नका.

समीर गुप्ते
सीकेपी फूड फेस्ट. 

Tuesday, 15 August 2017

बाबा नावाचा मित्र !


बाबा.. म्हणजे माझ्यासाठी बाबा आणि बाकी सगळ्यांसाठी मात्र अप्पा गुप्ते ! बाबा हे एक विलक्षण रसायन होतं. काही वेगळीच दृष्टी, कमालीचे आशावादी, प्रचंड मेहेनती, मनमिळाऊ आणि प्रेमळ मित्र. बाबांच्या मित्रमंडळाचा वयोगट ३० वर्षे ते ९० वर्षे हा कायम असायचा. गरज म्हणून काही वर्ष नोकरी केली पण मन कायम व्यवसायाकडे झुकलेलं. कल्पकतेने धंदा केला तरच आपण श्रीमंत होऊ शकतो, नोकरीत राम नाही हे माझ्या कोवळ्या मनावर बिंबवण्यात बाबा यशस्वी झाले होते आणि माझ्या वयाच्या १०/१२ च्या वर्षी त्यांनी मला त्यांच्या मदतीला घेतले होते. अकरावी बारावी च्या सुमारास धंद्याचे पैसे पण ते माझ्याजवळ ठेवण्यास देत. मला पण खूप बरं वाटे. धंद्याची ओढ लागत होती आणि पैशाची किंमतही कळत होती. अप्पाच घर म्हणजे अनेक नातेवाईकांना आपलंस वाटणारी एक जागा होती. रणदिवे वाड्यातल्या अगदी दोन खोल्यांच्या घरात नातेवाईकांचा कायम राबता असायचा. त्यावेळी धंद्याची परिस्थिती एकूणच बेताची म्हणून पैशाची चणचण नेहमीचीच, परंतु बाबाना कधी निराश झालेले पाहिल्याचं आठवत नाही. आज खिशात दहा हजार नसल्यावर जे दडपण येतं ते तेव्हा १० रुपये नसतानादेखील येत नव्हतं. जिगर - पराकाष्ठा - संयम - आशावाद अशा अनेक शब्दांना एकच प्रतिशब्द होता तो म्हणजे बाबा. व्यवसायाबरोबरच मी चित्रपट समीक्षक, लेखक - पत्रकार व्हावं अशी त्यांची इच्छा त्यांनी मला एकदोन वेळा बोलून दाखवली होती. पण माझा कल क्रिएटिव्ह कामात असल्यामुळे मी त्यांचे आवडीचे क्षेत्र प्रिंटिंग हेच माझे क्षेत्र म्हणून निवडलं. परंतु काही वर्षांपूर्वी मी चित्रपट निर्मिती केली तेव्हा ते सुखावले होते. बाबा उत्कृष्ट कंपोझिटर होते ( त्या वेळीस याला खिळे जुळवणे असेही म्हणत). १९७५ ला धंदा तोट्यात गेल्यामुळे भागीदार वेगळे झाले. यासाठी सर्वस्व विकल्यानंतर पुन्हा नव्या उमदीने उभे राहत बाबांनी सर्व पूर्वपदावर आणलं, या साठी लागणारी प्रबळ इच्छाशक्ती बाबाच्या ठायी ठासून भरली होती. अर्थात आईच्या नोकरीचा त्यांना मोठा आधार होता. अत्यंत बिकट परिस्थितीत पण विनोदबुद्धी जागृत असणं ही त्यांची खासियत होती. सहस्त्रचंद्र पाहिलेल्या (त्यांच्या शब्दात ८० पावसाळे पाहिलेल्या) माझ्या बाबांकडे अशा हजारो गोष्टी होत्या ज्या आजही आम्हाला हसवत ठेवतात, प्रेरणा देतात. कोणत्यातरी नाटकातलं "खिशात दमडी नसेल तरी चालेल पण राहायचं कसं तर अप टू डेट'' हे त्यांचं आवडतं वाक्य. जीवनातले सर्व उतरचढाव बघत, येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद लुटण्याचं कसब बाबांकडे होतं आणि ते आमच्या अंगी बाणवण्यात पण ते यशस्वी ठरले.
गांधीजींना देव मानणारे - गांधीवादी विचारांनी भारलेले, साने गुरुजींवर निस्सीम प्रेम करणारे आणि स्वातंत्रपूर्व काळात राष्ट्र सेवा दलात कार्य केलेले बाबा खऱ्या अर्थाने देशभक्त होते. आज हे सगळं लिहायचं कारण म्हणजे बाबांना जाऊन आज ५ वर्षे झाली. देशावर प्रेम करणाऱ्या माझ्या बाबांनी देशाच्या स्वातंत्र्य दिनीच या जगातून स्वतंत्र व्हावे हे आम्हाला अनाकलनीयच आहे.
बाबा, तुमची आठवण आली नाही असा एकही दिवस वगैरे फालतू काही मी लिहिणार नाही.. दोन कारणांसाठी.. एक म्हणजे त्यांच्याच शैलीत सांगायचं तर हे वाचायला ते फेसबुकवर नाहीत आणि दोन .. माझ्या आत खोलवर माझ्या बाबांचे प्रामाणिक विचार, त्यांचे फायटिंग स्पिरिट, त्यांची विनोदबुद्धी आणि अर्थात त्यांच्या प्रेमाचा अंश न अंश भिनलेला आहे.
सांगायला हजारो गोष्टी आहेत पण,
आयुष्यात आलेल्या अंधारातसुद्धा लखलखणारी लाखो स्वप्न पाहायला शिकवणारे माझे बाबा, माझे मित्रही होते आणि गुरुही !